प्राचार्य शिवाजीराव भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्राचार्य शिवाजीराव भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३० जून, २०१०

प्राचार्य


काल प्राचार्य गेले. आयुष्यभर आपल्या मृदुल वाणीच्या सामर्थ्यानं मराठी भाषेत व्याख्यान करून अनेकांची आयुष्ये संस्कारित करणार्‍या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल लिहीत असताना ऊर भरून येत आहे. आपण सर्वजण शब्दांचे सत्व हरवून बसलेल्या काळातून जात आहोत, कधी-कधी तर शब्दांना काही अर्थच आहे की नाही असा विचार मनात येतो. पण ज्याला शब्दशक्ती प्रसन्न होती आणि ज्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांना रत्नांचे तेज असे अशा या विभूतीने आपल्या मागे खूप मोठा वारसा ठेवला आहे.

प्राचार्य शिवाजीराव भोसले ज्या काळात घडले, त्यांनी जे-जे उदात्त आणि उत्कट पाहिले ते-ते अवघ्या महाराष्ट्रानेही पाहावे, अभ्यासावे आणि जीवन संपन्न करून घ्यावे यासाठी प्राचार्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्याख्याने केली. प्राचार्यांनी छत्रपती शिवराय, समर्थ रामदास, संत तुकाराम, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, आचार्य रजनीश अशा अनेक व्यक्तींच्या जीवन-चरित्रावर बोलणे केले. हे बोलणे करीत असताना कुठेही कुणाच्या विचारांतील परस्पर विसंगतीमुळे प्राचार्यांना कधीच त्या व्यक्तीबद्दल बोलताना अडचण येत नसे - कारण प्राचार्यांची भूमिका ही नेहमीच अभ्यासकाची असे.

ज्यांना छत्रपतींचा अभिमान आहे त्यांना रामदास रूचतीलच असे नाही आणि ज्यांना सावरकर आवडतात त्यांना गांधी कळतीलच असे नाही. पण आपला अभिनिवेश थोडा बाजूला ठेवून आपण हवे ते अभ्यासू शकतो हे प्राचार्यांनी शिकवले. प्राचार्य हे फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात तत्वज्ञान आणि तर्कशास्त्रासारखा विषय शिकवत असले, तरी त्यांच्या व्याख्यानात तर्क-कर्कश्शपणा औषधालाही सापडत नसे. कारण त्यांना एकच एक विचार श्रोत्यांच्या मनात ठसवायचा नसे, तर हे जीवन समृध्द आहे, ते जगण्यासारखे आहे, वाटा अनेक आहेत फक्त आपले कुतूहल जागे असायला हवे हा विचार ते श्रोत्यांना देऊ इच्छित. अगदी आपण नेहमी बोलतो त्या भाषेत, शब्दा-शब्दांचे नवनवीन पैलू आपल्या शुध्द उच्चारांतून उलगडून दाखवत, मध्येच श्रोत्यांना नर्मविनोदी चिमटे काढत सुखद लयीत प्राचार्य व्याख्यान रंगवित.
व्याख्यानात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, खंडन-मंडन असला निरर्थक बाष्कळपणा त्यांना करावा लागला नाही आणि व्याख्यानासाठी अमुक हाच विषय हवा असाही त्यांचा आग्रह नसे कारण त्यांचे वाचन समृध्द होते. हवा तो मुद्दा, हव्या त्या ठिकाणी आपोआप बाहेर पडतो - फक्त निर्हेतूकपणे वाचन वाढवा असे त्यांचे सांगणे असे.
प्राचार्यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत गांधी, जे. कृष्णमूर्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्व लोकांना जवळून पाहिले होते. त्यांच्यातील अद्भुताची चव चाखली होती, या सर्वांची व्याख्याने निष्काम भक्तीने ऐकली होती. हा सर्व समृद्ध वारसा महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांपर्यत गेला पाहिजे या विचाराने ते बोलत आणि त्यांची व्याख्याने ऐकताना हा भारलेपणा श्रोत्यांनादेखील स्पर्शून जात असे. सकाळमधून त्यांनी लिहीलेल्या जागर या सदराच्या जाहीर वाचनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी वाचकांनी उस्फूर्तपणे केले, कारण त्यात संस्कार होता.
बीड शहरात श्री. सुरेश नवले यांनी आई महोत्सवात ओळीने त्यांची सात-आठ व्याख्याने आयोजीत केली होती. डॉ. आंबेडकर, म. फुले, म. गांधी, छ्त्रपती शिवाजी, संत तुकाराम यांच्यावरील ती व्याख्याने आज महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरली आहेत.
मला त्यांची तीन-चार व्याख्याने ऐकण्याचा आनंद घेता आला, आणि त्यांच्याशी मनसोक्त संवादही साधता आला. औरंगाबादमध्ये संदीप राजेभोसले यांच्याकडे राहायला होतो. प्राचार्यांच्या व्याख्यानाची जाहिरात पेपरमध्ये आली होती. थोडेसे काम आहे असे सरांना सांगून मी प्राचार्यांच्या व्याख्यानाला गेलो. का कोण जाणे या माणसाच्या पायांना स्पर्श केलाच पाहिजे असे वाटले. व्याख्यान संपल्यावर मी तो केलाही आणि मिळालेल्या पाच-दहा मिनीटांत त्यांची मायादेखील अनुभवली. रविवार सकाळ मधून त्यांनी "देशोदेशीचे दार्शनिक" या सदरातून विविध दार्शनिकांवर लेखन केले होते; पण त्यात रजनीशांचा समावेश नव्हता. मी त्या काळी रजनीशवेडा होतो. त्याबद्दल
मी त्यांच्याशी बोलत होतो.
"महाराष्ट्राला अजून तुकारामच कळला नाही, रजनीश कळायला अजुन खूप उशीर आहे, मी रजनीशांना प्रत्यक्ष भेटलो आहे, नंतर त्यांच्यावर बोललोही आहे..." असे त्यांनी सांगितले.
आता त्यांचे रजनीशांवरील व्याख्यान शोधायचेच असा विचार घेऊन मी ऑफिसला परतलो, तर आमचे बॉस इकडे आमच्यावर फायरींगच्या मूडमध्ये आले होते.
"काम आहे असे सांगून जातोस आणि मुलींच्या मागे फिरतोस?" खरं सांग..कुठे गेला होतास?
मी त्यांच्याकडे नवीनच कामाला लागलो होतो, त्यांच्याकडेच राहायलाही होतो. या अनपेक्षीत हल्ल्याने
कावरा-बावरा झालो, रडू येऊ लागले. शेवटी त्यांनी जोक संपवला आणि सांगितले,
"मी पाहिले तुला प्राचार्यांच्या पाया पडताना, जा आत, तुझ्यासाठी दोन हजार रूपयांची पुस्तके आणलीत त्यांची...."
हे आमचे सर देखील त्यांचे फॅन होते. शाळेत शिकत असताना बीडपर्यंतच्या तिकीटासाठी स्वत:ची पुस्तके विकून त्यांनी प्राचार्यांची व्याख्याने ऐकली होती आणि रात्री झोपण्यासाठी बीडच्या बसस्टॅण्डचा आश्रय घेतला होता.
त्यानंतर प्राचार्यांचे भरपूर लिखाण वाचले, भरपूर कॅसेटस ऐकल्या आणि उत्तरोत्तर
प्राचा
र्यांच्या प्रेमात पडत गेलो.
आपण किमान दोन दिवस तरी त्यांना जवळून पाहिले पाहिजे, त्यांच्या गावी गेले पाहिजे असे मला वाटू लागले. पुस्तकावर त्यांचा लॅंडलाईन नंबर होताच. लावला.
प्राचार्यच फोनवर होते. त्यांनी कोण? कुठे भेटला होता? इत्यादी मायेने विचारपूस केली. मी फलटणला येणार आहे असे त्यांना सांगितले.
"अरे, आमच्या भागात एवढं उन पडत आहे, कशाला उगा परेशान व्हायचे प्रवासात? मी औरंगाबादला येतच असतो आणि मला तो भाग पुन्हा एकदा नीट पाहायचा आहे, तेव्हा येणारच आहे पावसाळ्यात तिकडे..तेव्हा आलो की खूप बोलू" असे सांगून माझी समज काढली.
नंतर मीच माझ्या व्यापात अडकलो. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अ‍ॅंजिओप्लास्टी झाल्याचे वाचले होते.
प्राचार्यांची आठवण झाली की आता मात्र त्यांचे काहीही न ऐकता, त्यांना काहीही न सांगता फलटणला नक्की जायचेच असे नेहमी ठरवीत असे.

आता मात्र मी कधीच फलटणला जाऊ शकणार नाही.

छायाचित्रे - चैतन्य रूद्रभाटे, फलटण

समर्थ रामदासांवारील प्राचार्यांचे व्याख्यान इथे ऐकता येईल.

६ मार्च, २०१०

प्राचार्य शिवाजीराव भोसले


प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान म्हणजे एक सुखद अनुभव असतो. काळा कोट (टाय शिवाय), पांढरी प्यांट आणि पायात बाटाच्या साध्या चपला अशा पोषाखात प्राचार्य माईकसमोर उभे राहतात आणि "बंधुभगीनींनो" या संबोधनाने किंवा अगदी थेट ते विषयाला हात घालतात. व्याख्यानापुर्वी केले जाणारे यांना हार घालणे, त्यांची ओळख करुन देणे, यांनी थोडे बोलावे असले सोपस्कार त्यांना आवडत नाहीत. एकदा पैठणला त्यांचे व्याख्यान होते. कुठ्ल्याही सोपस्काराशिवाय त्यांचे व्याख्यान सुरु झाले. ते त्यांना फ़ार आवडले. "पाहुण्यांनी उठावे, आणि दीपप्रज्वलन करावे, आता पाहुण्यांनी आसन ग्रहण करावे, आता पुन्हा एकदा उठुन थोडे हलावे" असे सांगुन सुत्रसंचालक व्याख्याता म्हणुन आणलेल्या पाहुण्याला काही कळतच नाही असे समजत असतो असा शेरा मारुन त्यांनी टाळया घेतल्या होत्या. व्याख्यानाचा विषय असावा अशीही त्यांना गरज वाटत नाही. उठुन सरळ माईक समोर उभे राहावे आणि आपल्या विचारांना मोकळे होऊ द्यावे, एकापाठोपाठ विचार येत राहातात, व्याख्यान फ़ुलत राहाते अशी त्यांची धारणा.
त्यांच्या व्याख्यानात एक प्रवाहीपणा आहे. प्राचार्य बोलत राहातात, कधी ते श्रोत्यांना मधुनच एखादा बोलण्याच्या ओघात आलेला किस्सा सांगुन हसवतात. बहुतांशी वेळा "व्याख्यान" याच विषयापासुनच ते बोलायला सुरुवात करतात. त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांनी कुणा-कुणाची व्याख्याने ऐकली, त्यांची वैशिष्ट्ये आणि अभ्यासविषय ते नमुद करतात.
प्राचार्यांची शैली एवढी मोहक की त्यांची व्याख्याने ऐकुन त्याच शैलीत भाषण करणारे अनेक हौशी "भाषण बहाद्दर" पहाता येतील. एकदा मी त्यांचे भाषण ऐकुन भारावलेल्या अवस्थेत त्यांना एक पत्र पाठवले होते. हे पत्र मी टाईप केले होते. पत्रोत्तर येईल अशी मला निश्चित आशा होती. पण ते आले नाही. फ़ोनवरुन बोलताना त्यांनी सांगितले की, "पत्र स्वत:च्या हाताने लिहावे (क्रमश:) ."