२१ जानेवारी, २०११

माईंड इज ए मिथ


यापूर्वी इथे यु.जी. कृष्णमूर्तींबद्दल एक लेखमाला लिहिण्याचा योग आला होता. त्यात यु.जी. या व्यक्तीमत्वाबद्दल बरीच माहिती सादर करता आली असली तरी त्यात लोकांशी झालेला युजींचा वास्तविक संवाद हा अत्यंत कमी होता. यु.जी. कृष्णमूर्तींसोबत साधलेल्या संवादांचे संकलन असलेली "माईंड इज ए मिथ", "मिस्टिक ऑफ एन्लायट्न्मेंट" आणि "थॉट इज युवर एनेमी" ही पुस्तके मी पुन्हा एकदा वाचत आहे; त्यातीलच एका पुस्तकातील प्रकरणाचा मी मराठीमध्ये अनुवादीत केलेला हा काही भाग. वाचकांना आवडल्यास, पुढील भाग अनुवादीत करायला आनंद वाटेल; मी एरव्ही वाचणार आहेच. पण ते वाचन इथल्या वाचकांनाही सहभागी करता आले तर आणखी आनंद होईल. 
ज्यांनी पूर्वीची लेखमाला वाचलेली नसेल आणि वाचण्याची इच्छा असेल तर कृपया सर्व सातही भागाचे दुवे खाली दिले आहेत.


, , , , , ,
    



माईंड इज ए मिथ
यु.जी. कृष्णमूर्तींशी प्रश्नोत्तरे
भाग एक
सर्वकाही फोडून टाकणारी निश्चितता

युजी: मी कधीच व्यासपीठावर बसून बोलत नाही. किती कृत्रिम असते ते. काही गोष्टी गृहित धरून किंवा अस्पष्ट अर्थात समोर ठेऊन बसून बोलत राहाणे वेळेचा अपव्यय आहे. रागावलेला माणूस रागाबद्दल बोलत बसत नाही आणि रागाबद्दल मोठ्या आनंदाने संवादही साधत नाही; त्याचे माथे फिरलेले असते. त्यामुळे तु रागीट आहेस आणि म्हणून तुला अडचणी येतात हे मला सांगू नकोस. क्रोधाबद्दल बडबड कशाला हवीय? केव्हातरी, कसेतरी तुम्हाला राग येणे कायमचे थांबेल आशेवर तुम्ही जगता आणि त्यातच मरता. त्या आशेचेच ओझे तुमच्यावर आहे, आणि त्यात हे जीवन निरर्थक वाटले की तुम्ही पुनर्जन्माचा शोध लावता.    
प्रश्न: ठीक आहे, तुमच्या बोलण्यातून कुणालाही आशा मिळते असे बिलकुल म्हणता येणार नाही. मग सांत्वन किंवा सूचना द्यायच्या नसूनही तुम्ही का बोलत राहाता?
युजी: मग मी करावे तरी काय? तुम्ही येता, मी बोलतो. तुम्हाला दगड फेकून मारून मी तुमच्यावर टिका करत राहावी हे तुम्हाला हवे आहे? ते निरर्थक आहे कारण तुमच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही कारण तुमच्याभोवती एक अभेद्य चिलखत उभे आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हाला तुमची स्थिती समजून घेता येत नसल्याने, तुम्ही विचारांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देता ज्यात तुमच्या कल्पना आणि मन्तव्य असते. विचार ही प्रतिक्रिया असते. तुम्ही ज्या वेदनांतून जात आहात त्या वेदना, त्यांचा अनुभव न घेता इथे माझ्यात प्रतिबिंबीत होत आहेत. इथे त्यांचा बिलकुल अनुभव नाही. बस्स, तेवढेच. या नैसर्गिक स्थितीत तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवतात, मग तुम्ही त्यांना व्यक्तिश: ओळखत असाल किंवा नसाल. अलिकडेच माझा सर्वात मोठा मुलगा जवळच्याच हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे मरणासन्न होता. मी ही त्याच परिसरात होतो आणि त्याला नेहमी भेटायला जात असे. माझे मित्र सांगतात की तो मरेपर्यंत मी मलासुद्धा तशाच तीव्र वेदना होत होत्या. मी काहीही करू शकत नाही. वेदना ही जीवनाचीच एक अभिव्यक्ती आहे. त्याच्या कॅन्सरवर मी कसलातरी उपाय करावा असे त्यांना वाटत होते. मी जर ट्यूमरला हात लावला तर तो आणखी वाढेल. कॅन्सर ही पेशींची वाढ, जीवनाची आणखी एक अभिव्यक्ती असते, आणि त्यात मी काही केले तर तो आणखी मजबूत होईल.
प्रश्न: तर मग तुम्हाला इतरांच्या वेदना कळतात तरी तुम्ही त्यापासून बाजूला असता असेच ना?
युजी: वेदना हा एक अनुभव आहे, आणि इथे (स्वत:कडे बोट दाखवून) कसलाही अनुभव नाही. तुम्ही एक गोष्ट आहात आणि जीवन दुसरी एक गोष्ट आहे असे नाही. ती एकच एक सबंध हालचाल आहे आणि त्याबद्दल मी काहीही सांगितले तरी ते चुकीचे, गोंधळात टाकणारे आहे. तुम्ही एक "व्यक्ती", एक "वस्तू", किंवा "इतर" गोष्टींनी व्यापलेली स्वतंत्र आकृती नाही आहात. ही एकच एक, सबंध हालचाल तुम्हाला अनुभवता येणारी गोष्ट नसते.
प्रश्न: पण अनुभवाला येत नसतानाच जगत असणे आमच्या मनाला अतार्किक वाटते.
युजी: मी जे बोलतोय त्यामुळे तुमच्या तार्किक चौकटीत गोंधळ उडतो. ती विभक्त बांधणी तशीच अबाधीत ठेवण्यासाठी तुम्ही तर्क वापरत आहात, बाकी काही नाही. तुमचे प्रश्न हे पुन्हा एकदा विचारच आहेत आणि प्रतिक्रियात्मक आहेत. सगळे विचार प्रतिक्रियात्मक असतात. तुम्ही जीव तोडून हे विचारांचे चिलखत वाचवत आहात, आणि जीवनाच्या हालचालीमुळे तुमचा आधार नष्ट होईल अशी भीती तुम्हाला वाटतेय. जीवन हे खळाळत वाहाणार्‍या नदीसारखे, तिला घालून दिलेल्या सीमांना मोडून टाकील अशा प्रकारे दोन्ही तीरांवर आदळत असते. तुमच्या विचारांची रचना आणि तुमची वास्तविक मानसिक चौकट मर्यादीत आहे, पण जीवन मात्र तसे मर्यादीत नाही. त्यामुळेच स्वतंत्र्यातील जीवन हे शरीराला वेदनादायक असते; इथे होत असणारा ऊर्जेचा प्रचंड खळखळाट शरीरासाठी वेदनादायक आहे, तो होत राहातो तशी प्रत्येक पेशी फुटत जाते. तुमच्या अत्यंत विचित्र स्वप्नातही तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही. त्यामुळेच मी ते कसेही सांगितले तरी ते चुकीचेच होईल.
प्रश्न: गुरू आणि पुरोहितदेखील आम्हाला हेच शिकवतात की वेगळी अशी काही रचना नाही आणि आमच्या प्रश्नांचा तोच उगम आहे. तुम्ही वेगळे काय सांगू शकाल?
युजी: तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही, ते फक्त ठणठणीत कोरडे शब्द आहेत. जीवनाच्या एकच एक सबंध हालचालीत तुमचा विश्वास हा फक्त एक निराधार विश्वास असतो, त्यात निश्चितता नसते. गुरू आणि धर्मग्रंथातून तुम्हाला जे शिकवले गेलेय ते तुम्ही अत्यंत हुशारीने तर्कात बांधले आहे. तुमचे विश्वास हे, ते सांगणार्‍या व्यक्तीकडून आंधळ्यासारखे स्वीकारलेले आहेत, सगळा वापरलेला माल. तुम्ही तुमच्या विश्वासापेक्षा वेगळे नाही. जेव्हा तुमचे मौल्यवान विश्वास आणि भ्रम समाप्त व्हायला येतात, तेव्हा तुमचाही शेवट येतो. माझे बोलणे हे तुमच्या वेदनेला दिलेल्या प्रतिसादापेक्षा जास्त काहीही नाही, त्या वेदना तुम्ही तुमचे प्रश्न, तर्कपूर्ण युक्तीवाद आणि इतर मन्तव्यांतून व्यक्त करताय.
प्रश्न: पण तुम्ही इथे बसून तासामागून तास बोलत राहाताय त्यातून निश्चितच हे दिसून येते की तुमचेही एक तत्वज्ञान, एक संदेश आहे, जरी तो ऐकणार्‍यांना नीट समजत नसला तरी.
युजी:  बिलकुल नाही. इथे बोलणारा, सल्ला देणारा, वेदना अनुभवणारा किंवा काहीही अनुभवून घेणारा कुणीही नाही. एखादा बॉल भिंतीवर फेकला की तो परत विरूध्द बाजूला फेकला जातो, फक्त तेवढेच. माझे बोलणे हे तुमच्या प्रश्नाचा थेट परिणाम आहे. माझे स्वत:चे इथे काहीही नाही, कोणताही सुस्पष्ट किंवा लपलेला अजेंडा नाही, कोणतेही प्रॉडक्ट विकायचे नाही, कसल्याही शस्त्राला मी धार लावत नाही आणि काहीही सिध्द करीत नाहीय.
प्रश्न: पण शरीर हे क्षणभंगुर असते, आणि आपल्या सगळ्यांना कसलेतरी अमरत्व हवे असते. साहाजिकच आपण एका मोठ्या तत्वज्ञानाकडे, धर्माकडे, आध्यात्माकडे वळत असतो. निश्चितच, जर..
युजी: शरीर फक्त अमर असते. वैद्यकिय मृत्यू झाल्यानंतर नवीन आकारात जीवनाच्या प्रवाहात राहून ते त्याचे रूप बदलते. शरीराला "पुनर्जन्म" किंवा कसल्याही प्रकारच्या अमरत्वाशी काही घेणेदेणे नाही. त्याचा आत्ता, या क्षणी जीवंत राहाण्यासाठी आणि वाढण्यासाठी संघर्ष चालू असतो. भीतीमुळे विचारातून तयार केलेला बनावट "पैलतीर" हीच खरी, तसलेच आणखी पुढेही चालू राहाण्याची मागणी आहे. त्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होण्याची ही मागणी हीच अमरत्वाची मागणी आहे. असले अमरत्व शरीराला नको आहे. कायम टिकून राहाण्याची विचाराची मागणी शरीराची घुसमट करून दृष्टीकोन धूसर करीत आहे. विचार हा स्वत:च स्वत:चे रक्षण करीत स्वत:ला टिकवून ठेवण्यापुरते पाहाण्यासोबतच, शरीरही टिकवायला पाहातो. दोन्हीही पूर्णत: चुकीचे आहेत.
प्रश्न: असे दिसते की मूळापासूनच कसलातरी पूर्णत: बदल व्हायला हवा, पण तशी इच्छा मध्ये येत नसेल तर...
युजी: जर ते तुमच्या शक्तीच्या बाहेर घडले, तर खेळ खलास. ते थांबवण्याचा, ती परिस्थिती बदलण्याचा तुमच्याकडे कसलाच मार्ग नसेल. त्यातून जाण्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. वास्तवावर प्रश्नचिन्ह उभे करून काहीच साधणार नाही. त्यापेक्षा तुमची ध्येये, तुमच्या श्रध्दा आणि मान्यतांवर प्रश्नचिन्ह उभे करा. त्यांच्यापासून तुम्ही मुक्त व्हायला हवे, वास्तवापासून नव्हे. तुम्ही विचारत असणारे हे बिनबुडाचे प्रश्न तुमची ध्येये आपोआप सुटली की गायब होतील. ते एकमेकांवर अवलंबून आहे. यातला एक दुसर्‍याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही.
प्रश्न: हे एवढे दृश्यच भयंकर आहे. आम्हाला अराजक, पूर्णत: नाश ओढवण्याची भीती वाटते.
युजी: जर तुमच्या नाकातोंडात पाणी जात असेल, तर जाऊ द्या. तुम्ही बुडणार नाही. पण मी खात्री दिल्याने काय होणार आहे? मला वाटते, ते निरर्थक असेल. तुम्ही जे करताय ते तुम्ही करीत राहाल; त्यातील निरर्थकता तर तुमच्या लक्षातही येत नाही. मी तुम्हाला सांगतो, आशा आणि सातत्याच्या इच्छेतून होत असलेल्या गोष्टी करणे तुम्ही थांबवता तेव्हा, त्यासोबतच तुम्ही करीत असलेल्या सर्व गोष्टी थांबतात. तुम्ही तरंगत राहाल. पण तरीही तिथे आशा राहातेच; "कदाचित काहीतरी मार्ग असावा, कदाचित मी योग्यप्रकारे करीत नसेल." दुसर्‍या शब्दांत, कशावरही अवलंबून राहाण्याचा मूर्खपणा आपल्याला स्वीकारावा लागतो. आपल्या अगतिकतेचा सामना आपण करायलाच हवा.
प्रश्न: आमच्या प्रश्नांवर काहीतरी उपाय असेल असे वाटून घेण्याशिवाय काहीच हाती नाही. 
युजी: तुमचे प्रश्न तसेच राहातात ते तुम्ही शोधलेल्या चुकीच्या उपायांमुळे. उत्तरे जर तिथे नसतील, तर प्रश्नही तिथे राहू शकणार नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत; तुमचे प्रश्न आणि त्यावरचे उपाय एकत्रच जातात. तुमचे प्रश्न मिटवण्यासाठी निश्चित उत्तरे तुम्हाला वापरायची असल्याने, ते प्रश्न तसेच टिकून राहातात. या सर्व धार्मिक आणि पवित्र लोकांनी, मानशास्त्रज्ञ, राजकारण्यांनी सांगितलेले असंख्य उपाय, ही काही खरीखुरी उत्तरे नव्हेत. तेवढे तरी निश्चित आहे. ती लागू पडणारी उत्तरे असती, तर प्रश्न आतापर्यंत शिल्लक राहिले नसते. ते फक्त आणखी कसून प्रयत्न करायला, आणखी ध्यान करायला, आणखी विनम्र व्हायला, तुमच्या डोक्यावर उभे राहायला आणि असल्याच अगणित गोष्टी करायला सांगतात. ते तेवढेच करू शकतात. या तथाकथित उत्तरांसोबतच शिक्षक, गुरू किंवा नेत्याने सांगितलेल उपायदेखील तेवढेच चुकीचे आहेत. ते काही प्रामाणिकपणे काम करीत नाहीत, फक्त बाजारात उभे राहून भिकार, तकलादू वस्तू विकत आहेत. तुमची आशा, भीती आणि भाबडेपणा दूर सारून त्या मूर्खांना बिझिनेसमन सारखी वागणूक दिली तर ते कोणताही माल देत नाहीत, आणि कधीच देऊ शकणार नाहीत हे तुम्हाला दिसेल. पण तज्ञ व्यक्तींनी दिलेल्या बोगस वस्तू तुम्ही विकत घेत जाता.. घेत जाता.
प्रश्न: पण पूर्ण क्षेत्रच एवढे गुंतागुंतीचे आहे की आत्मजागरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी काळजीपूर्वक अभ्यास करून जीवन अर्पण केलेल्या व्यक्तींवर अवलंबून राहाणे आवश्यक वाटते. 
युजी: त्यांचे सर्व तत्वज्ञान प्रत्येकाच्या शरीरातच असलेल्या ज्ञानाच्या पासंगालाही पुरणार नाही. ते सांगत असलेली मानसिक कृती, आध्यात्मिक कृती, भावनिक कृती आणि भावना ह्या सर्व गोष्टी एकच एक सबंध प्रक्रिया आहे. शरीर हे अत्यंत हुशार आहे आणि या वैज्ञानिक आणी धार्मिक शिकवणुकीची त्याला टिकून राहाण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी काहीच गरज नाही. जीवन, मृत्यू आणि मुक्तीबद्दलच्या तुमच्या सर्व रंगीबेरंगी कल्पना बाजूला सारा आणि शरीर अबाधीत, स्वरबध्दपणे कार्य करीत राहिल. त्याला माझी किंवा तुमची गरज नाही. तुम्हाला काहीएक गोष्ट करायची गरज नाही. अमरत्व, पुनर्जन्म किंवा मृत्यूबद्दलचे मूर्खपणाचे प्रश्न त्यानंतर तुम्ही कधीही विचारणार नाही. शरीर अमर आहे.  
प्रश्न: आम्हाला दिलासा, नियंत्रण मिळण्याची प्रत्येक शक्यता तुम्ही निर्दयपणे छाटून टाकलीत, दु:खापासून पळण्याची धूसर आशाही शिल्लक ठेवली नाहीत. स्वत:चा नाश करून घेण्याशिवाय काहीही हातात नाही असे वाटते. मग आत्महत्या का करू नये? 
युजी: तुम्ही आत्महत्या केलीत, तरी परिस्थितीत कसलाच फरक पडणार नाही. आत्महत्या झाल्यानंतर काही क्षणातच शरीर सडायला लागून, जीवनाच्या इतर प्रकारे संघटीत रूपांत रूपांतरीत होईल, त्यामुळे काहीही संपणार नाही. जीवनाला सुरूवातही नाही आणि शेवटही. मृत आणि सडणारे शरीरावत थडग्यातील मुंग्यांची भूक भागेल आणि सडणार्‍या प्रेतांतून मृदा समृध्द होणारी रसायने मिळून जीवनाच्या इतर रूपांचे पोषण होईल. तुम्ही तुमचे जीवन संपवू शकत नाही, ते अशक्य आहे. शरीर हे अमर आहे आणि "अमरत्व आहे काय?" वगैरे मूर्खपणाचे प्रश्न ते विचारत नाही. त्याला माहित असते की विशिष्ट रूपात समाप्त होऊन ते इतर रूपात टिकून राहिल. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचे प्रश्न हे नेहमीच भीतीतून विचारले जातात. तुमच्या "आध्यात्मिक जीवनाचे" नेतृत्व घेतलेले ते नेते कधीच या गोष्टींबाबत प्रामाणिकपणे बोलणार नाहीत, कारण ते भीती, भविष्यातील जीवनाबद्दलचे अंदाज आणि मृत्यूच्या "गूढावर" स्वत:ची उपजिवीका चालवितात.
आणि तुम्ही, त्यांचे चेले, तुम्हाला काही खरोखर माणसाच्या भविष्याबद्दल घेणेदेणे नाही, तुम्हाला फक्त तुमच्या स्वत:च्या क्षुल्लक चिंता आहेत. मानवता, दया, करूणा आणि इतर गोष्टींबद्दल तासन तास बोलत राहून तुम्ही फक्त एक विधी पार पाडता. तुम्हाला रूचि असते ती तुमच्या स्वत:मध्ये, नसता तुमची भविष्यातील जीवने आणि तुमच्या सुनिश्चित मृत्यूबद्दल असले पोरकट प्रश्न उभे राहिले नसते.
प्रश्न: पण आमच्यापैकी बहुतेकांसाठी जीवन ही एक पवित्र गोष्ट आहे. आम्ही आमच्या पोराबाळांचे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आणखी युध्दे टाळण्यासाठी संघर्ष करतो..
युजी: तुम्ही सगळे माथेफिरू लोक आहात. तुम्ही जनन दरावरील नियंत्रणाविरोधात बोलता, अमूल्य जीवनाबद्दल आणि त्यानंतर बॉम्ब्ज आणि नरसंहाराबद्दल बडबडत राहाता. किती हास्यास्पद आहे. तुम्ही बॉम्बफेक, उपासमार, गरीबी आणि दहशतवाद यातून हजारो लोक मारत असतानाच तुम्हाला अजून जन्म न झालेल्या जीवनाबद्दल चिंता आहे. तुमची जीवनाबद्दलची "चिंता" फक्त त्यातून राजकिय मुद्दा उकरून काढण्यापुरतीच आहे. ती फक्त सुशिक्षित लोकांची एक चर्चा आहे. मला त्यात रूची नाही.
प्रश्न: होय, पण आमच्यापैकी अनेकजण हे पाहातात आणि या गोष्टी बदलण्याचीही त्यांची इच्छा असते. हा काही आमचा फक्त अहंकार नाही.
युजी: खरंच तुम्हाला त्यात रूची आहे? तुम्हाला मानवाच्या भविष्यात खरंच रूची आहे? राग, खरेपणा आणि काळजी या तुमच्या अभिव्यक्तींना माझ्याकडे काहीही किंमत नाही. ते फक्त विधी आहेत. तुम्ही बसता आणि बोलता, बस्स तेवढेच. तुम्ही बिलकुल चिडलेले नाही आहात. तुम्ही या क्षणी खरोखर चिडलेले असता तर हा प्रश्न तुम्ही स्वत:ला देखील विचारला नसता. तुम्ही अखंडीतपणे रागाबद्दल बोलत राहाता. रागावलेला माणूस, त्याबद्दल बोलणार नाही. त्या रागाच्या बाबतीत तो सामावून घेऊन शरीराने अगोदरच त्याची कृती करून टाकलेली असते. राग तिथल्या तिथे जळून जाऊन संपतो. तुम्ही काही करीत नाही; शरीर फक्त तो सामावून घेते. बस्स, तेवढेच. तुमच्यासाठी हे फारच जास्त असेल, त्यामुळे ताण येत असेल तर, कधीच धार्मिक माणसांकडे जाऊ नका. गोळ्या खा, काहीही करा, पण पवित्र धंद्यातून तुम्हाला मदत मिळण्याची अपेक्षा करू नका. तो वेळेचा अपव्यय आहे.
प्रश्न: तुम्ही मला सगळंच सोडायला लावताय, सगळाच त्याग..
युजी: जोपर्यंत तुम्हाला त्याग करण्यासारखे, सोडून देण्यासारखे काही आहे असे वाटेल तोपर्यंत तुम्ही हरवलेले आहात. पैशांचा आणि जीवनातील गरजांचा विचारही न करणे हा एक आजार आहे. जीवनाच्या मूलभूत गरजाही स्वत:ला नाकारणे हे दमन आहे. स्वत: ओढवून घेतलेल्या निष्कांचनपणामुळे तुम्हाला जागरूकता वाढविता येऊन ती जागरूकता सुखी होण्यासाठी वापरता येईल असे तुम्हाला वाटते. विसरा रे. जागरूकतेबद्दलच्या सर्व संकल्पना टाकून दिल्यानंतर आणि कॉम्प्युटरसारखे काम करणे सुरू केल्यानंतर तुम्हाला शांतता मिळेल. तुम्ही एक यंत्र असायला हवे, या जगात आपोआप कार्य करायला हवे, तुमच्या कृत्यांबद्दल ते होण्यापूर्वी, होताना किंवा झाल्यानंतर प्रश्नच पडायला नकोत.
प्रश्न: योगातील पध्दती, धार्मिक परित्याग किंवा नैतिक पोषणाचे मूल्य तुम्ही नाकारत आहात काय? माणूस निश्चितच यंत्रापेक्षा काहीतरी जास्त आहे.
युजी: सर्व नैतिक, आध्यात्मिक, तात्विक मूल्ये खोटी आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणारे मानसशास्त्रज्ञ आता थकले आहेत आणि उत्तरांसाठी आध्यात्मिक धेंडांकडे वळायला त्यांनी सुरूवात केलीय. ते हरवले आहेत, आणि तरीही उत्तरे ही त्यांच्याकडूनच यायला हवीत, बुरसटलेल्या निरूपयोगी धार्मिक परंपरा आणि पवित्र धंद्यातून नव्हे.
प्रश्न: या सर्व परिस्थितीतून फक्त हताशा येतेय. मसिहा, महात्मा आणि प्रेषितांवर लोक अवलंबून राहिले यात काहीच आश्चर्य नाही.
युजी: या तथाकथित मसिहा आणि प्रेषितांनी जगात फक्त दु:ख मागे ठेवले आहे. एखादा आधुनिक मसिहा तुमच्यासमोर आला, तर त्याला तुम्हाला कसलीही मदत करता येणार नाही. आणि त्याला मदत करता आली नाही, तर कुणालाच मदत करता येणार नाही.
प्रश्न: एखादी अभिषिक्त व्यक्ती, उदाहरणार्थ एखादा तारणहार किंवा ऋषिला काहीच करता येण्यासारखे नसेल, तर धर्मग्रंथ म्हणतात त्याप्रमाणे, आपण "सत्य जाणून घ्यायला हवे आणि सत्य आपणा सर्वांना मुक्त करील."  
युजी: सत्य ही एक हालचाल असते. तुम्ही ते कैद करू शकत नाही, साठ्वू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही अथवा तुमचे हेतू साध्य करण्यासाठी वापरूही शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही सत्य कैद करता, ते सत्य राहात नाही. माझ्यासाठी जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला देता येत नाही. इथे असणारी निश्चितता दुसर्‍याकडे सोपवता येत नाही. याच कारणामुळे गुरूगिरीचा सर्व धंदा पूर्णत: एक फाजीलपणा आहे. नेहमीच हे असेच असत आले आहे, आत्ताच असे आहे असे नाही. पुरोहित, गुरूंना समृध्द करण्यासाठी तुम्ही काटकसर करता. तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा दाबून टाकता आणि तो माणूस मात्र रोल्स रॉयस कारमध्ये फिरतो, राजासारखा खातो आणि महाराजासारखा वागवला जातो. तो आणि पवित्र धंद्यातील दुसरे लोक इतरांचा मूर्खपणा आणि भोळेपणावर पोसले जातात. असेच, राजकारणी सुध्दा माणसाच्या भुक्कडपणावर जगतात. सगळीकडे हे असेच आहे.
प्रश्न: तुमचा जोर नेहमीच नकारात्मक बाजूवर आहे, प्राचिन "नेति नेति" या दृष्टीकोनावर. आपला नैसर्गिक जन्मसिध्द हक्क असणारी स्थिती एखाद्याने शोधण्यासाठी धर्मग्रंथ, गुरू आणि अधिकारी व्यक्तींसह सर्व अतिरिक्त पसारा फेकून देण्याकडे तुमचा इशारा आहे ना?
युजी: नाही. मुक्तीसाठी गुरू, मंदिरे आणि पवित्र ग्रंथांपासून फारकत घेणे ही पूर्व अट असणे चमत्कारिक आहे. फक्त तुमच्या अडचणी, वेदना टाळण्यासाठी तुम्ही उत्तरे शोधत असता. जन्म झालेली प्रत्येक गोष्ट वेदनादायी आहे. ते तसे का आहे हे विचारण्याचा काहीही उपयोग नाही. ते तसे आहे. गुरू आणि अधिकारी व्यक्तींना नाकारून तुम्ही कसल्यातरी दैवी वेदना सहन कराल; वेदना सहन केल्याने तुम्हाला कसलीही आध्यात्मिक मदत मिळू शकणार नाही. कसलाही मार्ग नाही.
प्रश्न: पण आम्ही तुम्हाला एक अतिवादी, एक मानवद्वेष्टा म्हणून ओळखतो. तुम्ही फक्त माणसाच्या सध्याच्या हाल अपेष्टांवर टिकाच करीत नाहीय तर त्याच्या वेगळ्याच नियतीकडे निर्देश करताय, नाही?
युजी:  तुमच्या प्रश्नांसाठी एक उपाय आहे - मृत्यू. तुम्हाला ज्या मुक्तीमध्ये रूची आहे ती मुक्ती फक्त मरताना मिळेल. प्रत्येकाला शेवटी मोक्ष मिळतो, कारण मोक्षामध्ये नेहमीच मृत्यूची सावली आहे, आणि प्रत्येकजण मरण पावतो.
प्रश्न: पण मला वाटते तुम्ही कोणत्याही काव्यात्म किंवा काल्पनिक अर्थाने मृत्यूकडे पाहात नाही आहात. तुम्ही वर्णन करीत असणारा मृत्यू हा मानसिक, कल्पित किंवा अस्पष्ट रूप असलेला मृत्यू नाही तर खरोखर, वास्तविक शारीरिक मृत्यू आहे, होय ना?  
युजी: होय. तुम्ही मरता तेव्हा शरीर हे पसरलेल्या स्थितीत असते आणि कार्य करणे थांबवते, आणि तोच शेवट आहे. पण या बाबतीत शरीराने स्वत:ला कसेतरी पुनरूज्जीवीत केले आहे. आता ते नेहमीसारखे दररोजच होते; ही सर्व प्रक्रिया स्थिर होण्यासाठी अनेक वर्षे लागली. माझ्यासाठी आता जीवन आणि मृत्यू एकच आहेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी फक्त एवढाच इशारा देतो की तुमचे ध्येय असणारा मोक्ष खरोखर आला, तर तुम्ही मराला. शारीरिक मृत्यू होईल, कारण त्या स्थितीत जाण्यासाठी शारीरिक मृत्यू व्हायलाच हवा. तुम्हाला मजा वाट्ते म्हणून तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवत खेळ खेळला जातो. पण तुम्ही जास्तवेळ श्वास रोखून ठेवला तर मरण ओढवते.
प्रश्न: त्यामुळे आपल्या ध्यानाचा विषय करून, त्याला अशा काल्पनिक, गूढ प्रकारे मानून मृत्यूबद्दल जागरूक व्हायला हवे. नाही का?
युजी: त्या स्थितीचे ध्यानातील पूर्ण जागरूकता असलेली स्थिती म्हणून वर्णन करणे कल्पित, निरर्थक गोष्ट आहे. जागरूकता! स्वत:ला आणि इतरांना मूर्ख बनवण्यासाठी वापरण्यात येणारी किती चमत्कारिक युक्ती! तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक होऊ शकत नाही, झालात तर तुम्ही फक्त आत्मकेंद्रीत आणि बावळट बनता. जहाजचालक असणारा एक माणूस मला एकदा भेटला. तो "निष्क्रिय जागरूकता" याबद्दल वाचत होता आणि त्याने तसे प्रत्यक्ष वागण्याचा प्रयत्न केला. तो चालवत असलेल्या जहाजाच्या, त्याने आयुष्यात पहिल्यांदाच चिंध्या केल्या. आपोआप चालत राहून तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक राहाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला वेड लागेल. ध्यानाच्या पायर्‍या कसल्या शोधताय? जेवढे आहे तेवढे पुरे. ध्यानस्थ स्थिती सर्वात खराब आहे.
प्रश्न: पण आपण पवित्र मानलेली प्रत्येक गोष्टच आपल्याला सोडून देता येत नाही.
युजी: निश्चितच, मला सोडून देऊ शकतो; तो फक्त रोमॅण्टीक पसारा आहे. मी तुम्हाला दिलेला कोणताही उपाय तुमच्या शोधाचा भाग बनेल; म्हणजेच आणखी रोमॅण्टीक पसारा. त्यामुळेच मी कधीच सांगताना थकत नाही की माझ्याकडे विकण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही, एखादी चांगली पध्दतही नाही ज्यातून तुम्हाला तुमचा शोध पुढे चालु ठेवता येईल. मी त्या पूर्ण शोधाचीच वैधता नाकारतो. तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही. इतर कुठेतरी तुमचे नशीब अजमावून पाहा.
प्रश्न: पण निश्चितच तुम्ही पण एक माणूस आहात आणि मानवतेच्या कामी पडू ईच्छिता, दया म्हणून तरी?
युजी:  तारणहार म्हणून माझी कुणी निवड केलीय? तुमची सेवा करू इच्छिणारे असंख्य संत, प्रेषित आणि त्राते तुमच्याकडे आहेत. आणखी एकाची भर कशाला टाकता? येशू म्हणाला, "वाजवा म्हणजे दार उघडेल. माझ्या मागून या." काही कारणामुळे मी ते करू शकत नाही. आपण बरेच रान पळालो आहोत. आपण हा संवाद उद्या पुढे चालू ठेवला तर बरे होईल.
प्रश्न: मग उद्यापर्यंत..
युजी: धन्यवाद.


( मराठी अनुवाद - यशवंत कुलकर्णी  )