२१ ऑक्टोबर, २०१०

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा (अंतिम)

युजी कृष्णमूर्ती या व्यक्तीमत्वाबद्दल इथे लिहीत असताना आणि बाकीच्या दैनंदिन निरिक्षणातदेखील माझी मलाच एक गोष्ट सुस्पष्टपणे जाणवली. आपल्याला जे स्पर्शून जातं ते सगळ्यांना स्पर्शून जाईलच असा सरळसोट नियम असू शकत नाही, होऊ शकत नाही - कारण माणसं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि त्यातून प्रत्येकाचं "रिस्पॉन्स मॅकॅनिझम" वेगवेगळं झालेलं असतं; त्याबद्दलही ठाम आडाखे बांधता येत नाहीत. पण या लेखमालेत आलेल्या जवळपास सर्वच प्रतिक्रियांवरून (अगदी बोटावर मोजण्याइतक्या असल्या तरी) पुन्हा एकदा माझा यावर विश्वास बसला की लोक अजूनही वाचतात आणि काही नवं समजून घेण्याची आणि लिहीणार्‍याला प्रोत्साहन देण्याची त्यांची मानसिकता असते; ती लिहिणार्‍यांसाठी खरंच फारच महत्वाची आहे. त्यामुळे नाव न घेता, ज्ञात-अज्ञात प्रत्येक वाचकाचे व्यक्तीश: आभार मानतो आणि या लेखमालेच्या समारोपाकडे वळतो... (मिसळपाव च्या वाचकांना उद्देशून असलेला परिच्छेद..)
                                                                                             ----

मागच्या सहा लेखांत युजी या व्यक्तिमत्वाचा (!) पुसटसा का होईना पण बराचसा भाग रेखाटून झाला आहे. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी युजींना घडलेल्या कॅलॅमिटीचा नंतर ८९ व्या वर्षी त्यांचे प्राणोत्क्रमण होईपर्यंतच्या आयुष्यात त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये प्रभाव दिसत राहिला. पण दुर्दैवाने, युजींनी त्या घटनेभोवती किंचीतही वलय उमटू दिले नाही. आध्यात्मिक क्षेत्राचे अभ्यासक/ स्वत:चा अध्यात्मात तेवढा (म्हणजे केवढा हेही एक कोडेच आहे!) अभ्यास नाही असे मानणारे सर्वसामान्य वाचकही या घटनेला कितीही ओढून ताणून एन्लायटन्मेंट/मुक्ती/मोक्ष याच आपल्याला नुसते ऐकून ज्ञात असलेल्या स्टेशनांवर आणून पोचवत असले तरी युजींनी आयुष्यभर ते नाकारले. युजींचा मूळ स्वभाव निर्दयी, कठोर होताच; सदयता, मृदूता अंगी बाणवण्यासाठी, स्वत:चा शोध घेण्यासाठी युजींनी जीवतोडून केलेली साधना निष्फळ ठरली होती; शेवटी स्वत:मध्ये असलेल्या निर्दयता, मोह याच घटकांना (!) आधार मानून बाकी जे-जे काही शिकवले, सांगितले जाते ते सर्व युजींनी भिरकावून दिले होते (पण म्हणून ते लोकांचे खून करीत किंवा लूटमारही करत सुटले नव्हते). ते फक्त जे जसे आहे ते तसेच स्वीकारणे होते. सगळ्या साधना सोडून दिल्यानंतर, बैराग्यासारखे जगभरात विविध ठिकाणचा प्रवास करीत करीत ते लंडन आणि तिथून पॅरीसमध्ये आले असताना, जवळचे सगळे पैसे संपून गेल्याने तिथल्या दूतावासात जाऊन स्वत:ला भारतात परत पाठविण्याची विनंती करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग उरला नसताना युजींच्या आयुष्यात पूर्वीची काहीही ओळखपाळख नसली तरीही व्हॅलेण्टाईन डी कार्व्हान या आश्रयदातीचा प्रवेश झाला. आणि त्या एकाच भेटीत युजी व्हॅलेण्टाईनसोबत स्वित्झरलॅण्डमधील सानेन येथे राहू लागले. दैनंदिन कामे, खाणे, पिणे, झोपणे, आणि टाईम मॅगझीन वाचणे याशिवाय युजी तिथे काहीच करीत नसत. नेमक्या याच कालखंडात जेकेंची व्याख्याने सानेनमध्येच व्हावीत आणि व्याख्याने, उपदेश, साधना या गोष्टींना रामराम ठोकलेल्या युजींना मित्रांनी त्या व्याख्यानात ओढून न्यावे हा विचित्र योगायोग आहे (भारताच्या एका कोपर्‍यातील शहरातून निघून अमेरिका, लंडनमध्ये जाणारे विवेकानंद आणि तिथे त्यांना भेटलेल्या सारा बुल, भगिनी निवेदिता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता आधार देणारी माणसे हे एक दृश्य आणि जवळपास बैराग्याच्याच मनोवस्थेत जगप्रवास करीत असताना कोणतीच ओळख नसतानाही युजींना आश्रय देणार्‍या व्हॅलेण्टाईन हे एक दृश्य मनात एका वेळी चमकून जाते तेव्हा अफाट पसरलेले हे जग खरंच नुसत्या स्वार्थी माणसांचे वैराण वाळवंट नाही असं उगाच वाटून जाते).

साधना आणि मोक्षप्राप्तीचे विचार सोडून देऊन, विविध प्रकारचे अतिंद्रिय अनुभव घेऊनही कुठल्याच अंतिम निष्कर्षाप्रत न पोहोचलेल्या युजींना जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानात जेकेंच्या तोंडून बाहेर पडलेल्या “...त्या शांततेत, तिथं मन नसतं; तिथे कृती असते...” या शब्दांतून, एकूणच त्यांच्या त्या पोपटपंचीबद्दल तिटकारा आला आणि युजी तिथून उठून व्याख्यानाच्या शामियान्याबाहेर पडले.

हा झालेलाच कथाभाग पुन्हा एकदा मांडावा लागत आहे कारण खरा टर्निंग पॉईंट इथेच आहे. कारण एका "पोहोचलेला" मानला जात असणार्‍या आणि एका "प्रवासातील" माणसांतील ती शीतयुध्दासारखी परिस्थिती आहे. जेकेंच्या बोलण्याचा तिटकारा येण्याचे कारण म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या युजींच्या जीवनात "ऑपरेट" होत नव्हत्या; आणि पार भगवान बुध्दांपासून, उपनिषदे, वेद, रामकृष्ण परमहंस अगदी इथून तिथून सगळ्याच वर्ल्ड टीचर्सनी सर्वात आधी स्वत:ला मूर्ख बनवले आणि नंतर संपर्कात येणारे सर्वजणही त्या मूर्खपणावर विसंबून राहात आले हा त्यांचा विश्वास अगदी पक्का झालाच होता. तरीही ती मोक्षाची स्थिती नेमकी असते कशी? आणि मी त्या स्थितीत आहे हे मला कळणार कसे? हे प्रश्न शिल्लक होतेच. जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानातून निघून आल्यानंतर दोन दिवस ते प्रश्न "युजी" ही जी कुणी व्यक्ती होती तिच्या अंगात भिनले, रोम-रोम त्या प्रश्नाने पेटून उठले. शेवटी त्यांची त्यांनाच समज आली की आतापर्यंत त्याच वर्ल्ड टीचर्सकडून पाझरत स्वत:मध्ये आलेले ज्ञानच ते प्रश्न विचारत आहे (कारण जी माहिती आत उपलब्ध असते तीच बाहेर येते, जे शिकवलेले नसते ते कळूच शकत नाही हे त्यांनी पुढे चालून केलेले विधान आहे). ही बाब सुस्पष्टपणे दिसल्यानंतर, काही क्षण सगळी शरीर-मनोयंत्रणा सुन्न झाली कारण ती समज उदयाला येताच विचार प्रक्रिया थांबली होती. समजून घेण्यासारखे काहीही नाही हे वास्तव वीजेसारखे युजींवर येऊन आदळले होते. त्यानंतर काय घडले हे खुद्द युजीही सांगू शकत नाहीत. कारण विचारसाखळी तुटली तेव्हा तिच्यातून प्रचंड ऊर्जा मुक्त झाली आणि त्या ऊर्जेचा शरीरात स्फोट होऊन युजी या व्यक्तीने ४९ मिनीटे मृत्यूच्या स्थितीत घालवली; आणि या प्रक्रियेदरम्याने शरीर धनुरासनच्या स्थितीत वाकले होते. ही त्या कॅलॅमिटीची सुरूवात. पुढच्या पाच दिवसात सर्व इंद्रियांचे रूपांतरण आणि पाचव्या दिवशी स्वत:चे शरीरही स्वत:साठी नाहीसे होणे वगैरे घडले.

त्या पाच दिवसांत या घटना घडत असताना आणि नंतर सहा महिन्यांपर्यंत सर्व यंत्रणा स्थिरस्थावर होईपर्यंत नेमके काय होत आहे, झाले आहे हे युजींनाही उमगत नव्हते. साहाजिकच, ते ज्या अद्भुत प्रक्रियेतून जात होते त्याबद्दल युजींच्या आसपासच्या लोकांनाही उत्सुकता दाटून आली होती आणि त्यांच्यावर जेकेंच्या व्याख्यानासाठी सानेनमध्ये येऊन युजींनाही भेटायला येत असलेल्या लोकांकडून प्रश्नांचा भडीमार केला जात होता. पण त्या कॅलॅमिटीचा परिपाक म्हणून युजींना सलगपणे बोलता येत नव्हते; कारण आत स्वयंभूपणे चालणारा विचार कायमचा थांबला होता; आणि विचारांत समन्वय साधणारा समन्वयकच गायब झाला होता. पाहणार्‍या लोकांसाठी युजी शिल्लक होते; युजींसाठी "युजी" नावाचे कुणीच शिल्लक राहिले नव्हते. कॅलॅमिटीनंतरच्या विविध घटना आणि युजींनी  सांगितलेली त्यांच्या शिल्लक राहिलेल्या शरीराच्या चलनवलनात्मक कार्याची निरिक्षणे पुन्हा एकदा इथे लिहीत नाही; ती मागील भागात येऊन गेली आहेत.

ही घटना घडून गेल्यानंतर युजींसोबत लोकांच्या झालेल्या बोलण्यामध्ये युजींनी वेळोवेळी स्पष्ट केले आणि त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते स्पष्ट करीत राहिले की घडलेल्या घटनेत कसलाही आध्यात्मिक "कंटेट" नाही. त्या घटनेनंतर फक्त विचार नाहीसे होणे आणि शरीराचा प्रचंड इन्टेलिजन्स जागा होणे आणि त्याचे कार्य कसे चालते याबद्दल बाकीचे तपशील आहेत. पण इकडे युजींना घडलेल्या घटनेची खबर जेकेंच्या अनुयांयापर्यंत पोहोचली होती आणि जेकेंचे निकटवर्ती डेव्हीड बोह्म यांनीच युजींची सुमारे अडीच तास मुलाखत घेतल्याने युजींकडे लोकांच्या रांगा लागू लागल्या. आलेले लोक जेकेंच्या शिकवणुकीबद्दल बोलू लागले, युजी निर्दयपणे समोर मांडलेल्या मुद्याच्या चिंध्या करू लागले आणि त्यांना घडलेल्या घटनेला कोणताही आध्यात्मिक संदर्भ नसल्याचे पुन:पुन्हा सांगू लागले.

पुढे रजनीशांना सोडून आलेल्या दोन माजी संन्याशांनी संकलीत केलेले मिस्टीक ऑफ एन्लायटन्मेंट, माईंड इज ए मिथ, थॉट इज युअर एनेमी ही तीन पुस्तके सुरूवातीला प्रकाशीत झाली; नंतर युजींकडून विरोध होत असतानाही महेश भट यांनी युजींचे चरित्र लिहीले. युजींच्या कॅलॅमिटीबद्दल वैद्यकिय, वैज्ञानिक, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक या आणि अशा कित्येक क्षेत्रातील ख्यातनाम नावांना उत्सुकता निर्माण झाली; वैज्ञानिक क्षेत्रातील मूर्खांचा (!) "गिनीपीग" व्हायला युजींनी नकार दिला, आध्यात्मिक क्षेत्रातील मूर्खांचा (!) "एन्लायटन्मेंटप्राप्त" गुरू व्हायला युजींनी नकार दिला. आणि त्यांच्यासमोर मांडल्या जात प्रत्येक गोष्टीला ते नकार देऊ लागले; मुळातच असलेला कठोर स्वभाव, कुठल्याही क्षेत्रातून आलेल्या कुठल्याच व्यक्तीच्या हुशारीची भीडभाड न ठेवता, इंग्रजी भाषेतील तिखटजाळ शीव्यांची वाक्या-वाक्यातून पखरण करीत युजी "उत्तरे" देऊ लागले नव्हे विचारलेल्या प्रश्नाची मोडतोड, चोळामोळा करून तो प्रश्नच प्रश्नकर्त्याच्या अंगावर भिरकाऊ लागले.

युजींनी केलेले बोलणे स्वत:च्या शब्दात रूपांतरीत करून वाचकांसमोर मांडणे म्हणजे जळत्या निखार्‍यावर पाणी ओतून शिल्लक राहिलेले कोळसे वाचकांसमोर ठेवण्यासारखे होईल. त्यामुळे युट्यूब, व्हिडीओसर्फ आणि इतर ठिकाणी अजूनही धगधगत असलेले हे निखारे जसेच्या तसे : -

स्वत:ची एन्लाटन्मेंट नाकारताना बॉम्बफेक -
व्हॉट नॉन्सेन्स इट इज?? आय अ‍ॅम नॉट अ‍ॅन एन्लायटन्ड मॅन... नॉट इन दी सेन्स यू यूज दॅट वर्ड...नॉट इन एनी सेन्स...देअर इज नो सच थींग अ‍ॅज एन्लायटन्मेंट... दे कॅनॉट टॉक ऑफ लव्ह, कम्पॅशन अ‍ॅट ऑल..यू कॅन फूल यूअरसेल्फ...आय अ‍ॅम नॉट इंट्रेस्टेड इन फ्रीईंग यू फ्रॉम यूवर फुलीशनेस...व्हाय शूड आय?..हू हॅज गिव्हन मी दी मॅण्डेट टू सेव्ह मॅनकाईंड? व्हाट इज रॉंग विथ मॅन काईंड..यू आर प्रॉडक्ट ऑफ दॅट..ऑल धीस सिली नॉन्सेस...



डॉक्टरांवरची बॉम्बफेक -     
यु थिंक दॅट वी नीड ऑल दोज स्क्रौंड्रल्स? फोर्टी ऑफ देम डा‌ऽऽईड दोज स्क्रौंड्रल्स...डॉक्टर्स.. दे वील नॉट हॅव चॅन्स वीथ मी...दे कॅन फूल व्होल ऑफ मॅनकाईंड...नॉट मी... सो माय कमांडमेंट - शूट ऑल डॉक्टर्स ऑन साईट अ‍ॅण्ड अ‍ॅट साईट..वी डोण्ट नीड दोज बास्टर्डस..



दलाई लामा आणि जे. कृष्णमूर्तींवरची बॉम्बफेक -
आर यू रेडी टू बिलीव्ह दॅट डलाई लामा इज ए सीआयए एजंट? यू गेव्ह हीम ए नोबल प्राईज.. ही बॉट एकर्स अ‍ॅण्ड एकर्स ऑफ व्हीनयार्डस...  बीकॉज इट्स ए रिफ्लेक्शन ऑन युवर इण्टेलिजन्स... यु आर नॉट रेडी दॅट यू आर ए डॅम फूल टू बिलिव्ह ऑल दोज शीट...

इव्हन व्हेन कृष्णमूर्तीज स्टोरीज केम आऊट, दे डिडण्ट वॉण्ट टू बिलीव्ह...ऑल इज सेक्स-अ-पेट्स (अस्पष्ट शब्द)..आय अ‍ॅम नॉट अगेन्स्ट इट.. आय अ‍ॅडमायर हीम मोर फॉर दॅट...बिकॉज ही केप्ट इट अंडर दी कार्पेट... अ‍ॅण्ड देन इव्हन टू ऑर थ्री वीमेन वर इन्व्हॉल्व्हड.. दे वूड ब्रिंग इट इन्टू दी ओपन..इव्हन दे केप्ट इट अंडर दी कार्पेट... दे आर नाऊ सर्क्युलेटींग दॅट बुक सेईंग ऑल दॅट इज ट्रू...ऑल हिज लव्हलेटर्स आर देअर..इन दि हंटिंगटन लायब्रेरी पॅसिडीएना...यु कॅन रीड देम....यू कान्ट डीनाय दॅट... ही वॉज लाईक ए नेव्हीमॅन..अ‍ॅण्ड ही हॅड ए गर्ल अ‍ॅट एव्हरी पोर्ट..आय अ‍ॅम नॉट अगेन्स्ट इट..आय अ‍ॅडमायर दॅट....नॉट हिज टीचींग..फिल्दी टीचींग... सर, यू गो अवे अ‍ॅण्ड गो टू सम ऑफ दोज बास्टर्डस..अ‍ॅण्ड पिक अप मोर फ्रेजेस..एम्प्टी वर्ड्स.. अ‍ॅण्ड रीपिट देम अ‍ॅण्ड फिल गुड... आय हॅव नो इंट्रेस्ट इन फ्रीईंग यू फ्रॉम एनिथींग..ऑर एनिबडी इन धीस वर्ल्ड.. व्हेन आय वॉज यंग अ‍ॅण्ड स्टूपीड आय यूस्ड टू गिव्ह दी लेक्चर्स.. यूथ शॅल रिशेप दी वर्ल्ड..यू कॅन रीड ऑल दी शीट ऑन इंटरनेट..



मातृत्वावर बॉम्बफेक-
मदर्स आर मॉन्स्टर्स, किल देम ऑल. दॅटस माय कमांडमेंट.

रजनीश उर्फ ओशोंवर बॉम्बफेक -
रजनीश इज, वॉज अ‍ॅण्ड एव्हर वील बी ए पोर्नो अवतार... हि वॉज ए पिम्प..ही प्रोव्हायडेड बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स टेलींग देम यू फक अ‍ॅण्ड थ्रू फकींग, तान्त्रिक फकींग यू वील गेट एन्लायट्न्मेंट... हाऊ मेनी पीपल हॅव बीन एन्लायटण्ड??... यू ऑल फेल फॉर दॅट... पिम्पस यूज्वली शेअर मनी विथ दी बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स.. बट दॅट बास्टर्ड टूक मनी फ्रॉम बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स अ‍ॅण्ड केप्ट ऑऽऽऽल फॉर हिमसेल्फ..



स्वत:बद्दल:
दी बेस्ट थींग यू कॅन डू टू मी अ‍ॅण्ड टू मॅन काईण्ड, इज टू बर्न ऑल दी मेमरीज ऑफ मी, अबाऊट मी अ‍ॅलॉंग विथ धीस बॉडी, व्हेन आय अ‍ॅम डेड.




अवेअरनेस (जागरूकता) आणि त्यांच्या आत्मचरित्राबद्दल:
कॅन अवेअरनेस ब्रिंग अबाऊट ए चेंज ? (प्रश्न विचारणारा)
(वाक्य मध्येच तोडत) ...अवेअरनेस डझन्ट एक्झिस्ट्.. हू इज धीस दॅट ही सेज ही इज अवेअर?..
वॉचिंग वन्स ओन थॉट्स?? (प्रश्न विचारणारा)
(मध्येच तोडत) नेव्हर..थॉट्स डोन्ट एक्झिस्ट्.. यू डोन्ट हॅव टू टेक माय वर्ड..दोज बास्टर्डस कॅनॉट इन्फ्ल्य़ूएन्स मी..शो मी दी थॉट... इट इज अबाऊट थॉट बट नॉट थॉट...ऑल दॅट शीट दॅट दे पुट इन्टू शीटबॉक्स ऑफ युवर्स..व्हाटेव्हर कमिंग आऊट ऑफ यूवर माऊथ इज ओव्हरऑल शीट...आयडियाज दे हॅव पुट इन्टू युवर हेड...
व्हेन यू आर रिकॉलींग यूवर पास्ट, देअर इज नथिंग बट पास्ट..(प्रश्न विचारणारा)
देअर इज नो पास्ट..
दे हाऊ कूड (यू) रोट युवर बायॉग्राफी? (प्रश्न विचारणारा)
नॉट मी, सम बास्टर्ड रोट इट.. यू थिंग आय अ‍ॅम माय ओव्हर रायटर ऑफ माय बायॉग्राफी?
नो..नो..(प्रश्न विचारणारा)
बट व्हेन यू रोट, यू रिकलेक्टेड फ्रॉम युवर पास्ट..दॅट इज पास्ट..  (प्रश्न विचारणारा)
दॅट इज मेमरी.. टू रिकग्नाईज दॅट स्काय इज ब्ल्यू..आय कीक्ड माय ग्रॅण्डमदर.. व्हेन शी टोल्ड मी स्काय इज ब्ल्य़ू..यू आर टेलींग मी.. दि फिजीकल आय डज नॉट सी दॅट स्काय इज ब्ल्यू..शट अप आय सेड टू माय ग्रॅण्डमदर..शी वॉज शिव्हरींग...अ‍ॅण्ड फ्रॉम देन ऑन यू लूक अ‍ॅट दॅट यू से स्काय इज ब्ल्यू...अ‍ॅण्ड यू आर विअरींग ए ब्लॅक जॅकेट..फिजीकल आय डज नॉट सी इट इज ब्लॅक..दॅट बीच टोल्ड मी

युजींनी आयुष्यभरात कधीच कुठली औषधे घेतली नाहीत किंवा आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. "हेल्थ फूड" वर त्यांचा विश्वास नव्हता आणि त्यांच्या आहारात फक्त चीज, क्रीम यासारख्याच गोष्टी असत. ते सलग झोप न घेता दिवसभरात आणि रात्रीतून अधेमध्ये तासा-तासाची डुलकी काढत. युजी जीवंत असेपर्यंत दर वर्षातील डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेला वर्षाच्या हिशेबातून त्यांच्याकडे शिल्लक राहीलेले पैसे वाटून टाकत. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी युजींच्या शरीरावर, सामान्यत: योगात सांगितलेली चक्रे असतात त्या जागांवर सूज येत असे. प्रश्न विचारला नसल्यास युजी कधीच कुणावर चिडत नसत आणि इतरवेळी त्यांच्या अवतीभवती वातावरण एवढे हलके आणि सहज असे की लोक हास्यविनोद करीत, युजींसोबत बसलेले असताना तंगड्याही टेबलावर ठेवत. युजी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कुठेच राहात नसत. आफ्रिकेची जंगले आणि दोन ध्रुव वगळता युजींनी अक्षरश: प्रत्येक देशात पायपीट केली. जगभरातील टीव्ही वाहिन्या, रेडीओ स्टेशन्स, वृत्तपत्रे, नियतकालिकांना युजींनी मुलाखती दिल्या. व्हॅलेण्टाईन डी कार्व्हानने स्थापन केलेल्या फंडातून युजींचा प्रवासखर्च चालत असे.

फक्त "एन्टरटेन्मेंट" म्हणून युजी प्रसंग येईल तेव्हा सर्व पठडीतील ज्योतिषांकडून स्वत:चे भविष्य वदवून घेत. कौमारन पध्दतीतील युजींच्या "नाडी रीडींग" तसेच "आय-चींग" या चीनी होराशास्त्रासंदभातील किस्सा फार मनोरंजक आहे. हे नाडीवाचन १९८८ साली केलेले आहे. हे दोन्ही किस्से महेश भट यांनी लिहीलेल्या युजींच्या चरित्रातून-

नाडी वाचन करणार्‍या श्री. नागराज यांनी उदबत्ती पेटवली आणि अत्यंत भक्तीभावाने ती भविष्ये लिहीलेल्या बंडलाभोवती फिरवून त्यांचे काम सुरू केले. त्यांनी नंतर नाडीचे एक टोक बाहेर काढले आणि दुसरे टोक त्या बंडलाला जोडलेले होते. ते बंडल त्यांनी युजींच्या हातात दिले. त्या पानांच्या बाडातून नाडीचे एक टोक मागे पुढे करीत त्यांनी युजींना त्या बाडाचे दोन भाग करायला सांगितले.  युजींनी ते बाड जिथे वेगळे केले होते ते पान घेऊन ज्योतिष्याने ते वाचायला सुरूवात केली: कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे अस्पर्शित राहाणार्‍या या अवलियाबद्दल काय सांगण्यासारखं आहे? राजासारखे सुखोपभोग आणि ऐश आराम यांच्यासोबत राहूनही हा रामायणातील भरताप्रमाणे विरक्त राहातो. बुध (??) आणि शनि या ग्रहांच्या संयोगामुळे याला जीवनाचे सार कळू शकले आहे. तो मोठा अभ्यासक आणि अनुभव संपन्न आहे. 
चुकीचे पान निघाले की काय अशी शंका आल्याने नागराज यांनी वाचन थांबवत प्रश्नार्थक चेहेरा करून युजींकडे पाहिले. चाललेले वाचन बरोबर आहे असे युजींनी तात्काळ म्हटले, आणि वाचन पुन्हा एकदा सुरू झाले:
हा माणूस त्याच्या रविदशेत ख्यातनाम होईल. त्याच्या मूळ गावापासून स्थलांतरीत झाल्याने, तो कुठल्याच एका ठिकाणी मुक्काम ठोकुन राहाणार नाही. तो कसल्याच प्रकारची दीक्षा घेणार नाही, उपजतच त्याला ती मिळाली आहे. त्याची शिकवण साधुसंत आणि वनात राहाणार्‍या लोकांसारखी नसेल. त्याच्या शिकवणुकीचा प्रकाश प्रत्येक ठिकाणी पसरत राहिल. कुठेतरी पोहोचू , काहीतरी मिळवू या हेतूने त्याच्याकडे येणार्‍यांना तो पूर्णत: निराश करील. या व्यक्तीला "माणूस" असे संबोधन न वापरता "आत्मा" असे म्हटले जावे (कारण त्याच्याकडे व्यक्तीत्वच नाही).


यानंतर, प्राचीन ऋषिंना मध्येच विश्रांती घ्यावी वाटली की काय कोण जाणे, पण पुढे लिहीलेले होते: एक घटीका संपल्यानंतर आम्ही पुन्हा वाचन सुरू करू. नागराज यांनी बाड बंद केले. त्यांची आणि त्यांच्यासोबत आलेल्या साथीदारांची उत्सुकता फारच ताणली गेली होती. त्या पंधरा किंवा वीस मिनीटांत आत्ता सांगितलेल्या आणि इतर भविष्यकथनांत त्यांच्या जीवनांतील घटना कशा स्पष्टपणे प्रतिबिंबीत होतात ते समजावून सांगितले. ज्योतिषातील भाकीताच्या भागात सत्यता किती असू शकते याबद्दल मी बिनतोड विधान करू शकणार नाही, पण कुणाला त्यात सखोल अभ्यास करायचा असेल तर माझी कुंडली सर्वोत्तम उदाहरण ठरेल - युजी म्हणाले.
तिथे बसलेले सर्वजण युजींबद्दल नाडी पुढे काय म्हणणार ते ऐकण्यासाठी खूपच उताविळ झाले होते. आम्ही नागराज यांना वाचन पुन्हा एकदा सुरू करा म्हणालो. नागराज यांनी ते सुरू करण्यासाठी पुढचे पान उघडले आणि प्राचीन ऋषिंना आमचा उताविळपणा आधीच दिसला होता की काय माहीत नाही, कारण एका पूर्ण कोर्‍या पानाने नागराज यांचे स्वागत केले.
"कोरे पान म्हणजे माझे भविष्यही कोरेच आहे!" युजींनी हसतहसत शेरा मारला. पुन्हा अर्धा मिनीट थांबा घेऊन नाडीने पान काढण्यात आले. या पानावर लिखाण होते. ते असे:


मागच्या भविष्यात आपण घेतलेली एक घटीकेची विश्रांती पूर्ण होण्यासाठी अजूनही दीड मिनीट बाकी आहे. या भविष्याचा असल्या माणसाला काहीच उपयोग नाही. तरी पण, त्यातील मजेसाठी म्हणून आपण ते पुढे चालू ठेऊया. तुम्ही आम्हाला नमस्कार करण्याची गरज नाही पण तुमच्यासमोर जो बसला आहे त्याला नमस्कार घाला आणि पुढे वाचा. नाडीवाचन पुढे सुरू झाले: आजपासून अकरा वर्षांनंतर, हा जिथे जाईल तिथे-तिथे तो सदभाग्य त्याचा पाठलाग करीत राहिल. ते त्याला सोडून जाणार नाही...जेवत असो, पाणी पित असो, चालत असो, झोपलेला असो किंवा काहीही करीत असो, हा माणूस सहज समाधीत असेल. चंद्रदशेच्या अंतिम पर्वात त्याच्या फक्त दर्शनानेच पाहाणार्‍याला आध्यात्मिक दीक्षा मिळेल...अशा माणसाला या वाचनाचा काय उपयोग आहे? उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न विचारून नाडी वाचन समाप्त झाले.


आय-चींग प्रकारातील चिनी भविष्य -
हे भविष्य महेश भट यांची युजींची ओळख करून देण्याचे माध्यम ठरलेल्या व्यक्तीने त्याच्या मनात युजींबद्दल झालेला गोंधळ दूर करण्यासाठी करून घेतले आहे. युजींना भेटल्यावर प्रत्येकवेळी निराश झाल्याने त्याने आय-चिंग करून घेतले होते. त्याला हे उत्तर मिळाले:
"तो गुरू नाही, शिक्षक नाही, किंवा तारणहार नाही. तुम्हाला जागे करण्याशी त्याला काही देणेघेणे नाही आणि त्याला काहीही करायचे नाहीय. कोणताही हेतू न ठेवता तो मस्तीत धगधगत राहील. तो नसताना तुम्ही जेवढे हरवलेले आहात तेवढाच तुम्ही नसताना तो हरवलेला असेल. तुमच्यात प्रतिबिंबीत होत नसेल तर त्याचा प्रकाश विझेल. त्याच्या प्रकाशाशिवाय तुमचे जीवन अंध:कारमय आहे."

आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे ९ जुलै १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती हे त्यांचे पूर्ण नाव. आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात युजींनी इटलीमधील व्हॅलेक्रोशिया येथे मित्राच्या घरी एके ठिकाणी राहायला सुरूवात केली. प्राणोत्क्रमण होताना त्यांच्या महेश भट या निष्टावान मित्रासह आणखी दोन व्यक्ती सोबत बसून होत्या; इतर सर्वांना बाहेर जायला सांगण्यात आले होते आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यक्रिया कशी करण्यात आली हे गुलदस्त्यात आहे. युजींनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन हजार डॉलर देण्याचा प्रस्ताव दिला होता. ते गेल्यानंतर त्यांची आठवण केली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. मी गेल्यानंतर बागेतल्या कृमिसारखाच सडेल हा त्यांचा देह सोडतानाचा संदेश होता. २२ मार्च २००७ रोजी इटालीतील व्हॅलेक्रोशिया इथे युजींनी देह सोडला.

इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ!!!!

समाप्त

आभार:  
१. श्री. महेश भट (ब्लॉगवरील फोटो, संदर्भ साहित्य वापरण्यासाठी खुल्या दिलानं परवानगी दिल्याबद्दल)
२. के चंद्रशेखर राव (युजींच्या सुरूवातीपासूनच्या छायाचित्रांचे संकलक)
३. मुकूंद राव (लेखक, युजी रीडर)
४. ज्युली थायर ( आज आपल्याला उपलब्ध असणारी व्हिडीओग्राफी युजींसोबत सतत दहा ते बारा वर्षे राहून; ती विविध साईटस टाकणे)
५. इंग्लिश विकीपिडीया

१९ ऑक्टोबर, २०१०

यु.जी.कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग पाच

हा भाग लिहायला सुरूवात करताना आधीच कबूल करतो की आता युजींच्या संदर्भातील सर्व पुस्तके आणि वेबसाईटस बंद करून गेल्या सात-आठ महिन्यांत युजींबद्दल/कडून जे-जे वाचलं, पाहिलं, ऐकलं ते डोक्यात साठल्यानुसार तसंच्या तसं मांडत आहे. ही लेखमाला केवळ ओळख म्हणून लिहीली जात आहे - त्यामुळं इथं कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षापर्यंत मोक्ष आहे काय, ती स्थिती कशी असते, ती मला हवी आहे असले विचार डोक्यात घेऊन युजी थिऑसॉफिकल सोसायटी, शिवानंद सरस्वतींसोबत ऋषिकेषच्या गुहा, रमणमहर्षींसारखा ऋषि आणि जगभरातील असल्याच ज्ञात-अज्ञात ठिकाणी फिरत राहिले - ध्यानाचे प्रयोग करीत राहिले. त्यांना समाधी, तृतिय नेत्र (पिनीयल ग्लॅण्ड) दर्शन, कुंडलिनी जागरण, समाधी प्रवेश, दुसर्‍या माणसांच्या मनातील विचार कळणे आणि त्याच पठडीतील सर्व अनुभव आले. पण हे अनुभव येणे म्हणजे त्यांच्यासाठी शेवट नव्हता. बुध्दांची/जागृत/मोक्षप्राप्त लोकांची स्थिती नेमकी असते कशी हा प्रश्न त्यांच्या मनात सतत निनादत राहिला. कारण आपल्याला ज्ञात असते, इतिहासाने, परंपरेने सांगितलेले त्याप्रमाणे जागृत पुरूष हे निर्विचार स्थितीत असतात - त्यांच्यातील काम, क्रोध, मोह, माया, मत्सर यांचा निरास झालेला असतो आणि त्यांचे जीवनच जगाच्या कल्याणासाठी असते हे सगळे आपल्याला पुस्तके वाचून कळलेले असते. युजींची स्थिती मात्र वेगळी होती. सगळे अनुभव येत असताना देखील कामिनी-कांचनाकडचा ओढा सुटत नव्हता. ते स्वभावाने कठोर होते.

युजी: तारूण्यातील

वयाच्या एकवीस-बावीसाव्या वर्षी त्यांनी पदवीसाठी मानसशास्त्र हा विषय घेतला तेव्हा त्या विषयाच्या प्राध्यापकांना त्यांनी खडा सवाल विचारला होता,  "आपण सतत मनाबद्दल बोलत असतो, मन असतं कुठे ते तुमचं तुम्हाला तरी माहीत आहे काय? मनाबद्दल मला जे काही माहिती आहे ते मी जुंग, फ्राईड आणि एडलर यांच्या आणि त्या तसल्याच पुस्तकांतूनच वाचले आहे. ही पुस्तके वगळता तुम्हाला स्वत:चे असे मनाबद्दल काही माहीती आहे काय?" एकवीस-बावीस वर्षे वयाच्या विद्यार्थ्याच्या या चक्रावून टाकणार्‍या प्रश्नामुळे ते प्राध्यापक गोंधळले. पण "तुला परिक्षा उत्तीर्ण होऊन पदवी मिळवायची असेल तर जे काही वाचले आहेस, तेच लिही" असे त्यांनी युजींना मोकळेपणे सांगितले. "असे उत्तर देऊन त्या माणसाने प्रामाणिकपणा तरी दाखवला होता!" युजींनी नंतर टिप्पणी केलीय. युजींनी ती परिक्षा द्यायला नकार दिला आणि पदवीचे शिक्षण सोडून दिले.
बुध्द, रामकृष्ण परमहंस इत्यादी लोक सांगत आहेत ते आणि स्वत:चे वास्तविक जीवन ज्यानुसार संचालित होत आहे त्यात त्यांना जमीन आसमानचा फरक दिसू लागला. या सगळ्या लोकांनी स्वत:शीच पोरखेळ केलाय, स्वत:चीच फसवणूक केली आणि इतरांचीही फसवणुक केली हा विचार त्यांच्या मनात रूंजी घालू लागला. हे लोक सांगतात क्रोध करू नका - पण माझ्या मनात तर सतत क्रोधाची भावनाच खदखदत असते, त्यामुळे ते जे सांगत आहेत ते पूर्णत: चुकीचे आहे कारण  क्रोध न करण्याची कुठलीतरी स्थिती गाठण्यापेक्षा, आत्ता माझ्या मनात खदखदत असणारा राग माझ्यासाठी कितीतरी खरा आहे! मला नाटकं करायची नाहीत. हे लोक मला काहीतरी चुकीचं, वेगळंच व्हायला सांगत आहेत - आणि मला तसं व्हायचं नाही. मोह माझ्यासाठी कितीतरी खरा आहे, आणि हे लोक सतत मोह सोडा असं सांगत राहातात. त्यामुळे पवित्र मानल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात टोकाचा तिटकारा निर्माण झाला. त्यांचा सधन ब्राम्हण घरात जन्म झाला होता, संत, साधु-बैरागी, शंकराचार्य वगैरे लोकांच्या घरात नेहमी पंगती उठत असत पण त्या सगळ्याच गोष्टी युजींच्या यंत्रणेतून बाहेर भिरकावल्या गेल्या: श्लोक, धर्म, भम्भम, साधना सबकुछ बंद्द! - कारण त्यात काहीच नाही. मी खाटीक आहे, मी दैत्य आहे, माझ्या नसानसात हिंसा भरलीय - ही सत्यता आहे; ते लोक चुकीचे आहेत; आणि ते फक्त चुकीचेच नाहीत तर मलाही ते चुकीचं ठरवित आहेत - युजींनी स्वत:ला बजावले आणि त्या सगळ्या धंद्याचा गाशा गुंडाळला.
महर्षी रमण

युजींच्या स्वत:च्या साधनेतूनच त्यांना कुठेही पोहोचता आले नव्हते आणि त्यातून मिळालेली उत्तरे हीच मोठे प्रश्न होते. युजींची ही तीव्र निराशा पाहुन रमणपादानंद स्वामी या त्यांच्या स्नेह्यांनी युजींनी पॉल ब्रण्टनचे इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया हे पुस्तक दिले आणि त्यातील रमण महर्षींवर असलेली प्रकरणे काळजीपूर्वक वाचायला सांगितली. त्यातूनही युजींचे समाधान झाले नाही आणि "हो-नाही करीत, टाळाटाळ करीत, अगदी बळजबरीनेच" ते रमण महर्षींना भेटण्यासाठी कबूल झाले.
"मला त्यांचा काय उपयोग?" युजींच्या या प्रश्नाला रमणपादानंदांनी उत्तर दिले होते की तुझ्यासारख्याच शेकडो साधकांप्रमाणेच रमण महर्षींच्या सान्निध्यात तुझ्या रोम-रोमातून शांतता वाहु लागेल आणि तुझे सगळे प्रश्न गळून पडतील, गुरूच्या फक्त एका नजरेतूनच तुझ्यात बदल घडेल.
रमण महर्षींसोबतच्या भेटीत शेवटी एकदाची दोघांची नजरानजर झाली. भिंतीवरच्या घड्याळ्याने ठोके दिले. एक तास उलटला होता. युजींचा कोणताही प्रश्न मावळला नव्हता आणि त्यांची निराशा संपुष्टात येण्याचे कोणतेच चिन्ह नव्हते. दोन तास उलटले आणि सरतेशेवटी युजी थेट मुद्यावर उतरले,
"ठिक आहे, मला आणखी काही प्रश्न विचारू द्या." युजींना थेट मोक्षाशिवाय इतर काहीच नको होते. पण त्यांनी हा प्रश्न टाकला, "मोक्ष खरंच आहे काय?"
रमण महर्षींनी ठामपणे होकार दिला.
"एखादा माणूस काहीवेळा मुक्त असू शकतो आणि काहीवेळा मुक्त नसू शकतो काय?"
"एकतर तुम्ही मुक्त असता किंवा नसताच - अधेमधे काही नाही."
"त्याचे काही स्तर आहेत काय?"
"नाही - त्यात कसलेही स्तर नसतात - ती सगळी एकजीव गोष्ट आहे. तुम्ही त्या स्थितीत पूर्णत: असता, किंवा नसताच!"
युजींनी त्यांचा शेवटचा प्रश्न बाहेर काढला, "तुम्ही हा जो काही मोक्ष म्हणताय, तो मला देऊ शकता काय?"
रमण महर्षींनी प्रतिप्रश्न करून उत्तर दिले, "मी देऊ शकतो - पण तु घेऊ शकतोस काय?"
कुठल्याच गुरूने कधी असे उत्तर दिले नव्हते. बहुतेकांनी त्यांना आणखी जास्त साधना करण्याचा आणि युजींनी ज्या धंद्याचा गाशा गुंडाळला होता तेच पुन्हा करायला सांगितले होते. पण आता रमण महर्षींच्या रूपात, जागृत मानला जाणारा पुरूष होता आणि तो त्यांना विचारत होता, "तु घेऊ शकतोस काय?"
अंगावर वीज पडावी तसा हा प्रश्न युजींवर येऊन आदळला. तो अत्यंत उध्दट प्रश्न वाटत होता. पण युजींचाही उध्दटपणा हिमालयाएवढा होता. "मोक्ष घेऊ शकणारा कुणी असेल, तर तो मी आहे... मी तो घेऊच शकत नसेल तर, अजुन कोण घेणार तरी कोण?"
युजी हा असा प्रकार होता.
जे. कृष्णमूर्तींसोबतचा असाच एक किस्सा पूर्वी येऊन गेला आहे. शेवटी युजी कृष्णमूर्तींनी सगळे काही नाकारले. आपल्याला मन नसतेच, आपल्याला विचारही नसतात, मोक्षही नसतो आणि कसलेच स्वातंत्र्यही नसते, एवढंच नव्हे तर आपणही नसतो, दुसरेही कुणी नसतात इथपर्यंत युजी गेले. सगळं फार मजेशीर आहे - मन नसतेच तर ते "आहे" झाले कुठून? आपण जन्माला आलो तेव्हा काय होतं? फक्त मांसाचा एक हलता-रडता गोळा. त्यावेळी तर विशिष्ट गोष्टीवर नजरही लावता येत नसते. जन्म झाल्यापासून तीन-चार महिन्यांनी "फोकस" करायला जमते. शरीराची वाढ होत जाते आणि हळुहळु "व्यक्ती" आकाराला येत राहाते तोपर्यंत आई-वडील, शिक्षक, मित्र, साधु-संत, समाज यांच्याकडून आपल्याला मन असते, आपल्याला विचारही असतात, आपल्याला मुक्ती मिळवायची असते, या अगोदर बर्‍याच लोकांनी ती मिळवलीय हा सगळा कचरा भरून झालेला असतो आणि त्या कचर्‍यासोबतच व्यक्ती जगत असते. एक साधे उदाहरण आहे - कुणीतरी बोललेलं, कुणीतरी काही लिहीलेलं आपल्याला चटकन समजू शकतं - का? कारण ते समजून कसं घ्यायचं यासाठी आपल्याला प्रशिक्षित करण्यात आलंय; त्याचं ग्रहण कसं करायचं याची माहिती आपल्यात पध्दतशीरपणे भरण्यात आलीय (आठवा: आ‌‍ऽऽऽई, मा‌‍ऽऽऽमा, का‌‍ऽऽऽऽका, दा‍ऽऽऽदा). हे सगळं प्रोग्रॅम्ड आहे; त्यामुळं जे आपल्या माहितीत येऊ शकत नाही - ते अस्तित्वात नसतं; ते कळूच शकत नाही. शब्दांत सांगता येणार नाही तो अनुभव आला, ती निर्विचार, निर्विकल्प अवस्था अनुभवली, ती अशी समाधी लागली, ती शांतता असली होती - या सगळ्या भंकस, बोगस भाकडकथा आहेत. निर्विचार अवस्था/समाधी लागते तर ती निर्विचार अवस्था आहे/ समाधी आहे ही बडबड कोण करतंय? ध्यान म्हणजे तरी काय? स्वत:च्या शरीर-मनोयंत्रणेला त्या विशिष्ट स्थितीची ट्रेनिंग देणंच. पातंजलींच्या योगसूत्रांतही "साक्षी" हा प्रकार आहे आणि भगवान बुध्दांनीही "विपश्यना" हा प्रकार सांगितलेला आहे. या दोन्ही प्रकारांत मनाची, विचाराची, शरीराची जी हालचाल होत असते त्यावर सतत नजर ठेवायची असते. आपण नजर ठेवत जातो, ठेवत जातो आणि सुरूवातीला आपल्या असंख्य विचारांतून दिसणारा आपला चेहेरा पुसट होत जातो आणि स्वत:चे विचार, शारीरिक हालचाली यावर नजर ठेवणारा  "साक्षी", विपश्यन - पाहाणारा आकाराला येतो. इथे "जे दिसतंय ते" आणि "जे पाहातंय ते शिल्लक" उरतं. दिर्घकाळ ध्यान करीत राहिल्यास पुढे सरावाने ध्यानाच्या अवस्थेत शिरल्यानंतर काही मिनीटांतच "जे दिसतंय ते दिसणं पुसट होत जाऊन" फक्त पाहाणाराच शिल्लक राहातो. एकतर ध्यान म्हणजे स्वत:च्याच नाकातून श्वासांच्या रूपानं आत बाहेर होत असणारा लगाम हाताळणं. या श्वासांच्या चालणार्‍या लगामावरच सगळ्या शरीर-मनोयंत्रणेचे चलनवलन होत असते. ध्यानाच्या सखोल अवस्थेत श्वासांचा हा लगाम ढिला पडत जातो, ढिला पडत जातो, जवळपास नाहीसाच होतो, इतर सर्व विचार विरतात आणि शरीर-मनोयंत्रणा अत्यंत मुक्त अवस्थेत, एरव्ही कधीही अनुभवाला न येणार्‍या स्थितीत प्रवेशते, अंतर्पटल दशदिशांनी विस्तारते, विस्तारत जाते आणि शरीर-मनोयंत्रणा स्वत:मध्ये निर्माण झालेल्या अनुल्लंघ्य, असिम अवकाशात तरंगू लागते. हेच आत्मदर्शन. हाच समाधीचा अनुभव. हेच निर्वाण. हाच कॉस्मिक कॉन्शसनेस. ही स्थितीदेखील येते तेव्हा भयावह असते, कारण श्वास मंद होत शून्य झालेला असतो, शारीरिक क्रिया मंदावलेल्या असतात, मनोयंत्रणा मुक्त, मादक, आनंदमय स्थितीत गेलेली असते आणि ती तशीच काहीकाळ राहु दिली तर उंबरठा ओलांडला जाऊन मरण घडेल की काय हे भयदेखील तिथे असते. या स्थितीतच काही लोक ते ध्यानात असताना मरून परत आल्याचा अनुभव (पक्षी निर्विकल्प समाधीचा अनुभव) आल्याचे सांगत असतात.  पण गमतीची गोष्ट म्हणजे या लोकांच्या शरीराच्या आत सोडा, शरीरावरही कसल्याही शारीरिक रूपांतरणाची चिन्हे दिसत नाहीत. रजनीशांचे उदाहरण घ्या. रजनीशांचे डोळे अत्यंत तेजस्वी, कमळाच्या पाकळ्यांसारखे असल्याबद्दल बाता मारल्या जातात. पण रजनीशच काय कुणीही चार-दोन महिने गांभीर्यपूर्वक ध्यान केले तर भुवया धनुष्याकृती होतात आणि डोळ्यांत स्थैर्य झळकू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे या पोहोचलेल्या लोकांभोवती सतत असणारा"कॉस्मिक एनर्जी" झरा. असली एनर्जी वगैरे काही नसते तर समोरचा माणूस शांत बसलेला असेल तर आपलाही कल शांत राहाण्याकडेच असतो; समोरचा माणूस आक्रामक असेल तर आपणही आक्रामकतेकडे कलतो - हाच प्रकार शांत, सदा आनंदमय स्थितीत असतात असे वर्णन करून सांगितले जाते त्या बाबा/गुरू लोकांच्या बाबतीतही असतो.  

हे सगळे आत कुठेतरी रेकॉर्ड झालेले असते (तेच नंतर वेगवेगळ्या लोकांसमोर, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून, वेग-वेगळ्या पुस्तकांतून बाहेर पडत राहाते); पण दुर्दैवाने हा काही "ध्यान" या सगळ्या प्रकाराचा शेवट नसतो. ध्यानातून निकल बाहर ची स्थिती येते तेव्हा पूर्वीसारखेच विचारही परततात, भावनाही परतात, क्रोधही परततो आणि ध्यान करणारा जुनाच माणूस पुन्हा उभा राहातो. भगवान बुध्दांच्या आयुष्यात कथा सांगितली जाते की त्यांना जेव्हा वर वर्णन केलेली निर्वाणाची स्थिती प्राप्त झाली तेव्हा, तो शेवटचा उंबरा ओलांडून पुढे पाऊल टाकायला त्यांनी नकार दिला. जगातला शेवटचा माणूस त्या निर्वाणाच्या द्वारातून आत प्रवेशत नाही तोपर्यंत मला आत जाण्याचा काहीच अधिकार नाही असे म्हणून भगवान निर्वाणाच्या त्या द्वारात न प्रवेशताच परतले आणि त्यांनी भिक्खु-भिक्खुणींचे संघ उभे करायला सुरूवात केली. इथेच युजींचा आणि बुध्दाचा खटका उडतो. जगातले सर्व लोक निर्वाणाच्या द्वारातून प्रवेशत नाहीत तोपर्यंत मी ही आत जाणार नाही ही भगवान बुध्दांच्या निर्वाण स्थितीबद्दल सांगितली जाणारी कथा युजींना एका राजकारण्याचे विधान वाटते -

(बट दॅट फेलो डिडन्ट हॅव दि गट्स टु गो टु दि एण्ड, व्हेन ही गेट धीस एक्सपिरियन्स, ही सेड अ‍ॅज लॉंग अ‍ॅज देअर इज सिंगल सोल इंप्रिजण्ड इन दि वेल ऑफ इल्ल्युजन, ही रिफ्युज्ड टू एंटर दि गेट्स ऑफ निर्वाणा,  ही नेव्हर एंटर्ड गेटस ऑफ निर्वाणा, ही रिफ्युज्ड... फॉर दि सेक ऑफ मॅनकाईंड, लाईक ए पॉलीटिशीयन टॉकींग ऑफ मॅन काईंड, ह्यूमॅनिटी...यु नो, देन फॉर दि फर्स्ट टाईम इन दि हिस्टरी ऑफ मॅनकाईंड ही इंट्रोड्यूस्ड एलेमेण्ट ऑफ कन्व्हर्शन, प्रॉस्लेटायझेशन, क्रिएटेड ए संघा, ही मुव्हड टू प्लेस टू प्लेस फॉलोव्ड बाय ऑल दीज पीपल्स, अ‍ॅण्ड ही डिडण्ट अलो विमेन टू जॉईन हीज ऑर्डर फॉर लॉट ऑफ टाईम..लॉट ऑफ प्रोटेस्टेशन अ‍ॅण्ड फायनली ही रिलेण्टेड अ‍ॅण्ड अ‍ॅडमिटेड देम ऑल्सो...देन देअर केम अ‍ॅलॉंग ए...धीस इज माय रिडींग ऑफ हिस्टरी..टेक इट ऑर लिव्ह इट.. अ‍ॅण्ड अशोका दि किंग...युज दॅट अ‍ॅज ए इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉवर...ही स्प्रेड इट फोर्सिब्ली इन धीस कंट्री...देन केम हर्षवर्धना..अनादर फेलो...व्हेन दे केम साऊथ दे स्टॉप्ड...  ).

हा जो आजचा आध्यात्मिक बाजार चालु आहे त्याची सगळी मुळं विविध उपनिषदे, भगवान बुध्द, येशू ख्रिस्त या लोकांना "आदर्श" म्हणून, त्यांना जे इकडचे-तिकडचे, किरकोळ अनुभव आलेत त्याच अनुभवांना अंतिम मानून सादर केले जाते त्यात आहेत. उपनिषदांत जे लिहीलेय, ते लिखाण ती वास्तविक स्थिती प्राप्त झालेल्या लोकांनी केलेले नसून, ज्यांना ती स्थिती हवीय त्या लोकांच्या आकांक्षा त्यात आहेत...उपनिषदांत अशी व्यक्ती स्वयंप्रामाण्य असते, ती स्वत:च एक अ‍ॅथॉरिटी असते असं म्हटलेलं आहे...त्यानं उपनिषदांना नकार दिला असला तरी बुध्द हा काही ओरीजिनल नव्हता... सगळे साधुसंत असाच नकार देत असतात..

हाईट ऑफ ऑल म्हणजे युजी कृष्णमूर्ती कॉन्शसनेस, "जागरूकता" यासारखे काही अस्तित्वात नसते असे म्हणतात. ध्यान केले जात असते, त्यातून जागरूकता अनुभवली जात असते तेव्हा तो अनुभव हाच मुळात स्वयंकेंद्रीत कृती असते आणि असली कृती कितीही काळ करीत राहिले तरी "स्व" पासून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात राहात नाही;- हेच ते नो वे आऊट~!!!! पण हो, त्या सगळ्या प्रक्रियेचे, स्व पासून मुक्त न होताच अगदी सुंदर भाषेत विश्लेषण मात्र करता येते - त्यातूनच बनावट गुरूंची पैदास होत राहाते. त्यांचे शब्द केवळ पोकळ शब्द असतात, त्यांनी मांडलेली प्रमेये इतर कोणत्याही प्रमेयांसारखीच पूर्णत: बौध्दीक खेळ असतो - पण तो खेळ तो-तो विशिष्ट गुरू जीवंत असे पर्यंत मजेत चालु राहातो. हे सगळे सांगत असताना खुद्द युजी मात्र नेमकी कोणती किल्ली वापरून बाहेर पडले हे ते सांगू शकत नाहीत - बाय सम लक, ऑर बाय सम स्ट्रेन्ज चान्स एवढंच ते म्हणू शकतात. त्यांनी सांगितललेले दृष्टीकोण एकत्र करून एकसंघ विचारसरणी उभी करायलाही त्यांनी कठोरपणे नकार दिला; ज्यांनी ती उभी करायचा प्रयत्न केला त्यांनी तसे करता येणेच शक्य नसल्याची कबुली दिली.

मागील भागांत वर्णन केलेल्या त्यांच्या "कॅलॅमिटी" बद्दलची युजींची वक्तव्ये ही त्या शरीरात निर्माण झालेल्या चक्रीवादळानंतर शरीर ज्या नैसर्गिक स्थितीत पडलेय, फक्त त्या स्थितीचे शब्दात मांडलेले तपशील आहेत. कॅलॅमिटीनंतर कधीच त्यांच्या डोक्यात कुठलाही विचार प्रवेशला नसल्याचे युजी सांगतात. जगात वावरण्यासाठी आवश्यक असेल तेवढाच आणि फक्त बाहेरून साद आली तरच तो घडतो; लगेच त्याचा स्फोट होतो आणि पुन्हा ते निर्विचार स्थितीत जातात. भिंतीवर लावलेल्या घड्याळ्याकडे ते तासन तास पहात राहु शकतील; ते काय आहे, त्यात किती वाजलेत याबद्दल कसलाही विचार न येता! जेव्हा केव्हा कुणी येऊन त्यांना "किती वाजलेत?" असे विचारील तेव्हाच लगेच क्षणात "अमुक इतके वाजलेत" असे युजींकडून उत्तर बाहेर पडते.

कॅलॅमिटीनंतर सुरूवातीच्या काही दिवसांत युजींना प्रत्येक गोष्ट पुन्हा शिकावी लागली; पुढे चालुन पूर्वायुष्यात मेंदूत (युजींचा शब्द डेटाबॅंक) रेकॉर्ड झालेली माहीती हळुहळु पूर्वपदावर येऊ लागली. पण ते फक्त निष्प्राण तपशील होते. ते आत पडून असतील; एखादा तपशील हवा असल्याबद्दल बाहेरून कुणाकडून साद आली, तर आत उपलब्ध असेल तर क्षणात तो बाहेर पडतो, उपलब्ध नसेल तर युजींचे उत्तर ठरलेले असते - "आय डोण्ट नो!" सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत घडते तसे युजींच्या डोक्यात असलेले तपशील जीवंत होऊन आपण होऊन गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या खेळत नाहीत.

चमत्कार वगैरेंच्या बाबतीत स्वत: युजींनी शक्ती किंवा सिध्दी असलेल्या माणसाने येऊन तसे सिध्द करून दाखवावे असे म्हटले आहे. खुद्द युजींची दोन-चार उदाहरणे मात्र गोंधळात पाडणारी आहेत. महेश भट यांना चित्रपटात वापरण्यासाठी बिबट्या किंवा तसलाच हिंस्र प्राणी हवा होता. रोम मधील एका माणसाकडे युजी आणि महेश भट गेले. तिथे असलेले प्राणी त्यांना दाखविण्यात आले. एका पिंजर्‍यातील वाघ डरकाळ्या फोडू लागला आणि हिंस्र झाला. युजींनी "सिट डाऊन!", "सिट डाऊन!" असे म्हणून एकदा नव्हे तर अनेकदा त्या वाघाला खाली बसवले. युजी हे हिंस्र प्राण्यांना प्रशिक्षण देणारे रिंगमास्टर असल्याबद्दलचा त्या शिकारखान्याच्या मालकाचा झालेला गैरसमज महेश भट यांना दूर करता आला नाही.

स्वित्झरलॅण्डमध्येही आणि भारतातही युजी जेव्हा फिरायला जात तेव्हा सतत साप अवतीभवती असतात असे युजीच अनेकदा सांगत असत. माझ्याकडे वैरभावनाच नाही; त्यामुळे मलाही सापांचा धोका वाटत नाही आणि सापांनाही माझा धोका वाटत नाही हे युजींकडून बर्‍याच वेळा ऐकल्यानंतर महेश भट आणि परवीन बाबी दक्षिण भारतात पर्यटन करीत असताना "युजी तुम्ही फिरायला जाता तेव्हा तुमच्या सोबत फिरणारे साप दाखवाच" म्हणून युजींसोबत फिरायला गेले. काही अंतर चालुन गेल्यानंतर रस्त्याच्या कडेने साप नव्हे तर कोब्रा जातीच्या सापांचे अख्खे कुटूंबच सोबत करतेय हे पाहुन महेश भट आणि परवीन बाबी यांनी उलट धूम ठोकली; युजी मात्र रोजचा फेरफटका मारून परत आले.

आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे कॅलॅमिटीनंतर युजींच्या लैंगिक स्थितीचा. त्यांच्याकडे आलेल्या आणि लैंगिक संबंधाबाबत प्रश्न विचारलेल्या लोकांना उत्तर देताना युजी "बॉडी इज इण्ट्रेस्टेड इन ओन्ली टू थिंग्ज - सर्व्हायव्हल अ‍ॅण्ड फ**ग" असे म्हणत असले तरी स्वत: ते लैंगिक संबंध ठेवण्यास अकार्यक्षम असल्याबद्दल सांगत. महेश भट यांनी युजींच्या चरित्रात याबाबतीत दोन किस्से देऊन ठेवले आहेत तेही सांगून टाकतो.
एके दिवशी लोकांच्या घोळक्यात बसून युजी बोलत असताना युजींच्या शेजारी असलेली महिला, पुस्तकात दिलेय त्या प्रमाणे टर्न ऑन झाली. तो प्रकार खूपवेळ चालला. शेवटी युजी तिच्याकडे पाहुन खांदे उडवत म्हणाले - "मॅडम, आय कॅन फील अ‍ॅण्ड सेन्स एव्हरीथिंग यू फिल...बट सॉरी...नथिंग कॅन बी डन!"
दुसर्‍या एका किश्श्यात एका बोल्ड बाईने प्रश्न विचारण्याच्या ओघात युजींना विचारले, "मी जर तुमच्यावर बलात्कार केला, तर काय घडेल?"
युजी निष्पाप चेहेरा करून म्हणाले, "मलाही काही अंदाज नाही, डू इट, वी वील सी व्हॉट हॅपन्स!" ती बाई तिथून उठून निघुन गेली.

रजनीशांनी मात्र एन्लायट्न्मेंटनंतरही आपण सेक्स करू शकतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा चांगला करू शकतो अशा बाता अमेरिकन प्रसारमाध्यमांसमोर मारलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीणी राहिलेल्या महिलांनी मात्र रजनीशांची अमेरिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतींत "ही वॉज जस्ट बिलो दॅन एनी अ‍ॅव्हरेज मेल" असे मत नोंदवलेले आहे.

युजींची त्यांच्या स्वत:च्या बाजूने कुठलीही "टीचींग" नसली तरी भेटायला आलेले लोक आणि युजी दरम्यान जे बोलणे झाले त्यात एक विशिष्ट शैली दिसून येते. युजींच्या सगळ्या बोलण्याचा भर शरीर या घटकावर दिसतो - कारण त्यांचा अनुभव शरीरावर उमटलाच उमटला, पण त्याच शरीरात असलेली त्यांची मनोरचना आणि सगळा पूर्वेतिहासही पुसला गेला. सतत सुरू असणार्‍या त्यांच्या जगप्रवासात विमानातील एअर होस्टेस युजींचे लांब केस, चेहेर्‍यावरील भाव पाहुन त्यांना "मॅडम" म्हणत तेव्हा युजींचे त्याबद्दल काहीही म्हणणे नसे.

दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे विधाने करताना त्यांत असलेला ठामपणा - गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट! गेट अप अ‍ॅण्ड गो! मग भलेही तो माणूस आयुष्यात पुन्हा कधीच भेटला नाही तरी चालेल. कॅलॅमिटीपूर्व युजींच्या लंडनमधील मुक्कामात ब्रिटीश म्युझियममध्ये, कार्ल मार्क्सने ज्या टेबलाशी बसून दास कॅपीटलचे लिखाण केले त्यासमोरच्या टेबलाशी बसून केलेले "अंडरग्राऊंड स्लॅंग" (शिवराळ बोली) या शब्दकोषाचे वाचन नंतर युजींच्या भरपूर उपयोगी पडले. होली हुकर्स, ऑल दॅट इज देअर इन होली स्क्रिप्चर्स इज नथिंग बट शीट! ओम तत सत या थीमवरच युजींनी बोलून दाखवलेल्या दृष्टीकोनांवर आधारीत "ओम दॅट शीट" हे पुस्तकही लिहायचे कुणीतरी फॉरेनरने प्रस्तावीत केले होते.

त्यांची काही विधाने:

मी आणि समाज यांत काही दुष्मनी नाहीय. मला तो बदलण्यात काहीच रूचि नाहीय. माझ्यास्वत:मध्ये बदल घडवण्याची मागणीच आता शिल्लक राहिलेली नाहीय, त्यामुळे माझ्याकरिता अख्ख जग बदलण्याचीही मागणी शिल्लक नाही. मी दु:खात असलेल्या माणसासोबत दु:ख सहन करतो आणि सुखात असलेल्या माणसासोबत सुख.

प्रश्न विचारणारा दुसरे तिसरे काही नसून तो उत्तर आहे. हाच खरा प्रश्न आहे. आपण हे उत्तर स्वीकारायला तयार नाही आहोत कारण युगानुयुगांपासून आपण मानत आलेल्या खर्‍या उत्तरांची त्यामुळे इतिश्री होईल.

निसर्गाला फक्त दोन गोष्टींशी देणेघेणे आहे - टिकून राहाणे आणि त्यासारखी दुसरी गोष्ट पुनर्निर्मित करणे. यावर लादले जाणारे काहीही, ते सगळे संस्कृतीने दिलेले ओझे माणसाच्या कंटाळवाण्या स्थितीला कारणीभूत आहे.

मानवी विचारशक्तीचा जन्म हा मानवी शरीरातील कुठल्यातरी चेतापेशीय दोषातून झाला आहे. त्यामुळे मानवी विचारातून जन्म घेणारी कोणतीही गोष्ट विघातक असते.

आपल्याला एकत्र जगण्यासाठी दहशतीची मदत होईल, प्रेमाची किंवा बंधुभावाची नव्हे. हा संदेश मानवी जाणीवेत घुसून बसल्याशिवाय काही आशा आहे, असे मला वाटत नाही.

ज्ञानावर आधारीत राहून आलेला कोणताही अनुभव हा भ्रम असतो.

सत्य नावाची कसलीही गोष्ट अस्तित्वात नाही. वास्तविक गोष्ट असते ती म्हणजे "तार्किकदृष्ट्या" ठासून सांगितलेले गृहितक, ज्याला तुम्ही सत्य म्हणता.

मी फक्त एवढंच म्हणतोय की तुम्ही शोधत असलेली ही शांती ही अगोदर पासूनच तुमच्यात आहे, तुमच्या शरीराच्या सुसंवादी क्रियांमध्ये.

तुम्ही भयावर प्रेम करता. भय समाप्त होणे हाच मृत्यू असतो, आणि तुम्हाला ते घडू द्यायचे नाहीय. मी शरीरातील फोबिया बाहेर फेकण्याबद्दल बोलत नाहीय. ते शरीर टिकून राहाण्यासाठी आवश्यक आहेत. भयाचा मृत्यू हाच खरा मृत्यू आहे.

तुम्ही हे तथ्य स्वीकारायलाच तयार नाही आहात की तुम्हाला हार पत्करावी लागणार आहे. संपूर्ण आणि इथून-तिथून शरणागती. हीच ती निराश स्थिती असते जी बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग अस्तित्वात नाही असे सांगते... कोणत्याही दिशेला चाललेली, कोणत्याही पैलूवर चालणारी, कोणत्याही स्तरावर चालणारी कोणतीही हालचाल, तुम्हाला तुमच्या पासून दूर घेऊन जात आहे.

इतर सगळे मार्ग नाकाराल तेव्हाच तुम्ही तुमचा मार्ग शोधू शकाल.

अन्न, वस्त्र आणि निवारा - या मूलभूत गरजा आहेत. त्यापुढे तुम्हाला काहीही हवे असेल, तर ती स्वत:लाच फसवण्याची सुरूवात आहे.

स्वार्थी व्हा आणि स्वार्थीच राहा हा माझा संदेश आहे. एन्लायट्न्मेंट हवी असणे स्वार्थ आहे. दानशूरता स्वार्थ आहे.

आपले सर्व अनुभव, आध्यात्मिक असोत की आणि कुठलेही आपल्या दु:खाची मूलभूत कारणे आहेत... तुम्हाला रूचि असलेल्या कोणत्याच गोष्टी शरीराला रूचि नसते. हेच युध्द सतत चालू असते.. बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग आहे असे दिसत नाही...

तुमच्याकडे अगोदरच असलेले ज्ञान न वापरता कोणत्याच गोष्टीकडे पाहाण्याचा मार्ग नाही.

मला माझा स्वत: म्हणता येईल असा एकही विचार, एकही शब्द, एकही अनुभव माझ्याकडे नाही.

इतरांनी जे सांगितलेय त्याचा चुराडा करणे (ते फार सोपे आहे) हा माझा हेतू नाहीच, तर मीच जे सांगतोय ते नष्ट करीत जाणे हा माझा हेतू आहे. आणखी तंतोतंत बोलायचं तर, मी जे सांगतोय त्यातून तुम्ही जो अर्थ काढताय त्यालाच खोडा घालायचा मी प्रयत्न करतोय.

माझे कार्य, जर असेल तर, ते म्हणजे मीच केलेले प्रत्येक विधान खोडून काढणे. मी जे म्हणालोय ते गांभिर्यानं घेऊन ते वापरण्याचा किंवा लागू करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही धोका पत्करताय.

तुम्हाला वाचवले जाऊ शकते या कल्पनेपासूनच तुम्हाला वाचवण्याची गरज आहे. तुम्हाला वाचणार्‍यांपासून वाचवण्याची आणि तुमचे पुनरूत्थान करणार्‍यांपासून तुम्हाला हिसकावून दूर फेकण्याची गरज आहे.

तुम्हाला जेव्हा काहीच माहीत नसते, तेव्हा तुम्ही खूपकाही बोलता. तुम्हाला काही माहित असते तेव्हा, बोलण्यासारखे काहीच नसते.

मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की व्यक्ती नावाचा कसलाच प्रकार कुठंच नाही. ते म्हणजे ज्ञानाचे विशिष्ट गाठोडे असते - तो विचार असतो - पण तिथे व्यक्तीत्व नसते.

तुम्हाला मदत करण्यासाठी केलेली कुठलीही गोष्ट तुमच्या परेशानीत भर घालील. मला ऐकत राहाण्यातून तुमच्याकडे ज्या लोकांची आधीपासूनच थप्पी लागलेली आहे त्यात अजून एकाची भर पडेल.

पूर्वी कुणीच स्पर्श केलेला नाही अशा बिंदूवर तुम्हाला जीवनाला स्पर्श करावा लागेल. ते तुम्हाला कुणीही शिकवू शकत नाही.

सर्वप्रथम जीवनाला स्पर्श करण्याचे धैर्य तुमच्याकडे असेल, तर तुमच्या डोक्यावर काय येऊन आदळलेय हे तुम्हाला कधीच कळणार नाही. शिकवलेल्या, वाटलेल्या आणि अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींनीच काढता पाय घेतलाय आणि त्या जागी काहीही येऊन बसलेले नाही.

माझ्या, सगळ्या गुरूंच्या चिंध्या करण्याचे धैर्य तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही फोटोग्राफ्स, कर्मकांड, जन्मदिन उत्सव आणि तसल्याच गोष्टी करणारे सांप्रदायिक राहाल.

मी नेहमीच यावर जोर देतोय की समजून घेण्यासारखे काहीच नाही हे सत्य तुमच्यावर येऊन आदळले पाहिजे.

आध्यात्मिक ध्येयांच्या मागे लागुन कोणतीतरी जादू होऊन तुमची भौतिक ध्येये सोपी आणि सहज होतील असे समजणे तुमची चूक आहे.

मी फक्त एवढीच हमी देऊ शकतो की जोपर्यंत तुम्ही सुख शोधत राहाल, तो पर्यंत तुम्ही दु:खात खितपत पडाल.

तुमचे मन किंवा माझे मन असली कोणतीही गोष्ट नसते. कदाचित "वैश्विक मनासारखी" गोष्ट असू शकेल ज्यात साठत आलेले ज्ञान आणि अनुभव एकत्र होतात आणि एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे येतात.

इकडे तिकडे फिरणार्‍या मुंग्या किंवा आपल्या डोक्यावर घोंगावणार्‍या माश्या किंवा आपले रक्त शोषून घेत असलेले डास यांपेक्षा जास्त इतर कोणत्याही उदात्त हेतूसाठी आपली निर्मिती झालेली नाही.

तुम्ही जगत आहात आणि तुम्ही मराल हे भय पटवून देत असते. भय समाप्त व्हावे हे आपल्याला नको असते. त्यामुळेच आपण आपण ही सगळी न्यू माईंड्स, न्यू सायंन्सेस, न्यू टॉक्स, थेरपीज, चॉईसलेस अवेअरनेस आणि वेगवेगळ्या अटकली शोधून काढल्या आहेत.

तुम्हाला भय याच गोष्टीपासून मुक्त व्हायचे नाहीय. भय समाप्त झाले तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या आटोपाल. वैद्यकिय मृत्यू घडून जाईल.

सूर्यप्रकाशा इतके सत्य म्हणजे तुम्हाला एकही अडचण नसते, तुम्ही ती तयार करता. तुम्हाला काहीच अडचणी नसतील तर तुम्ही जगत आहात असे तुम्हाला वाटत नाही.

हे सगळं काय आहे हे जाणून घेण्यास खुमखुमी असलेल्या कुणाकडेही असणारा पाहाण्याचा एक मार्ग म्हणजे विभक्त होण्याची क्रिया कशी घडते आहे, तुमच्या अवतीभवती आणि आतमध्ये घडणार्‍या गोष्टींपासून तुम्ही स्वत:ला वेगळे कसे पाडता आहात तेवढेच पाहाणे.

निसर्गात मृत्यू किंवा विनाश बिलकुल घडत नाही. फक्त अणुंचे विस्कटणे आणि आकार घेणे घडते. विश्वात "ऊर्जेचा" समतोल राखण्याची गरज किंवा आवश्यकता निर्माण झाली तर, मृत्यू घडतो.

चूक आणि बरोबर, चांगले आणि वाईट या भानगडीत तुम्ही जेव्हा बिलकुल नसाल तेव्हा तुम्ही कधीच काहीही चुकीचे करू शकणार नाही. तुम्ही या दोन डगरींवर अडकलेले असाल तोपर्यंत तुम्ही नेहमीच चुकीचे करीत राहाल.

आपल्याला वाटते की आपल्या आत विचार आहेत. ते स्वयंनिर्मित आणि स्वयंभू आहेत असे आपल्याला वाटते. वास्तविक मी ज्याला विचार-कक्षा म्हणतो ती गोष्ट तिथे असते. ही विचार कक्षा पिढ्यान पिढ्यांपासून सोपवलेले माणसाचे अनुभव, विचार आणि भावना यांची एकूण बेरीज असते.

विचारातून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, आतापर्यंत तुम्ही लावलेला प्रत्येक शोध विघातक हेतूंसाठी वापरण्यात आलाय. आपला प्रत्येक शोध, आपले प्रत्येक संशोधन आपल्याला मानव जातीच्या पूर्ण विनाशाकडे ढकलत आहे.

कंटाळा हा एक बूड नसलेला खड्डा असतो. तुम्ही वास्तविक जे करताय त्यापेक्षा जास्त मनोरंजक, जास्त मोठा हेतू असलेले काहीतरी आहे असा जोपर्यंत विचार कराल, तोपर्यंत कंटाळ्यातून मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही.

संवाद किंवा बोलण्याचा एकूणच हेतू म्हणजे दुसर्‍या माणसाला तुमच्या दृष्टीकोनाचा करून घेणे. तुमच्याकडे कोणताच दृष्टीकोन नसेल तर समोरच्या माणसाकडे तुम्हाला त्याच्या दृष्टीकोनाचा करून घेण्याचा किंवा तुमचे मतपरिवर्तन करण्याचा कोणताच मार्ग नसतो.

उत्तम जीवनशैलीसाठी फक्त जैविक घडणीत असलेली असाधारण हुशारीच आवश्यक असते, पण आपण नेहमीच विचाराच्या माध्यमाने तिच्या नैसर्गिक संचालनात तंगडे अडकवत असतो.

तुम्ही जे आहात त्यापेक्षा कुणीतरी वेगळे बनण्याच्या दिशेने हालचाल नसेल तेव्हा, तुमचा स्वत:शी कुठलाच वाद राहात नाही.

तुमच्या अवतीभवती असलेले सर्वकाही ही विचाराची निर्मिती आहे हे तुम्ही विसरलात. तुम्ही स्वत:च विचारातून जन्मलेले आहात तुम्ही इथे बिलकुल नसता. या अर्थाने  विचार प्रचंड मौल्यवान आहे, तरीही तुमचा घात करणारी तीच गोष्ट आहे.

प्रत्येकवेळी विचार जन्मतो तेव्हा तुम्ही जन्म घेता. तुम्ही जगत असताना अस्तित्वात नसते अशी ही विशिष्ट गोष्ट नाही, तर तिच्या जन्ममरणाची मालिका सुरूच असते.

युजींच्या हयातीत काढण्यात आलेल्या फोटोग्राफ पैकी सर्वोत्तम फोटो - एक पूर्णविराम, परिपूर्णता, कोरेपणा




(पुढच्या भागात राहिलेली चर्चा आणि युजींना निरोप)