आचार्य रजनीश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आचार्य रजनीश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - ३


Christopher Calder
Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body. His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part. The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven. He had it all and he was giving it away for free!
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples. Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real. The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

                  क्रिस्तोफर काल्डर रजनीश मुंबईच्या Woodland अपार्टमेंटमध्ये रहात असताना त्यांना भेटला होता. त्याचे संन्यासाचे नाव स्वामी कृष्णख्रिस्त होते. त्याने रजनीशांचे सुरुवातीचे दि सायलेंट एक्स्प्लोजन लिहिले असाही तो दावा करतो. पण ओशो फौंडेशनने तो फक्त त्या पुस्तकाचा संपादक असल्याचा खुलासा केला आहे. काल्डरवर इथे लेखणी झिजवण्याचे कारण म्हणजे तो रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा विरोधक आहे. काल्डरचे आरोप व त्यावरील ओशो फौंडेशनचे खुलासे या आंतर्जालीय मारामारीतून प्रचंड आंतर्जालीय कचरा निर्माण झाला आहे. अर्थातच तो उपसण्याचे कारण नाही. रजनीशांचा विरोधक झाल्यानंतरही काल्डरच्या वर दिलेल्या मतप्रदर्शनाला वेगळे महत्व आहे. कारण त्यातून अनेक प्रश्न उभे रहातात. रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी होती व त्यांच्या उपस्थितीत भारून टाकल्याचा अनुभव येत असे तो म्हणतो त्यात तथ्य वाटते.    
                  आचार्य अत्र्यांच्या कन्यका व रजनीशांच्या भक्त शिरीष पै (इथे आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या “तो मी नव्हेच” नाटकातील लखोबा लोखंडे आठवावा. शिरीष पै रजनीशांच्या भक्त झाल्या असताना आचार्य अत्रे हयात होते. शिरीष पै यांच्या विनंतीवरून मराठा प्रेसच्या कर्मचारी/वाचकांसाठी आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत रजनीशांनी एक व्याख्यानही दिले होते.पुढे रजनीश बंगळुरुला गेले असताना ते ज्या यजमानाकडे उतरले होते त्याने रजनीशांच्या शिष्येला रजनीशांच्या खोलीत झोपू देण्यास नकार दिला व रजनीशांना त्याने घराबाहेर काढल्याची बातमी आली तेव्हा आचार्य अत्रे अत्यंत नाराजीने "शेवटी सगळे सारखेच " म्हणाल्याची नोंद ही प्रतिभावंत ध्यानयोगी मध्ये आहे) यांनी रजनीशांवर लिहिलेल्या “प्रतिभावंत ध्यानयोगी” या पुस्तकातही शिरीष पै नी याच अर्थाची विधाने केली आहेत. बाकी विदेशी संन्यासिनी येऊ लागल्यानंतर रजनीश या त्यांच्या गुरुदेवांनी आपल्याकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जवळ गेलेल्या इतर भवान्यानी आपल्याला कसे पाण्यात पाहिले यावर शिरीष पैनी आधीच छोट्या असलेल्या या पुस्तकाची बरीच पाने खर्ची घातलेली आहेत. असो.
                 तर काल्डर व शिरीष पै यांची रजनीशांकडे तथाकथित दिव्यदृष्टी असल्याची विधाने. मग प्रश्न असा निर्माण होतो की, दिव्यदृष्टी तसेच स्वत:च्या उपस्थितीने लोकांना भारून टाकण्याची जादू असणारा रजनीश संपत्तीच्या मागे का लागतो? जागृत होऊनही तो समाधानी राहू शकत नाही?  तो या तथाकथित शक्तींचा वापर स्वत:चे साम्राज्य उभे करण्यासाठी का करतो? विदेशात उपचार करून घेण्याचा बहाणा करून, वास्तविक कर चुकवण्यासाठी भारतातून स्वत:चे तोंड काळे का करतो? आणि तिथेही तेच धंदे केल्याने विदेशी शासनाने जबर दंड वसूल करण्यासह पार्श्वभागी लत्ताप्रहार केल्यावर इकडे परत येऊन पुन्हा पहिले पाढे पंचावन करून त्याची प्रेयसीही आत्महत्या करते, तो ही व्यसनी होतो आणि शेवटी “माझे शरीर हे माझ्यासाठी नरक बनला आहे” हे विधान करून इहलोक सोडतो?
                   या सगळ्या गोंधळात एकच सत्य, नव्हे शोकांतिका अधोरेखित होते की तथाकथित जागृत पुरुष देखील कुठल्याही सामान्य माणसासारखे लोभी, अहंकारी, पतनशील व अज्ञानी असतात. त्यांच्या कुठल्याही करिष्म्याला भुलून जीवन समर्पित करणारे निष्ठावान अनुयायी असा जागृत पुरुष किंवा स्त्री गेल्यानंतर त्याच्या नावे रडण्या भेकण्याशिवाय व तक्रारींशिवाय काहीही करू शकत नाहीत.
ओरेगोनियन या अमेरिकन वृत्तपत्राने रजनीश प्रकरणावर त्याकाळी चालवलेले कव्हरेज आंतर्जालावर उपलब्ध आहे. जिज्ञासूंसाठी दिलेली लिंक मोठाच खजिना ठरेल. भारतात व त्यातल्या त्यात मराठी साहित्यात ओशो फौंडेशनच्या कृपेने रजनीश या भामट्याबद्दलची तपशीलवार सत्यता प्रकाशात आजवर प्रकाशात येऊ शकलेली नाही. आजही या भामट्याच्या पुस्तकांचा हजारोंनी खप होत असताना कुणी प्रकाशक ती छापण्याची शक्यता नाही.
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!

मला तुरुंग आणि बाहेरचे जगही सारखेच आहे. यामुळे मला तुरुंगाचा अनुभव मिळाला - रजनीश



खरा चेहरा - अगदी कुठल्याही गुन्हेगारासारखेच भाव. नेहमी प्रसारासाठी काढल्या जाणाऱ्या फोटोतील दैवी तेज, प्रसाद आणि हसू शेरीफच्या ऑफिसमध्ये टिकू शकले नाही

२० जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - २

रजनीशांनी अज्ञाताच्या भांडवलावर आध्यात्माचा बाजार सुरु केला. हा माणूस स्वत:चा ब्रांड स्थापन होई पर्यात सुरुवातीला दिवसाचे बारा-अठरा तास वाचन करीत होता. तीच माहिती लोकांसमोर अशा खुबीने पेश करीत होता की क्या कहने. अर्थात यावर नाराज होण्याच काहीच कारण नाही. तक्रार ही आहे की त्याने कुणालाही उपलब्ध होऊ शकत असलेल्या या माहितीचा वापर स्वत:ची “एक जागृत झालेला माणूस” अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी अगदी बेमालूमपणे केला.
धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या ज्या शोषणाविरुद्ध त्याने जन्मभर कंठशोष केला त्याच शोषण शृंखलेचा  रजनीश हा पुढे चालून मुकुटमणी बनला, एवढा मोठा मुकुटमणी की या सम हाच! भारताच्या अनेक शहरांत ध्यान प्रसारासाठी एक साधी लुंगी व पंचा घालून पायपीट करणारे “आचार्य” रजनीश, विदेशी चेल्यांची थोडीशी संख्या वाढताच स्वघोषित “भगवान” बनून लगेच रोल्स राईस वापरताना दिसतात तेव्हा मजा वाटते.




त्यांनी ब्याण्णव रोल्स राईस व हिरे वापरले ही तक्रार नाहीच, तर “लोक माझ्याकडे असलेल्या या भौतिक गोष्टींची चर्चा करतात, त्यांना त्याचे आकर्षण आहे.. मला नाही.. लोकांना आकर्षीत करण्यासाठी हे आहे” या गोंडस सबबीखाली रजनीशांनी ते वापरले. त्यांना नायट्रस ऑक्साईड व Valium चे व्यसन असल्याचे आरोप त्यांच्याच सेक्रेटरीने केले. खरे पाहता ही व्यसने त्यांना डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधातून लागली. रजनीशांनी Books I Have Loved, Glimpses of a Golden Childhood, आणि  Notes of a Madman मधील पुस्तकाचा मजकूर नायट्रस ऑक्साईडच्या अमलाखाली कथन केला आहे, रजनीशांनीच त्या पुस्तकांत सांगितले आहे. या पुस्तकांच्या विचित्र कथन शैलीमुळे ही ते सहज लक्षात येते.      
अमेरिकन सरकारने त्यांची हकालपट्टी केल्यांनतर रोल्स राइस लिलावात काढल्या. त्यापूर्वी रोल्स राईसकडे केलेल्या चौकशीत कंपनीने सांगितले की रजनीश खरेदी करीत असलेल्या नव्या रोल्स राईसच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल फोनवरून तासनतास सूचना देत बसत. त्या त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच रंगवून हव्या असत. त्यांच्या या रोल्स राईस प्रकरणावरच एक वेगळा लेख होऊ शकतो, पण रजनीश म्हणतात त्याप्रमाणे बिती ताही बिसार दे!


९२ रोल्स राईस पैकी एक

रजनीश अविवाहित होते. क्रिस्टीना वाल्फ नावाची ब्रिटीश महिला त्यांची प्रेयसी होती. रजनीशांच्या  लहानपणी त्यांची शशी नावाची प्रेयसी होती; ती लहानपणीच वारली. मरताना या शशीने परत येण्याचे वचन दिले होते व क्रिस्टीना वाल्फच्या रुपात जन्मून शशी परत आली आहे असे रजनीशांनी म्हटले. अमेरिकेतून रजनीशांच्या हकालपट्टीनंतर या क्रिस्टीना वाल्फने मुंबईच्या एका हॉटेलात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्त्या केली.


क्रिस्टीना वाल्फ उर्फ तथाकथित शशी, सन्यासी मा विवेक

जगभरातून लोक पुण्यातील कम्युन मध्ये येतात, पण पुण्यातील लोक मात्र इकडे फारसे फिरकत नाहीत असा प्रश्न व्याख्यानात त्यांना विचारण्यात आला. तेव्हा पुणे शहर “एक मरी हुयी बस्ती” असल्याचे त्यांनी पुणे कम्युन मध्येच दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते, आणि पुण्यात त्यांनी सातशे वर्षांपूर्वी तप केले असल्याचा अगोदर  दावा केला होता. त्यांच्या मृत्युनंतर कम्युनमुळे पुणे हे जागतिक तीर्थक्षेत्र बनेल ही भविष्यवाणीही रजनीशांनीच केली होती.
बहुसंख्य लोक फिदा असतात ती रजनीशांची तर्कशक्ती व त्यांच्या साहित्यावर. वास्तविक प्रचंड रिपिटेशनशिवाय त्यात काहीही नाही. त्यांनी दिलेले एकनएक उत्तर एनलायटन्मेंटच्या प्रोडक्ट भोवती फिरत राहते. रजनीशांच्या आयुष्यातील विरोधाभास लिहायचे नाही असे ठरवले होते, कारण ते लक्षावधी आहेत, व ते चघळत बसण्याचे काहीच कारण नाही. पण अनुरूप वाटतील त्या ठळक गोष्टी मांडल्याशिवाय पर्याय नाही.    
सुरुवातीची अत्यंत थोडकी व्याख्याने सोडली तर इथून तिथून सगळे रजनीश साहित्य “ध्यान” आणि फक्त ध्यान याच मुद्यावर केंद्रित आहे. विविध थेरपीज असोत की तत्वज्ञान, मानसशास्त्र की जगातील कोणताही विषय, त्याचा कसा का होईना त्यांनी ध्यान व एनलायटन्मेंटशी संबध जोडला.  
रजनीशांचा माजी संन्यासी व नंतरचा टीकाकार Christopher Calder ते जागृत पुरुष असल्याचे मान्य करतो, पण जागृत पुरुष स्खलनशील नसतात हे त्याला मान्य नाही. त्याच्या शब्दात –

Rajneesh spoke on a high level of intelligence and his spiritual presence emanated from his body ike a soft light that healed all wounds. While sitting close during a small gathering of friends, Rajneesh took me on a rapidly vertical inner journey that almost seemed to push me out of my physical body.  His vast presence lifted everyone around him higher without the slightest effort on their part.  The days I spent at his Bombay apartment were like days spent in heaven.  He had it all and he was giving it away for free!
   
Rajneesh possessed the astounding powers of telepathy and astral projection, which he used nobly to bring comfort and inspiration to his disciples.  Many phony gurus have claimed to have these mysterious abilities, but Rajneesh had them for real.  The Acharya never bragged about his powers. Those who came near soon learned of them through direct contact with the miraculous.

पुढील भागात रजनीशांच्या शैलीचे विच्छेदन    
   
   
           

१८ जुलै, २०११

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १

- यशवंत कुलकर्णी

सत्तरच्या दशकात उठलेले रजनीश नावाचे वादळ आता जवळपास विस्मरणात गेले आहे. यापूर्वी मी लिहिलेल्या यु. जी. विषयीच्या लेखमालेत रजनीशांचा जरुरीपुरता आढावा घेतला आहे. पण हा विषय तेवढ्यात संपणारा नाही. म्हणून मुद्दाम रजनीश हा विषय ठरवून लिहिलेली ही लेखमाला लिहिण्याचे योजिले आहे. विविध पैलूंतून रजनीश उलगडून समोर मांडण्याचा, आणि कोणताही आरोप न करता, या माणसाचा धूर्तपणा, त्याची खरोखर पोहोच कुठवर होती हे खुद्द वाचकांनाच दिसावे असा प्रयत्न आहे.
रजनीश कोण होते, त्यांनी भारतात व अमेरिकेत काय भानगडी केल्या, त्यांच्या बुद्धीची झेप किती मोठी होती वगैरे तपशीलात जाण्याचे कारण नाही. रजनीश उदो उदो करणारे व रजनीश मुर्दाबाद छाप साहित्य आंतर्जालावर उपलब्ध आहे.
त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपासून (पुंगलिया बंधू, टिंबर मार्केट) पुण्यात व भारतभरात दिलेली व्याख्याने (जवळपास ४००० तासांचे रेकॉर्डिंग), बरीचशी पुस्तके, अमेरिकेत पत्रकारांना दिलेल्या मुलाखती आणि अमेरिकेतून हकालपट्टीनंतरची व्याख्याने हे सगळे मी ऐकले, चित्रफितीवर पहिले आहे.
त्यांचे साहित्य आणि वाणी आवडत होती, प्रभावीतही झालो होतो. रजनीश कसे बरोबर आहेत आणि जग त्यांना ओळखण्यात कसे चुकले आहे हे सांगणारे लेखही सकाळ व लोकमत मध्ये मी लिहिले. इथल्या ओशोप्रेमींच्या ध्यान शिबिरातही मी अनेकवेळा गेलो – व नंतर ध्यान करू लागलो. एवढं, की मला नोकरी सोडून दोन वर्षे फक्त ध्यानासाठी द्यावी वाटली. एवढ्यासाठीच हे तपशीलवार सांगत आहे की, नंतर नीट अभ्यास न करता काहीबाही लिहिल्याचा आरोप होऊ नये.
मी रजनीश ऐकत होतो पण कुठेतरी खोलवर हा माणूस फसव्या आहे, हा भासवतो तसा पूर्ण पारदर्शक बिलकुल नाही हे नेहमी वाटायचं, पण अगदी किंचित, ओझरतं. कदाचित आपणच समजून घेण्यात चुकत असू असं मानून ध्यान करीत होतो. पण ध्यानात जस-जसा खोलवर जाऊ लागलो तस-तसा या माणसाचा खरा चेहरा दिसू लागला.
मला जे तथाकथित समाधीचे अनुभव आले तेव्हा मी हादरून गेलो. ध्यानात एका उन्मुक्त भावावास्थेच्या क्षणी मी दशदिशांना विस्तारलो आहे ही जाणीव होत असतानाच “आता पुढे काय” हा मनात चाललेला विचार मला सुस्पष्टपणे दिसू शकत होता! विचार थांबल्याशिवाय समाधीप्रवेश होतच नाही या समजाला धक्का बसला होता. सविचार समाधीही असते हे लक्षात आले.  
 तरीही या माणसाचे फोटो फेकून देऊन पुस्तके जाळून टाकण्याचे धैर्य माझ्याकडे नव्हते, हे मुद्दाम नमूद करतो. ते धैर्य ते युजी वाचल्यानंतर आले. रजनीश गेले आणि युजी आले असे नाही. दोघेही गेले.    
  अजूनही कुठेतरी वाटत होतं की, नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी असते – शेवटी सत्य एकच आहे. रजनीश कसेही असोत, त्यांना ऐकले म्हणून आपण ध्यान करू लागलो हेच मोठे उपकार आहेत. पण या समजुतीआड मला दिसलेले रजनीश कसे ते लिहिणे राहून जात होते.    



   
अज्ञाताचे भांडवल
जागृत झालेल्या माणसाला सगळेच ज्ञात असते – काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. जागृत झाल्याचा जो दावा करील तो हमखास स्वत:ची फसवणूक करीत आहे असे समजा हे रजनीशांनी सांगितले होते. आणि ते जागृत झाल्याचा दावाही त्यांनी स्वत:च केला होता! आडवे-तिडवे प्रश्न विचारणारास त्यांचे सरळ सांगणे असे – “तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...”  
त्यांनी जगभरात होते नव्हते तेवढे सर्व सद्गुरू उकरून काढले व त्यांच्या साहित्यावर रसाळ व उद्बोधक व्याख्याने दिली. जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.




(क्रमश:)

४ ऑक्टोबर, २०१०

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

Copyright Notice
My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim  authorship, without my consent or the permission of anybody. - U.G.

U.G. Krishnamurti
यापूर्वी माझ्याकडून यु.जी. कृष्णमूर्तींवरून सुचलेल्या माझा दोस्त युजिनी आणि वाचा आणि शोधा या लिखाणात दोनवेळा काही अंशी (म्हणजेच अगदी शंभरातला दशलक्षावा टक्का) यु.जी. कृष्णमूर्तींवर लिहून झालंय. खरोखर माझा असा कुठलाही दोस्त कधी नव्हता. पण यु.जीं.चे रंग वापरून एक पात्र रंगवण्याचा विचार आला आणि ते लिहून काढलं होतं. त्या पात्राच्या तोंडून यु.जी. कृष्णमूर्तींनी सांगितलेल्या गोष्टी अर्थात भारतीय आध्यात्मिक संचिताबद्दल खडे बोल वदवून घेण्याचा विचार होता - तो बारगळला. कारण असं पात्र उभं करायला मी काही लेखक नाही.
Rajneesh aka Osho


    पण कधीकाळी रजनीशांच्या सोफास्टीकेटेड बाबागिरीच्या आधीन जाऊन आयुष्यातील काही काळ मी घालवला आहे; त्यात सगळं काही माझ्यापुरतं जवळून अभ्यासलं आहे आणि तेच असं कधीतरी बाहेर पडत राहातं. मला वाटतं हेच जगातल्या सगळ्या लोकांबद्दल होत असतं. कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. तोच उपजिवीकेचा मार्ग देखील बनतो. हे जगात असलेल्या सगळ्या अभ्यासविषयांना आणि त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना लागू आहे - पण एका क्षेत्राचे अभ्यासक यात मोडत नाहीत ते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. कारण आध्यात्माच्या प्रदेशात पाऊल टाकलेला माणूस आणि त्याचं तिकडे वळलेलं पाऊल हा त्याला या लौकिक जगतातलं काही नकोय, त्याची रूचि जगाच्या पार जे आहे त्यात आहे याचा स्वयंसिध्द पुरावा आहे असं हजारो वर्षांपासून या भूमीत मानण्यात आलं आहे - यामुळेच भगव्या वस्त्रांना आणि संन्याशांना आदर मिळत आलेला आहे.
    अगदी अलिकडे म्हणजे ६२-७२ च्या दशकात रजनीश:ओशो यांनी "सगळं काही सोडून गिरीकंदराच्या दिशेने जाणे आणि स्वत:चा शोध घेत राहाणे" ही संन्यासाची व्याख्या बदलली आणि "कुठंही न जाता जिथे आहोत तिथेच, सगळ्या सुखोपभोगांच्या सान्निध्यात राहून संन्यासी असणे" असं नवं रूप संन्यासाला दिलं तोच त्यांचा "नव-संन्यास." पुढे मग गोष्टी वाढत गेल्या आणि "सेक्सगुरू" या उपाधीपर्यंत रजनीशांचा प्रवास झाला. ६२-७२ पासून सन १९९० मध्ये रजनीशांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी निर्माण केलेल्या नव-संन्यासाच्या वातावरणातून आजच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेळीअवेळी प्रवचनं देणार्‍या बहुतांशी बाबा/गुरू लोकांचे भरण-पोषण झाले आहे. आध्यात्माचं क्षेत्र देखील एक धंदा बनला आहे हे आजचं वास्तव आहे.
    धंदा बनलेल्या आजच्या आध्यात्म या क्षेत्राची आणखी एक खूबी म्हणजे इतर धंद्यांसारखी यात खर्‍याखुर्‍या वस्तूंची डिलेव्हरी द्यावी लागत नाही. जे काही असायचं ते गुलदस्त्यातच असतं - ते तसंच गुलदस्त्यात राहातं. आणि कशाचीही डिलेव्हरी न देता हा धंदा जोरात चालू असतो. त्यामुळंच आध्यात्माबद्दल जो बोलतो तो ढोंगबाज बाबाचा चेला असला पाहिजे किंवा "तसा होण्याचा त्याचा प्रयत्न असावा" असा एक समज जगभरात पसरलेला आहे. पुन्हा एकदा मी यु.जी. कृष्णमूर्तीं हा मुख्य धागा पकडून आज लिहायला बसलो आहे. पुढे जाईल तसं इतर अनेक धाग्यांनाही हातात घ्यावं लागणार आहे - सोडावं लागणार आहे कारण त्यांची विशिष्ट अशी विचारसरणी नाही - तर यु.जी. कृष्णमूर्ती हा भारतात उदयाला आलेल्या समस्त आध्यात्मिक विचारसरणींच्या विरूध्द, अगदी टोकाचा परिणाम आहे. त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांमुळे आध्यात्मच नव्हे तर मानवी बुध्दीमत्तेशी निगडीत असलेल्या प्रत्येक क्षेत्राच्या वैधतेवारच प्रश्नचिन्ह लागतं.  
    ते कसं लागतं हे पाहाण्यापूर्वी यु.जी. कृष्णमूर्तींच्या पार्श्वभूमीबद्दल एकदा थोडक्यात आटपून घेतो. यु.जी. कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) हे जे. कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) यांचे समकालीन. यु.जीं.चे आजोबा हे सी.डब्ल्यू. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफिकल सोसायटीमधील कारकिर्दीदरम्यान सोसायटीला उदारपणे आर्थिक मदत देणारी असामी होते; व्यवसायानं ख्यातनाम वकील होते. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांनी जे. कृष्णमूर्तींची त्यांच्या बालपणापासूनच ते नव्या युगाचे "मैत्रेय" बनून जगापुढे यावेत या इराद्याने निवड केली होती. जे. कृष्णमूर्ती हे नव्या युगाचे बुध्दपुरूषच व्हावेत (ते पुढे बुध्दपुरूष म्हणून जगासमोर आलेही, पण थोडासा यू टर्न घेऊन ), थोडक्यात बुध्दत्व प्राप्ती हेच ध्येय समोर ठेऊन जे.कृष्णमूर्तींचे पालन-पोषण केले जात होते. या पालन पोषणात ध्यान, साधना आणि तसलेच सर्व प्रकार आले. जे.कृष्णमूर्तींबद्दल हे होत असतानाच कुमारवयीन यु.जी. कृष्णमूर्तीदेखील थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य बनले. दुसरीकडे युजींना त्यांच्या कर्मठ घरातच लहानपणापासून साधु, बैरागी, साधक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना जवळून पाहायला मिळत होते; कारण त्यांच्या पंगती युजींच्या आजोबांच्या घरी सतत उठत असत.
Raman Maharshee


    या कुमार वयातच कुठेतरी, मोक्ष खरोखर आहे काय, ती अवस्था कशी असते, ती मला मिळवायचीय ही ओढ युजींच्या मनात निर्माण झाली. पौगंडावस्था ते एकविशी या दरम्यानच्या कालखंडात युजींनी ब्रम्हचर्य पालनासह सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधना केल्या. कुणीतरी स्वामी शिवानंद नावाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी हिमालयात सात वर्षे घालवली. मोक्षाची तीव्रतम तहान लागलेली असताना, साधना चालू असताना आणि आजूबाजूचे पूरक वातावरण या सर्व पार्श्वभूमीवर खरोखर मोक्ष मिळवलेली कुणी व्यक्ती हयात आहे काय? ती कशी आहे? ती आपल्याला मोक्ष देऊ शकेल काय? हे प्रश्न मनात असतानाच युजींनी ऋषि मानल्या जाणार्‍या, अरूणाचलम या पर्वताच्या सान्निध्यात राहाणार्‍या रमण महर्षींची भेट घेतली. या भेटीदरम्यान युजींचा रमण महर्षींना थेट सवाल होता "हा जो काही मोक्ष म्हणतात, तो तुम्ही मला देऊ शकता काय?" रमण महर्षींनी साशंकपणे उत्तर दिले, "मी देऊ शकतो, पण तु तो घेऊ शकतोस काय?" या उत्तरामुळे युजींचा आध्यात्मिक साधना आणि साधक याबद्दलचा संपूर्ण दृष्टीकोनच पलटला आणि त्यानंतर त्यांनी कधीच आध्यात्मिक बाबतीत कुणाच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवली नाही; पण मोक्षाचा त्यांचा शोध मात्र सुरूच राहिला.



J. Krishamurti
यु.जी. कृष्णमूर्ती हे भारतातील थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष बनलेल्या जिनराजदास यांचे सहायक म्हणून काम करू लागले. यादरम्यानच त्यांनी मद्रास विद्यापीठात मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि गूढवाद हे विषय घेऊन पदवीचे शिक्षण सुरू केले; ते त्यांनी पूर्ण केले नाही. थिऑसॉफिकल सोसायटी ही वंश, वर्ण, जात यांचा भेदभाव न करता विश्वबंधुत्वाचे माहेरघर उभे करणे -  धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या तुलनात्मक अभ्यासाला प्रोत्साहन देणे -निसर्गाच्या अदभुत नियमांचा आणि माणसातील सुप्त शक्तीचा तलास घेणे या उद्देशाने १८७५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये अस्तित्वात आलेली आणि नंतर अड्यार, चेन्नईमध्ये मुख्यालय स्थापन झालेली सोसायटी. युजींची आध्यात्मिक क्षेत्रातील तोपर्यंतची पार्श्वभूमी, थिऑसॉफिकल सोसायटीतील नोकरी आणि त्यांना उपजत मिळालेली वक्तृत्वाची देणगी यांतून यु.जी. थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणून पुढे आले. या काळात भारतातील आघाडीच्या जवळपास प्रत्येक महाविद्यालयांत थिऑसॉफीवर व्याख्याने दिली. युजींनी पुढे सोसायटीच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याख्यान मोहीमेत नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी आणि अमेरिकेला भेटी दिल्या. या व्याख्यान मोहिमेपूर्वीच युजींचा कुसूमकुमारी या नावाच्या तरूणीशी विवाहदेखील झाला. यु.जी कृष्णमूर्तींचा हा प्रवास सुरू असतानाच जे. कृष्णमूर्ती हे एप्रिल १९११मध्ये इंग्लंडला जाऊन तिथे पाश्चिमात्य जग, रितीरिवाज, भाषा, तत्वज्ञान आणि त्यांची "मैत्रेय" बनण्याची साधना करीत असतानाच थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणूनही पुढे आले होते. स्वत:च्या आध्यात्मिक साधनेत निराश झालेले, सर्व प्रकारचे गुरू आणि साधनेबद्दल निराश झालेले युजी थिऑसॉफीशी जुळवून घेतात आणि त्या तत्वज्ञानाचा व्याख्याता का होतात? हा प्रश्न आहे. युजींनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे उपजिवीका चालविण्यासाठी तोच एक लाभदायक मार्ग होता. पण थिऑसॉफीकल सोसायटीचा व्याख्याता म्हणून काम करीत असताना सातव्या वर्षी थिऑसॉफीबद्दल त्यांच्या मनात तिटकारा निर्माण झाला. (थिऑसॉफीकल सोसायटीच्या सदस्यांची बैठक होत असे तेव्हा एकमेकांची ओळख करून घेताना लोक म्हणत- "नमस्कार, मी अमुक-तमुक, मी पूर्वीच्या जन्मात इंग्लडची राणी होते, मी राजा अशोक होतो")
    सन १९४७ ते ५३ या कालखंडात यु.जी. कृष्णमूर्ती जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांत उपस्थित राहात होते; जेकेंचे तत्वज्ञान पटत नसले, ते तत्वज्ञान स्वत:च्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत नसले तरी. जेकेंसोबत त्यांच्या सतत चर्चेच्या फैरी झडत होत्या. सरतेशेवटी इथेही युजींची जेकेंशी असहमती झाली - तो किस्सा युजींच्याच भाषेत पाहाण्यासारखा आहे -
"होता होता, शेवटी मी आग्रह धरलाच, "खरे सांगा तुम्ही माझ्यावर फेकीत असलेल्या या आध्यात्मिक गुंत्यामागे खरोखर काही आहे का?" 
आणि तो पोट्टा म्हणाला "तु स्वत:होऊन हा गुंता समजून घेण्याचा तुझ्याकडे कोणताच मार्ग नाही"
संपलच! आमच नात तिथेच संपलं - "मला स्वत:होऊन ते जर समजून घेण्याचा मार्ग नसेल, तुमच्याकडे जर देण्याचा मार्ग नसेल, तर मग आपण ही झक नेमकी कशासाठी मारतोय?" मी यात सात वर्षे मातीत घातलीत. रामराम, तुम्हाला पुन्हा भेटण्याचीदेखील माझी इच्छा नाही. यानंतर मी तिथून चालता झालो.
    जेकेंसोबत असा काडीमोड झाल्यानंतर, युजींनी त्यांची थिऑसॉफिकल सोसायटीची व्याख्याने चालूच ठेवली.  इथेच त्यांना स्वत:तील गूढ शक्तींची सतत जाणीव होऊ लागली होती अशा नोंदी आहेत. या काळापर्यंत युजींना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली होती. त्यापैकी सर्वात मोठ्या वसंत या मुलाला पोलीओसदृश्य आजार झाला होता. जे. कृष्णमूर्तींनी असा विश्वास होता की त्यांनी मसाज केल्यास मुलाचे पाय बरे होतील; त्यांनी मोजक्याच वेळा पण दुर्धर आजार झालेल्या रूग्णांना हिलींग करून बरे केले आहे असा समज होता; पण युजींना ते पटत नव्हते. शेवटी युजींच्या पत्नीच्या आग्रहामुळे जेके त्या मुलावर मसाजमधून हिलींगचे प्रयोग करू लागले. त्याने काही फरक पडला नाही; युजींच्या मुलाची परिस्थिती बिघडत चालली होती. शेवटी युजींनी पुढील उपचारासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला आणि मुलावर उपचार करण्यासाठी गेलेले श्री आणि सौ. युजी पाच वर्षे अमेरिकेत राहिले. वर्षाभरात मुलगा पायावर उभा राहिल अशी डॉक्टरांनी खात्री दिली होती. युजींनी सोबत घेतलेला पैसा फक्त मुलाच्या उपचारांसाठीच पुरेल एवढा होता. पुढे वर्ष उलटले तसा तोही संपू लागला आणि पैसा कमावणे आवश्यक बनले. काय करायचे? व्याख्यान. ते व्याख्यान देऊ शकत होते. अमेरिकेतील व्याख्याने भारतातील व्याख्यानांसारखी फुकट नसणार होती. एका व्याख्यानाला शंभर डॉलर मिळू शकत होते.  युजींनी व्याख्याने द्यायला सुरूवात केली; पुढे त्यासाठी एक व्यवस्थापिकाही नेमली.
    वैद्यकिय उपचार होत गेले तशी वसंत या त्यांच्या मुलाच्या पायात बरीच सुधारणा दिसू लागली. तो कुबड्या न वापरता उभा राहून, एक पाय घासत का होईना पण चालू लागला. युजी या काळात उभ्या-आडव्या अमेरिकेत व्याख्यानांसाठी फिरत होते. कौटुंबिक आयुष्यात युजी हे वाईट पिता किंवा पती नसले आणि झक्कीपणा व दुसर्‍या बाजूला सुरू असलेला त्यांचा आध्यात्मिक शोध जमेस धरूनही सर्वकाही व्यवस्थित होते. पत्नीशी वाद होत असत ते फक्त पैसा या गोष्टीवरून - कारण युजी पैशाच्या बाबतीत बेफिकीर बंदा होते. त्यांनी पहिल्या वर्षात साठ व्याख्याने दिली आणि दुसर्‍या वर्षाच्या अखेरीस त्या व्याख्यानाच्या धंद्याबद्दल त्यांना तिटकारा निर्माण झाला. व्याख्यानांच्या काळातील दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत. मिनींग अ‍ॅण्ड मिस्टरी ऑफ पेन या शीर्षकाचे व्याख्यान देऊन झाल्यानंतर खुद्द युजींनाच गालफुगीचा विकार उद्भवला. त्यामुळे होणारी गैरसोय आणि वेदना असाह्य असल्या तरी त्यांनी डॉक्टरांना भेटायला नकार दिला. कितीही काही झाले तरी वेदनेची रचना जाणून घेण्याचे औत्सुक्य असल्याने आणि नुकतेच त्याच विषयावर व्याख्यान दिल्याने स्वत:ला होत असलेल्या वेदनांवरच ते प्रयोग करू लागले आणि त्यात आत-आत शिरू लागले. शेवटी वेदना वाढत गेल्या आणि शुद्ध हरपली. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांच्यावर नेमके काय उपचार आवश्यक आहेत हे डॉक्टरांना ठरवता येईना - कारण शरीर थंड पडत चालले होते आणि ते मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत असे दिसत होते. अर्धा तास उलटला. अचानक त्यांना शुध्द आली आणि वेदना नाहीशा झाल्या होत्या. शरीराने स्वत:च स्वत:वर उपचार केले होते.
    यानंतर त्यांची व्याख्यानांतील रूचि निघून गेली आणि कमाईचा दुसरा एखादा मार्ग मिळतो काय याचा ते शोध घेऊ लागले. हे पाहुन इर्मा नावाच्या त्यांच्या व्यवस्थापिकेला झीटच यायची बाकी होती. कारण आतापर्यंत व्याख्यानांमुळे युजी एक महत्वाची असामी बनले होते आणि व्याख्यानांची चहुकडून मागणी होत होती; व्याख्यान दिल्यावर बरेच पैसे मिळत होते. पण युजींनी नकार दिला. अचानक, त्यांना काम करण्याची इच्छा राहिली नव्हती.    


(थोडक्यात पार्श्वभूमी म्हणताम्हणता बरंच लांबत चाललंय आणि मुख्य विषय बाजूला पडलाय, पण ही पार्श्वभूमी आवश्यक आहे असे वाटते. युजींचं त्रोटक "चरित्र" रेखाटून पुढे जाणार होतो. पुढच्या भागात हे लवकर आवरून असली पिक्चर सुरू होईल! )


संदर्भ: इंग्लिश विकीपिडीया, युजी रीडर - संकलन मुकूंद राव, ए टेस्ट ऑफ डेथ- महेश भट, युट्यूबवरील युजींच्या क्लिप्स, युजी कृष्णमूर्ती डॉट ऑर्ग, आणि अर्थातच माझी समज ;-)

२८ मार्च, २०१०

आचार्य रजनीश उर्फ़ भगवान श्री रजनीश उर्फ़ ओशो






रजनीश:ओशो नावाचं गारुड समजुन घेताना आपण स्वत:लाच हरवुन बसतो. रजनीशांची व्याख्याने किंवा साहित्य हे भोव-या सारखं आहे. ते तुम्हाला आकर्षीत करतं, गरगर फिरवतं, घेरी आणतं, तुम्ही आजवर वाहात राहीलेली ओझी फेकायला लावतं. त्यांची व्याख्याने किंवा साहित्य या फक्त पाय-या आहेत - त्या अंतिमत: तुम्हाला ध्यानाकडे घेऊनच जातात.
रजनीशांकडे एक व्यक्ती म्हणुन तुम्हाला पाहाता येत नाही. कारण त्यांनी स्वत:ला व्यक्तीत्वाच्या चौकटीत बांधुन घेतलेलं नाही आणि तुम्ही त्यांना त्या चौकटीत बांधुही शकत नाही. ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० हा त्यांचे ५९ वर्षांचे आयुष्य. लहानपणीचा एक अवखळ मुलगा, तारुण्यातील एक झंझावाती व्याख्याता - विद्यापीठाचा गोल्डमेडलिस्ट, पुढे त्याच विद्यापीठातील प्राध्यापक, आपल्या व्याख्यानांतुन धर्मा-धर्मांमध्ये पसरलेल्या दांभिकतेवर, दांभिक गुरुंवर हल्ला करणारा बंडखोर, शहरा-शहरांतुन ध्यान शिबीरे घेणारा, देश-विदेशांतील तरूण-तुर्कांना वेड लाऊन सोडणारा आणि संभोग से समाधी की ओर या व्याख्यानमालेमुळे "सेक्स गुरु" या नावाने प्रसिद्धी पावलेला, रोल्स राईस ही महागडी कार आणि हि-यांची घड्याळे वापरणारा आध्यात्मिक गुरु, पुण्यातील आश्रमातुन निघुन अमेरिकेतील ओरेगॊन या परगण्यात गेलेला मसिहा, तिथुन हाकालपट्टी होऊन पुन्हा भारतात पुनरागमन असा त्यांचा जीवन प्रवास आहे.
मला रजनीशांची ओळख पुस्तके, ध्वनी-चित्रफीती आणि इंटरनेट यावरून झाली. पण त्यांना ज्या-ज्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिले त्यावरुन रजनीशांच्या भोवती खरंच एक गारुड, एक अद्भुतता होती असे दिसते. त्यांना वाचणारे साधक जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटत तेव्हा भावना अनावर होऊन ते हंबरडा फोडुन रजनीशांच्याकडे झेपावत, रडत (ओशो: एक प्रतिभावंत ध्यानयोगी, शिरिष पै, प्रतिक प्रकाशन). (इथे मला मायकल जैक्सनला पाहुन बेशुद्ध होणा-या मुली आठवतात).
रजनीश स्वत:ला बुध्द पुरुष म्हणवुन घेतात. बुध्द पुरुष म्हणजे आत्मानुभूती झालेला, स्वत:च्या अगदी तळापर्यंत जाऊन आलेला माणुस. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा तो माणुस शिल्लक राहात नाही - तो फक्त एक स्रोत म्हणुन उरतो, त्याला भुत-भविष्य -वर्तमान दिसु लागले, तो आकाशिक रेकोर्डस पाहु शकतो इ.इ.इ. अशा अनेक लंब्याचवड्या, भुलविणा-या आणि लोकांना ध्यानाकडे आकर्षित करणा-या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
पण एखाद्या माणसाचा सर्वोत्तम समिक्षक, टिकाकार म्हणजे त्याचेच आयुष्य असते. तुम्ही कितीही लोकांना भुलवु शकाल पण तुम्ही जे जसे जगाल ते लोकांना पहायला तसेच राहील ना? ते गरिबांना आणि गरिबीला सरळ झटकुनच टाकतात. गरिबीच्या प्रश्नाला "गरिबीची कारणे देशाच्या मानसिकतेत आहेत, गरिबांना आपल्या देशात दरिद्रनारायण म्हटले गेले आहे, त्यात त्यांच्या अहंकाराची पुर्ती होते म्हणुन ते गरिब राहातात" ते अशी बगल देतात पण ते स्वत: मात्र रोल्स राईस वापरत असत. ख्रिस्तोफर काल्डर हा त्यांचा एकेकाळचा संन्यासी आणि नंतरचा टीकाकार म्हणतो की, "मी (रजनीशांनी) शेकडो मुलींसोबत सेक्स केला आहे, असे रजनीशांनी अमेरिकन प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. भारतीय गुरूंनी कधी आपल्या शिष्यांसोबत असले प्रकार केल्याचे दिसत नाही...." ओशोवर्ल्ड डॊट कॊम वर संकलीत केलेल्या त्यांच्या चरित्रात असे वाचनात आले की "बुध्दत्व प्राप्तीनंतर मी सेक्स केलेला आहे, आणि चांगल्याप्रकारे केलेला आहे...सेक्समुळे बुध्दत्वावर काहीही परिणाम होत नाही..."
रजनीश नायट्रस ऒक्साईड (मादक पदार्थ) घेत. यावरुन ते स्वत:ला "रबर होज बुध्दा" असेही म्हणवुन घेतात.
रजनीश कधीच कुणाची भीड-भाड ठेवत नसत. म.गांधी, मदर तेरेसा, येशु ख्रिस्त, ख्रिश्चनिटी, हिंदु धर्म, तुलसीदास, वेद, राम या सर्वांवर रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानातुन ठिकठीकाणी ताशेरे ओढलेले दिसतात. "पूर्व आणि पश्चिम, आध्यात्म आणि भौतिकता, आत्मा आणि शरीर यातील दरी मिटवण्याचा माझा प्रयत्न आहे" असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
तशी रजनीशांनी लोकनिंदेची कधीच दखल घेतली नाही. लोकस्तुतीची मात्र त्यांनी निश्चितच दखल घेतली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. रजनीशांनी एका व्याख्यानात त्याची दखल घेतली होती.
विवेकानंदांवर तुम्ही का बोलत नाही? असे त्यांच्या शिष्याने रजनीशांना विचारले होते. तेव्हा व्याख्यानात "विवेकानंद हे काही जाग्रत पुरुष नव्हते, त्यांना महापंडित म्हणता येईल.... आणि या तथाकथित पंडितांवर माझे किती प्रेम आहे हे तुम्ही जाणताच. विवेकानंदांनी हिंदुधर्माच्या अहंकाराला खतपाणी मात्र घातले....मी विवेकानंदांच्या गुरुंवर (रामक्रष्ण परमहंस) बोलु शकतो, कारण ती गोष्टच वेगळी आहे...
विवेकानंदांचे अभिमानी दत्ता बाळ यांनी रजनीशांच्या या वक्तव्यावर टीका केली, तेव्हा मात्र रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात दत्ता बाळ यांची यथेच्छ टिंगल उडविली होती.
रजनीशांच्या विवाहसंस्थेला विरोध होता....विवाह हे सुरक्षीत वातावरण आहे, त्यात प्राण नाही, त्यात प्रेम नाही असे ते सांगतात.
रजनीश कितीही बाता मारत असले, तरी ते ठिकठिकाणी उघडे पडलेले दिसतात. रजनीशांनी विवाह केला नाही. त्यांची एक प्रेयसी मात्र होती. क्रिस्टिन वाल्फ़ या नावाची इंग्रज तरूणी. ती त्यांच्या पूर्व जन्मीची प्रेयसी आहे, त्यांनी तिला पुढच्या जन्मात भेटण्याचे वचन दिले होते असे रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले. पण पुढे या पूर्वजन्मीच्या प्रेयसीने मात्र मुंबईच्या एका हॊटेलमध्ये झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्त्या केली. महिनाभरानंतर रजनीशांनीही जगाचा निरोप घेतला. गेल्यावरसुद्धा या माणसा भोवती एक गारूड उभे आहे. पुण्यातील त्यांच्या आश्रमातील समाधीवर लिहिले आहे - OSHO NEVER BORN NEVER DIED. ONLY VISITED THIS PLANET EARTH BETWEEN 11 DECEMBER 1931 AND 19 JANUARY 1990. (क्रमश:)