६ डिसेंबर, २०११

येळकोट येळकोट जय मल्हार

गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना.
खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय.
खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.
तर ही सट म्हणजे काय आणि ती आमच्या गावाकडे कशी साजरी होते त्याचा हा फोटो वृत्तांत.
चंपाशष्‍ठीपूर्वी आठ दिवसांपासूनच गावातले धनगर गडी खंडोबाच्या देवळात 'वारु' म्हणून बसलेले असत. खंडेराया, माझं हे कामं होऊ दी, म्होरल्या साली तुझा वारु म्हनून सेवा करीन असा नवस खंडोबासमोर बोलला आणि ते विविक्षीत काम झालं की वारु म्हणून बसणं आलंच. 
 
मग वारु म्हणून बसलेल्या लोकांचं सट होईपर्यंत पुजा-अर्चा, खाणं-पिणं, रहाणं सगळं खंडोबाच्याच मंदिरात. बाजाराचा दिवस म्हणजे बुधवार सटीच्या दिवशी येईल अशा बेतानं गावात हे वारु गाड्या ओढतात. या वारुंच्या अंगात आलेल्या खंडोबाकडून श्रद्धाळू धनगर आणि इतरही लोक चाबकाचे फटके खातात.
सटीच्या दिवशी मग आजीकडून मल्हारी मामा नावाच्या एका धनगर आजोबाला बोलावणं जाई. नैवैद्य-वैश्वदेव झाल्यानंतर खंडोबाची तळी उचलायची असे. हे मल्हारी मामा मग त्यांच्यासोबत तळी आणि खंडोबा समोरच्या दिवट्याच्या काजळानं काळा कुळकुळीत झालेला विळा घेऊन घरी येत. तळीसमोर आरती झाली आणि ती विधीपूर्वक ती उचलली की विळ्यावरचं काजळ घरातल्या पोरासोरांच्या आणि गडी माणसांच्या डोळ्यांना लावलं जात असे.
जेवणं उरकली की खंडोबाकडं पळायचं असे. गावभरातल्या बैलगाड्या खंडोबासमोर आणून ओळीनं एकामागे एक लावल्या जात. ओढताना मध्येच सुटु नये म्हणून त्या दोन्हीकडून सोलीनं पक्क्या बांधल्या जात. पार भोईवाडा, आखरापासून (गावचं मैदान) ते खंडोबाच्या पायरीपर्यंत या गाड्या ओढल्या जातात. 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत दणाणून जाई आणि गाड्यांमध्ये बसायला पोरासोरांची झुंबड उडालेली असे. एरव्ही वर्षभरात कधीही जागा न बदलणारा बाजार सटीच्या दिवशी मात्र खंडोबाकडं भरलेला असे. वारु गाड्या ओढत असताना त्यात बसण्यात, वारुकडून माणसं कोरड्याचे फटके खाताना बघण्‍यात थरार असे. वर्षभरात चुकून हुकून घडलेलं पाप खंडोबाच्या कोरड्यानं फटके खाल्ले की धुवून निघतं असा समज. गावातले जख्ख म्हातारे झालेले धनगरही बाह्या सरसाऊन सुरकुतलेले हात अंगात आलेल्या आणि कोरडा घेऊन झुलणार्‍या वारु समोर धरायचे.. हातात धरायच्या ठिकाणी घुंगरं बांधलेला कोरडा रप्पकन त्या हातांवर पडायचा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. जास्तीत जास्त पाच कोरडे हातावर घेतले की माणूस खंडोबा अंगात आलेल्या वारुच्या पायावर लोटांगण घेत असे..  किंवा फारच श्रद्धाळू असला की कोरडे खाणाराच्याच अंगात येऊन तो तसाच गर्दीत झुलत राही.. मग चार-दोन लोक पुढे येऊन रक्ताळलेल्या हातांवर खंडोबाची हळद भरीत..
नगरप्रदक्षिणा व देवदर्शनासाठी निघालेले वारु


नगरप्रदक्षिणा



प्रत्येक वारुला गाडी ओढावी लागते, प्रत्येक वेळी खंडोबाची आरती होते
From



खंडोबाची आरती



गाड्या ओढल्या जात असताना


गाड्या ओढल्या जात असताना


खंडोबा अंगात आलेले वारु कोरड्यानं स्वतःलाही झोडपून काढतात आणि इच्छुकांनाही