८ ऑक्टोबर, २०१०

यु.जी.कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार

कॅलॅमिटीनंतर युजींनी सर्वप्रथम बंगळूरातील इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड कल्चरसमोर भाषण केले. या भाषणात त्यांनी मानवतेला देण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही संदेश नसल्याबद्दल आणि त्यांना जे घडलेय ते आध्यात्मिक कक्षेच्या पूर्णत: बाहेरचे असल्याबद्दल सांगितले. हे त्यांचे शेवटचेच भाषण ठरले. त्यानंतर त्यांनी कधीच, व्याख्यानाचे कुठलेच निमंत्रण स्वीकारले नाही; कुठल्याच प्रकारे त्यांना घडलेल्या घटनेभोवती किमान स्वत: होऊन तरी वलय निर्माण केले नाही. पुढे युजी कृष्णमूर्तींसोबत झालेल्या लोकांच्या किंवा तथाकथित साधकांच्या चर्चा या अत्यंत अनौपचारिक गप्पांसारख्या आहेत; ज्यात युजी कृष्णमूर्ती त्यांच्याकडे प्रश्न विचारायला आलेल्या लोकांची किंवा तथाकथित साधकांची “साधनेची” धुंदी पूर्णत: उतरवून टाकतात, त्यांच्याकडे गेलेल्या प्रश्नाळू लोकांना कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन घेण्याच्या हेतूने त्यांच्या जवळपासदेखील फटकायला संधी नसे; विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या चिंध्या होत. पण ते सरळसोटपणे लोकांना हाकलूनही लावत नसत. मित्रांसोबत चाललेल्या अनौपचारिक गप्पा ऐकायच्या असतील तर त्या ऐकायला आणि गप्पांच्या ओघात आध्यात्मिक विषयासंबंधाने त्यांचा दृष्टीकोन मांडण्याचा युजींचा मूड आला तर, ते ऐकण्यासाठी, फक्त मुक्त चर्चेच्या रूपात साधेसुधे प्रश्न विचारण्यासाठी युजींची ना नसे. याच चर्चांचे चित्रांकन करून युट्यूब, व्हिडीओसर्फ आणि गुगल व्हिडीओवर वेगवेगळ्या लोकांनी टाकले आहे – ते आज आपण पाहू शकतो.

महेश भट आणि युजी

महेश भट आणि युजींमध्ये संबंध कसे निर्माण झाले ते पाहाणे फार मनोरंजक आहे. युजींच्या संपर्कात येण्यापूर्वी महेश भट हे रजनीशांचे संन्यासी होते. त्या काळात विनोद खन्ना, गोल्डी उर्फ विजय आनंदसह बॉलीवूडमधील बरेच लोक रजनीशांकडे आकर्षित झालेले होते. रजनीशांची गर्भश्रीमंत, वलयांकित व्यक्तींना स्वत:कडे आकर्षित करून घेण्याची एक विशिष्ट “मोडस ऑपरेंडी” होती; त्याबाबतीत रजनीशांवर इथे काही लिहीण्याचा योग आला तर विस्ताराने लिहू. पण एक किस्सा आठवतो. 
दादा कोंडके

               पुण्याच्या आश्रमात रजनीशांचे “डिस्कोर्सेस” दररोज चालू असल्याच्या काळात पुण्याच्याच थेटरांमध्ये दादा कोंडकेचे “विच्छा माझी पुरी करा” जोरदार चालू होते. त्यात दादांनी “बाबागिरी”वर एक फार्स सादर केला होता. रजनीशांनी या गोष्टीची स्वत:होऊन नोंद घेतली आणि दादा कोंडके यांना आश्रमात बोलावून घेतले. एकतर रजनीशांभोवती त्यांनी स्वत:च पध्दतशीरपणे, अत्यंत सूक्ष्मप्रकारे निर्माण केलेले, पाहाणाराला बिलकुल कृत्रिम वाटणार नाही असे “पोहोचलेला माणूस” या प्रकारातले एक वलय असे आणि हे वलय ते सतत टिकवून ठेवत. आश्रमात येणार्‍या असामींबद्दलची खडानखडा व्यक्तीगत माहिती रजनीशांपर्यंत पोहोचत असे आणि गरज पडेल तेव्हा तीच माहीती रजनीश बेमालूमपणे, आडूनआडून त्या असामीसमोर मांडत राहात – रजनीशांना ते कळले  कसे याबद्दल ती असामी मात्र परेशान होत असे आणि काहीच संबंध न जोडता आल्याने बर्‍याच उदाहरणांत बर्‍याच ख्यातनाम लोकांनी रजनीशांना “सगळे काही दिसते” टाईप समजुतीला दुजोरा दिलेला आहे.
               रजनीशांची देहबोली अत्यंत अकृत्रिम, बोलणे अगदी लाघवी, शांत, हवेहवेसे. ते जिथे राहात त्या राजमहाल सदृश्य वास्तूतील दालनात दोन-दोन ए.सी. बसवलेले असत आणि फुल्ल स्पीडने ते सतत चालू असत. आलेल्या व्यक्तीला त्या दालनातील गारठा सहन होणार नाही असे वातावरण असे. गारठ्यात राहाण्याची रजनीशांची सवय होती. तर रजनीशांचे बोलावणे आलेय म्हटल्यावर दादा कोंडके त्यांच्या या असल्या वातावरण आश्रमात गेले. रजनीशांनी दादा कोंडकेंना विचारले “आपके प्रोग्रैम में आप हमारी मजाक उडाते है ऐसा सुनने में आया है..क्या बात है..” मी माझ्या कार्यक्रमात “बाबा” लोकांची टिंगल करतो; व्यक्तीगत तुमची नाही ही बाब दादा कोंडकेंनी रजनीशांसमोर स्पष्ट केली. भेट संपवताना रजनीशांनी दादा कोंडकेंच्या हातात स्वत:चे अत्यंत मुलायम, मऊसर हात ठेवत आश्रमात “येत राहायला” सांगितले. एखाद्या बाईचेसुध्दा एवढे मुलायम हात मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेले नाहीत हे दादा कोंडकेंनी त्यांच्या “एकटा जीव” मध्ये लिहीले आहे. बहरहाल, पुढे चालून दादा रजनीश के शिकंजे में नहीं फंसे.

युजी आणि महेश भट


     पण महेश भट रजनीशांच्या तावडीतून सुटून युजींच्या संपर्कात आले कसे ते पाहाण्यासारखे आहे. ताणतणावाच्या आयुष्यात महेश भट एलएसडी च्या आहारी गेले होते. रजनीशांचे संन्यासी होते. यादरम्यानच श्री. भट हे जेकेंचे दि अवेकनिंग ऑफ इन्टेलिजन्स हे पुस्तक वाचत असताना प्रकाश कारवत यांनी महेश भट यांना सगळा गुरूगिरीच्या धंदा कसा चालतो ते समजावून सांगून “युजी नावाची एक व्यक्ती दरवर्षी भारतात येते, ते बेंगलोरमध्ये थांबतात – ते अज्ञात राहातात,  एकदा भेटून पहा ”  असे सुचवले. महेश भट हे मूळात चित्रपट निर्माते (त्या काळात महेश भट यांचा “स्ट्र्गल” सुरू होता) - रजनीशांचे संन्यासी – रजनीशांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान वगैरे करणारे. थोडक्यात रजनीशांकडून तहान जागी केलेले साधक. या दोघांतील भेटीदरम्यान युजींनी केलेले बोलणे युजींच्या आध्यात्मिक दृष्टीकोनाचे मासलेवाईक उदाहरण असल्याने ते तसेच्या तसे इथे टाकतो:

युजी 
“मी काही देवमाणूस नाहीय. नव्हे, मला फ्रॉड म्हणता येईल. वेदनांशिवाय आनंद मिळवू शकणे अशक्य असल्याने माणसांच्या आयुष्यात देवाच्या शोधाचा गुंता निर्माण झाला. मन नावाच्या जांगडबुत्त्याने अनेक विघातक गोष्टी निर्माण केल्यात. त्यापैकी सर्वात विघातक गोष्ट आहे ती म्हणजे देव. देव हाच आत्यंतिक आनंद बनून राहिला आहे. स्वानुभूती, मोक्ष किंवा मुक्ती, रूपांतरणाच्या फॅशनेबल क्लृप्त्या, पहिले आणि शेवटचे स्वातंत्र्य हे देवत्वाचे दुसरे प्रकार आणि तसलीच कितीतरी स्वातंत्र्ये अधेमधे कुठेतरी येतात – याच सगळ्या गोष्टी माणसाला पागलपणा-तणावाच्या स्थितीत ढकलत आहेत. उत्क्रांतीच्या वाटेवर कुठेतरी, इतर जीवमात्रात जाणीव जशी कार्य करीत असते त्याच्या अगदी उलट माणसाला स्वत:च्या जाणीवेबद्दल जाण आली. इथंच, जाणीवेत तयार झालेल्या त्या दुभागणीत,  निसर्गाने प्रचंड काळजी घेत जे-जे काही तयार केले आहे त्याच्या सत्यानाशाची भीती दाखवत असणारा तो देव जन्माला आला..“
“या पृथ्वीवरची कोणतीच शक्ती, कोणताही देव, कोणताही अवतार हे थांबवू शकत नाही. माणूस आटोपलाय. त्याला काहीच करण्याचे स्वातंत्र्य नाही. जागतिक अणुयुध्द थांबविण्याचे मार्ग शोधण्याच्या गप्पा चालू असतानाच आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे जगाचा नाश होण्याची वाट पाहाणे.” युजी चिडवलेल्या बैलासारखे धुसफुसत होते.
“असं बोलून तुम्ही आमच्याकडून आशा हिसकावून घेत नाहीय का, सर” महेश भट.
युजी हसले आणि म्हणाले,
“हो का? मी काही आशावादी महापंडीत नाही. तुम्ही आशा करीतच जगलात किंवा मेलात तरी चालेल.”
“लैंगितेबद्दल तुमचा विशिष्ट दृष्टीकोण आहे काय?” महेश भट.
युजी म्हणाले, “ देव आणि लैंगिकता एकाच स्रोतातून उगम पावल्यात. देव हा आत्यंतिक आनंद आहे. लैंगिकता नष्ट होण्यापूर्वी देव नष्ट व्हायलाच हवा. लैंगिकता का जायला हवी? मी अगोदरच नमुद करतो की सेक्सच्या विषयावरील माझ्या संपूर्ण विचारांवर साधु बैराग्यांचा प्रभाव होता. पण आता मी सांगतो की ब्रम्हचर्य पालनाचे जीवन, सेक्सला नकार आणि आध्यात्मिक जीवनाशी संबंधित तसल्याच त्या सर्व गोष्टींचा माझ्याबाबतीत जे घडलेय त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. याचा अर्थ असा नाही की सेक्समध्ये रंगुन जाणे किंवा लिंगपिसाटाचे आयुष्य जगणे, एन्लायटन्मेंट किंवा तुम्हाला त्याला जे काही म्हणायचेय ते म्हणा – त्यासाठी पूरक ठरते. असल्याच कचर्‍यावर तुमचे पोषण झालेले आहे आणि कसल्याच प्रकारे मी तुम्हाला भ्रमित करायला इथे बसलेलो नाही. गांजा कसणे किंवा लैंगिक बजबजाट हा स्वत:ला जाणून घेण्याचा किंवा समाधीत जाण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अशी स्वत:ची खुशाल समजूत करून घ्या. वर्तनाची नैतिक बंधने आणि कायदे हे दोन्ही तुम्ही पायदळी तुडवता आहात ती तुमचा समाज आणि तुमच्यातील बाब आहे. सामाजिक दृष्टीकोण बदलत असतील, पण अजूनही तुमची कृत्ये समाजविघातक मानली जातात. ”
पुढे महेश भट आणि युजींमध्ये बराच “संवाद” झाला –त्यातून महेश भट यांचे आध्यात्माबाबतचे समज किंवा गैरसमज चकणाचूर झाले. सेक्सबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना महेश भट यांना युजी म्हणतात–
“तुझ्या गुरूने तुला लायसन आणि पांघरूण दिलेय, त्यामुळे तुला त्यात कसलीही अनैतिकता किंवा बजबजाट  वाटत नाही. अगदी याच पध्दतीने, बॉलीवूडमध्ये भूमिका मिळवण्यासाठी प्रोड्यूसर-डायरेक्टरसोबत सेक्स करणार्‍या नवोदित तारकासुध्दा स्वत:ला धंदेवाईक वेश्यांपेक्षाही कितीतरी वरच्या दर्जाच्या समजत असतात. अभिनयाच्या वलयांकित धंद्यात असल्याने त्या सहज स्वत:ला वेगळे समजू शकतात. तु सुखी आहेस? तुमच्यापैकी कोण सुखी आहे? तु? तुझी मैत्रिण? तुझी बायको? तिचा बॉयफ्रेंड? प्रत्येक जण दु:खी आहे. तुझ्या वागण्याचा प्रभाव प्रत्येकावर पडतो हे विसरू नको. प्रत्येकजण केविलवाण्या स्थितीत आहे. ”
या संवादातून आध्यात्मिक कोमाच्या अवस्थेत असलेले महेश भट खडबडून उठले असे ते स्वत:च कबूल करतात. युजींशी संवाद म्हणजे वीज वाहून नेत असलेल्या तारेला स्पर्श करणे होते. महेश भट यांचा आध्यात्मिक जगतातील प्रवेशच एलएसडीचे भूत मानगुटीवर बसल्याने झाला होता. मादक पदार्थ घेऊन झालेल्या परिणामातून बाहेर पडण्याच्या इच्छेने महेश भट हे आध्यात्मिक बाजाराच्या गल्लीकडे वळलेले होते.
“ध्यान ही युध्दभूमी आहे” महेश भट युजींचा निरोप घेत असताना युजी म्हणाले.
महेश भट यांचा रजनीशांशी संबंध येऊन दोन वर्षे उलटली होती. पण युजींना भेटल्यानंतर मात्र महेश भट यांना ध्यान करता येईना, गोंधळ उडू लागला. गारठून गेलेल्या रात्रीच्या वेळी, निर्जन रस्त्यावर शेकत बसणारे लोक सुखी आहेत, रस्त्याने फिरत फिरत आलेला आणि त्यांच्यात सामील झालेला मी, महेश भट, एक चित्रपट निर्माता एवढ्या जवळून पाहायला मिळाल्याने तर त्यांना फारच आनंद झालेला आहे पण मी स्वत: मात्र दु:खात आहे. मी का दु:खात आहे? महेश भट स्वत:शी विचार करू लागले. रात्री झोप येईना. त्यांच्या आतून त्यांना कुणीतरी म्हणू लागले, “मित्रा, तु भानगड ओढवून घेत आहेस!”
त्याच हिवाळ्यातील एका सायंकाळी पुण्याच्या आश्रमात रजनीशांची भेट होताच महेश भट रजनीशांसमोर त्यांना होणारा त्रास मांडू लागले -
“मला एकटंएकटं, हरवल्यासारखं वाटतंय. मी घाबरलोय, मनात शंका खदखदतायत. मदत करा मला!”
रजनीशांनी भट यांच्यावर दृष्टी खिळवली, हळूवारपणे स्वत:चा हात त्यांच्या कपाळावर ठेवत म्हटले,
 “जिससला सुळावर चढवले जात होते तेव्हा जिससलादेखील अशाच संशयाने पछाडले होते, देवाचा धावा करीत ते आरोळ्या मारत होते. पण ते शब्द उच्चारत असतानाच देव त्यांच्याच शेजारी उभा आहे हे त्यांना जाणवले.” “मी तुझ्याच सोबत आहे.”
त्याच सायंकाळी महेश भट यांना रजनीशांनी स्वत:ची पांढरी कफनी (रोब) भेट म्हणून दिला.
“हे घालत जा महेश. सगळं काही ठीक होईल. तु चांगली प्रगती करतो आहेस.” या शब्दांनी रजनीशांनी महेश भट यांना दिलासा दिला. महेश भट यांना ज्या गोष्टी ऐकायच्या होत्या त्या त्यांनी सांगितल्या. पण दुर्दैवाने, सगळे काही उत्तम असल्याची महेश भट यांची ती भावना फार काळ टिकू शकली नाही. त्यांना पुन्हा पुन्हा “भगवान रजनीशांच्या आणखी एका दर्शनाची” भीक मागण्यासाठी रजनीश आश्रमाच्या फ्रंट गेटवर चकरा माराव्या लागल्या. पुढचा अड्डा कधी जमणार यासाठी जीव तुटत असलेल्या, एखाद्या ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या माणसासारखी गत होती. रजनीश हे त्यांच्या कुबड्या बनले होते – महेश भट त्यांच्या ब्लॉगवर सांगतात.  
रजनीशांसोबतचे महेश भट यांचे दिवस संपत आल्याचे  त्यांना स्पष्ट दिसू लागले. महेश भट यांच्या मनातील “भगवान” मरू लागले.  शेवटी, रजनीशांनी दिलेली संन्यासाची माळ तुकडे-तुकडे करून ती संडासात फेकून देऊन महेश भट यांच्या जीवनातील रजनीश अध्याय संपला.
नव-संन्यास इंटरनॅशनल कम्युनभोवती आणि आतबाहेर गेलेल्या तीन वर्षांतून महेश भट यांना स्वत: मध्ये काडीचीही सुधारणा होत असल्याचे जाणवले नाही.
“पुस्तके आणि व्याख्यानांतून लोक बदलू शकत असते तर, हे जग स्वर्ग बनले असते” युजी म्हणतात.
महेश भट यांनी रजनीशांनी दिलेली माळ संडासात फेकल्याची खबर आश्रमात पोहोचली होती. विनोद खन्नांच्या मार्फत महेश भट यांना आश्रमात भेटायला येण्याचा निरोप पाठवण्यात आला.
“का महेश? तु असे का केलेस?” खरोखर, मनातून वाटणारी काळजी दाखवत विनोद खन्ना महेश भट यांना विचारू लागले.

रजनीश उर्फ ओशो













“मी भगवानांना एवढ्या रागात कधीच पाहिलेले नाही. तु समक्षच आश्रमात येऊन त्यांनी दिलेली माळ त्यांना परत करावीस असा त्यांनी आग्रह धरलाय. तुझ्याबाबत ते कठोर परिश्रम घेत आहेत, तु विश्वासघात केलास असे ते म्हणतात. तु जर आश्रमात परत आला नाहीस, तर ते तुला नष्ट करून टाकतील असे ते म्हणातायत, महेश.” माझे आयुष्य बोटावर मोजण्या इतकेदिवसच राहिलेय असे भाव चेहेर्‍यावर ठेऊन विनोद खन्ना माझ्याकडे पाहात होता. मी “देवा”च्या विरूध्द बंडखोरी केली होती. त्याचा जळजळीत राग माझ्यावर रोखला होता   – महेश भट सांगतात.

युजी, महेश भट आणि विनोद खन्ना
















       निरपेक्ष प्रेमावर आणि दुसर्‍यावर मालकीची भावना कशी वाईट असते यावर तासन तास व्याख्यान झोडणार्‍या रजनीशांचा हा दुटप्पीपणा पाहुन, प्रेयसी सोडून गेल्याचे सहन होत नसणार्‍या प्रियकरासारखेच रजनीशांचे “दिल जले” टाईप वर्तन पाहुन महेश भट काय समजायचे ते समजले आणि युजींच्या “सगळ्या कुबड्या फेकून द्यायला लावेल तोच खरा गुरू. तो तुला चालायला सांगेल आणि तु पडलास तर पुन्हा उठ आणि पुन्हा चालायला लाग असे म्हणेल. कितीही थरथर सुटलेली असो, उठ आणि स्वत:च्या पायावर उभा राहा.” या शब्दांनी महेश भट यांना दिलासा मिळाला, आत्मविश्वास निर्माण झाला. महेश भट युजींचे मित्र बनले. युजी जेव्हा-जेव्हा भारतात येतील तेव्हा ते त्यांची भेट घेऊ लागले – त्यांना भेटायला परदेशात जाऊ लागले. पुढे महेश भट यांनीच, युजींच्या शिव्या खाऊन का होईना पण युजींचे आत्मचरित्र लिहीलेय.

युजी आणि महेश भट  




















(पुढच्या अंतिम भागात यु.जीं.ची वेगवेगळ्या विषयावरील मते, युजींचे व्यक्तीगत आयुष्य आणि  यु.जीं. चा मृत्यू)
(फोटो सौजन्य: मायाजाल, महेश भट यांचा ब्लॉग http://ug-k.blogspot.com)

५ ऑक्टोबर, २०१०

युजी कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन

आतापर्यंतचा युजींचा प्रवास रेखाटून झाल्यानंतर आणि या लेखमालेत “त्या स्फोटाचा” ओझरता का होईना पण संदर्भ आल्यानंतर युजी ज्याला कॅलॅमिटी:चक्रीवादळ म्हणतात ते नेमके काय हे पाहाणे मनोरंजक आहे. सुदैवाने युजींच्या या प्रवासाबद्दल मिनीट-टू-मिनीट नोंदी उपलब्ध आहेत, खुद्द युजींच्याच तोंडून नेमके काय आणि कसे घडले त्याचा वृत्तांत उपलब्ध आहे आणि आजही जिज्ञासूंना तो ऐकायला, वाचायला मिळतो.  “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” हा प्रश्न काही काळ शरीराच्या रोमरोमात भिनला, पेटून उठला आणि तो प्रश्नच युजींचे अस्तित्व बनून गरगरत राहिला, गरगरत राहिला आणि अचानक गायब झाला. युजींमध्ये निर्माण झालेल्या या मूलभूत प्रश्नाला कोणतेच उत्तर नव्हते किंवा ज्या स्थितीत ते खेचले गेले ती स्थितीच त्या प्रश्नाचे उत्तर आहे असे म्हणावे वाटते. उत्तरच नाहीय असे दिसल्यानंतर तो मूलभूत प्रश्न गायब होण्याची परिणिती शरीराच्या आत, बाहेर आणि एकूणच युजी म्हणून जी कुणी व्यक्ती होती तिचा मानवी इतिहासात कधीही कुणाचा झाला नाही अशा कायापालटात झाली. याबद्दल बोलताना म्हणतात युजी म्हणतात, “तो आत अचानक झालेला एक “स्फोट” होता ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक धमणी आणि प्रत्येक ग्रंथी त्या स्फोटात भाजून निघाली, भडकून उठली. या स्फोटासोबतच विचार सतत टिकून असतो, आत कुठेतरी केंद्र असते हा भ्रम नाहीसा झाला आणि विचारांची जोडाजोड करणारा “मी” त्यानंतर तिथे राहिला नाही.” युजी पुढे सांगतात:
त्यानंतर विचार टिकून राहून त्याची जुळणी होऊन तो उभा राहू शकत नव्हता. विचाराची जुळवाजुळव खंडीत होते, आणि एकदा ती तशी खंडीत झाली की खेळ, खलास! या एकाच वेळी विचाराचा स्फोट होतो असे नव्हे, तर त्यानंतर ज्या-ज्या वेळी विचार उमटतो, त्याचा स्फोट होऊन तो नाहीसा होतो. त्यामुळे हे सातत्य संपून जाते आणि विचार त्याच्या नैसर्गिक तालात पडतो.
तेव्हापासून, या घटनेपासून मला कसलेही प्रश्न पडत नाहीत, कारण प्रश्न तिथे राहूच शकत नाहीत. मला पडणारे सर्वसाधारण प्रश्न उदाहरणार्थ “हैदराबादला कसे जायला लागेल?” असल्या प्रकारचे साधेसुधे प्रश्न असतात जे जगात चालण्याबोलण्यासाठी, साध्यासुध्या कामासाठी आवश्यक असतात. आणि असल्या प्रश्नांना लोकांकडे उत्तरे असतात. पण त्या तसल्या प्रश्नांना (“आध्यात्मिक” किंवा “आधिभौतिक” ) कुणाकडेच, कुठलीही उत्तरे नसतात. त्यामुळे आता प्रश्न शिल्लक राहिले नाहीत.
डोक्यात असणारी प्रत्येक गोष्ट भयानकपणे ताणली गेली होती – दुसर्‍या कुठल्याच गोष्टीला तसूभरही वाव राहिला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच मला सर्वकाही “खचाखच” भरून घट्ट झालेल्या माझ्या डोक्याची जाणीव झाली होती. या वासना (पूर्व संस्कार) किंवा तुम्हाला जे संबोधन योग्य वाटते ते घ्या, त्या काहीवेळा डोके वर काढू पाहातात, पण मेंदूतील पेशी एवढ्या “घट्ट” होतात की वासनांमध्ये गुंतण्याची संधीच मिळत नाही. दुभागणी (पूर्व संस्कार आणि विचारांच्या रूपातून झालेली) तिथे राहू शकत नाही. ते शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणत असतो की, हा “स्फोट” घडून येतो तेव्हा (मी हा शब्द वापरतो कारण ते अणुस्फोटासारखे असते), त्यातून प्रतिक्रियांची साखळी मागे सुटते. शरीरातील प्रत्येक पेशी, हाडाच्या कोषांची प्रत्येक पेशीला या “बदलातून” जावे लागते – मला ते शब्द वापरायचे नाहीत – पण हा एक कधीही न पुसला जाणारा बदल आहे, कसलीतरी अल्केमी आहे.
ते आण्विक स्फोटासारखेच असते. त्यातून संपूर्ण शरीर विखरून जाते. ती साधी गोष्ट नाही; तो माणसाचा शेवट असतो. त्या क्षणांतून जाताना मला भयंकर शारीरिक यातना झाल्या आहेत. तुम्ही तो स्फोट अनुभवू शकता असे नव्हे, तर फक्त त्याचे नंतरचे परिणाम भयानकपणे जाणवतात. या “कायापालटातून” शरीराचे पूर्ण रसायनशास्त्रच बदलते.
त्या (स्फोटा) नंतरचा परिणाम म्हणजे, आता इंद्रिये कोणत्याही समन्वयकाशिवाय किंवा केंद्राशिवाय संचालित होत आहेत – एवढेच मी सांगू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे: शरीराचे रसायनशास्त्र बदललेय – मी सांगू शकतो की रसायनशास्त्रात या बदल घडल्याशिवाय, विचारापासून, विचाराच्या सातत्यापासून ही घडण मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे, त्यावेळपासून विचाराचे सातत्य नसल्याने, काहीतरी घडलेय असे तुम्ही सहज सांगू शकता, पण खरंच, तंतोतंत काय घडलेय, ते अनुभवण्याचा मला कोणताच वाव नाही.


ही गोष्ट मला अपेक्षित होते, मी कल्पना रंगवल्या होत्या, मला बदलायचे होते त्या क्षेत्राबाहेर घडाली आहे. त्यामुळे मी याला “बदल” म्हणत नाही. माझ्यासोबत काय घडलय ते मला खरंच माहीत नाही. मी आता जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त माझे कार्य कसे चालतेय त्याबद्दलचे बोलणे आहे. तुम्ही ज्या पध्दतीने कार्य करताय आणि मी ज्या पध्दतीने करतोय त्यात काहीसा फरक वाटू शकतो, पण मूलत: त्यात कसलाही फरक असू शकत नाही. तुमच्यात आणि माझ्यात कसला फरक असू शकतो? कसलाही नाही. पण आपण ज्या पध्दतीने स्वत:ला व्यक्त करतोय, त्यात काहीसा फरक दिसतो. काहीतरी फरक आहे असे मला जाणवतेय आणि तो काय आहे ते मी समजून घेतोय.
या “स्फोटा”दरम्यानच्या आठवड्यात युजींना त्यांच्या इंद्रियांच्या कार्यात काही मूलभूत बदल आढळून आले. शेवटच्या, सातव्या दिवशी त्यांचे शरीर “शारीरिक मृत्यूच्या” प्रक्रियेतून बाहेर पडले आणि त्यानंतरचे बदल ही कायम टिकून राहाणारी वैशिष्ट्ये बनली.
शेवटी: बदलांना सुरूवात झाली. सात दिवसांपर्यंत, प्रत्येक दिवशी बदल घडत गेला. युजींना आढळले की त्यांची त्वचा अत्यंत मुलायम झालीय, डोळ्यांची उघडझाप थांबलीय आणि स्वाद, गंध आणि ऐकण्याच्या संवेदनांत बदल घडलाय.
पहिल्या दिवशी त्यांना आढळून आले, त्वचा की मलमली वस्रासारखी मऊ झालीय आणि त्यावर विचित्र चमक, सोनेरी चमक आलीय. “मी दाढी करत होतो, आणि प्रत्येक वेळी रेझर फिरवताना, ते घसरू लागले. मी ब्लेडस बदलल्या, पण काही उपयोग झाला नाही. मी माझ्या चेहेर्‍याला स्पर्श केला. माझी स्पर्शाची संवेदना वेगळी होती.” युजींनी या गोष्टीला कोणतेही अवास्तव महत्व चिकटवेले नाही. त्यांनी फक्त ही निरिक्षणे केली आहेत.
दुसर्‍या दिवशी त्यांना सर्वप्रथमच आढळून आले की त्यांचे मन, ते नेहमी जो शब्द वापरतात त्याप्रमाणे “पकडमुक्त स्थितीत” आहे. युजी वर असलेल्या किचनमध्ये होते आणि आणि व्हॅलेण्टाईनने काहीतरी टोमॅटो सूप बनवले होते. त्यांनी ते पाहिले आणि ते काय आहे ते त्यांना कळेना. ते सूप आहे असे व्हॅलेण्टाईनेने सांगितले. त्यांनी त्याची चव घेतली आणि मग ते समजले, “टोमॅटो सूपची चव अशी असते तर!.” त्यांनी सूप चाखले आणि परत ते मनाच्या त्या विचित्र चौकटीत शिरले, नव्हे तर ती “मनोमुक्त” स्थिती होती. त्यांनी व्हॅलेण्टाईनला पुन्हा विचारले “हे काय आहे?” पुन्हा व्हॅलेण्टाईन म्हणाली ते सूप आहे. पुन्हा युजींनी चव घेतली, ते गिळले आणि पुन्हा एकदा ते काय होते ते विसरून गेले. माझी काहीकाळ अशी मजा झाली. मजेशीरच होते ते सगळे – ती “पकडमुक्त स्थिती.”
आता युजींसाठी ती स्थिती सामान्य झाली होती. ते म्हणतात आता ते बिलकुल कल्पनारंजन, काळजी, संकल्पना मांडणे किंवा इतर लोक एकटे असताना करतात तसे कोणतेही विचार करीत नाहीत. फक्त गरज असेल तेव्हाच त्यांचे मन उभे राहाते, उदाहरणार्थ, कुणीतरी प्रश्न विचारला किंवा त्यांना टेपरेकॉर्डर दुरुस्त करायचा असेल तेव्हा. अशी गरज संपते तेव्हा, तिथे मन राहात नाही, विचारही राहात नाही. फक्त जीवन राहाते.


तिसर्‍या दिवशी, युजींच्या काही मित्रांना त्यांनी जेवणासाठी बोलावले होते. स्वत: स्वयंपाक करायला ते कबूल झालेले होते. पण त्यांना नेहेमीसारखा गंधही घेता येईना आणि चवही घेता येईना. “या दोन संवेदना रूपांतरीत झाल्या आहेत याबद्दल मला जाणीव झाली. प्रत्येकवेळी माझ्या नाकपुड्यांत कोणताही गंध शिरला तेव्हा  त्यामुळे गंध घेण्याच्या केंद्राला त्रास होऊ लागला – मग तो गंध महागड्या अत्तराचा असो की गायीच्या शेणाचा असो. आणि त्यानंतर मी कधीही कशाची चव घेतली तेव्हा, मला फक्त त्यात जास्त प्रमाणात असलेला घटकच जाणवत असे – इतर घटकांची चव थोडीशी उशीरा जाणवू लागली. त्या क्षणापासून पुढे मला कसल्याही परफ्युमचे काही वाटेना आणि चमचमीत जेवणाबद्दलही काही वाटेना. मला त्यात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाचीच चव जाणवू लागली – तिखट किंवा जे काही टाकले असेल ते.”
चौथ्या दिवशी, त्यांच्या डोळ्यांबाबत काहीतरी झाले. युजी आणि त्यांचे मित्र गेस्टाड मधील रियाल्टो रेस्टॉरंटमध्ये बसले होते. याच ठिकाणी त्यांना बर्हिवक्र भिंगासारख्या प्रचंड “दृष्टी केंद्रणाची” जाणीव झाली. “माझ्या दिशेने येत असलेल्या गोष्टी, माझ्या आत शिरत असल्यासारखे दिसत होते. आणि माझ्या जवळून दूर जाणार्‍या गोष्टी माझ्या आतून बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. मी एवढा कोड्यात सापडलो होतो – माझे डोळे महाप्रचंड कॅमेर्‍याप्रमाणे झाल्यासारखे वाटत होते, आणि मी काही न करता ते त्यांचा अवधान बिंदू बदलत होते. आता मला या विचित्रपणाची सवय झालीय. आजकाल मी असाच पाहात असतो. तुम्ही मला तुमच्या कारमध्ये बसवून घेऊन जाता, तेव्हा माझी कॅमेरा सरसावून हिंडत असलेल्या कॅमेरामन सारखी स्थिती असते. समोरून येणार्‍या कार माझ्या आत शिरत असतात, आणि आपल्याला मागे टाकून पुढे जाणार्‍या कार माझ्यातून बाहेर पडत असतात. माझे डोळे कशावर तरी रोखले जातात, तेव्हा पूर्ण अवधानासह ते तिथे चिकटतात, कॅमेर्‍यासारखे.”
रेस्टॉरंटमधून युजी परत आल्यानंतर त्यादिवशी आरशात पाहात असताना त्यांच्या डोळ्याबाबत त्यांना आढळले की ते “स्थिर” झाले आहेत. ते खूपवेळ आरशासमोर थांबून राहिले आणि निरिक्षण केले तर त्यांच्या पापण्यांची उघडझापच होत नव्हती. जवळपास पंचेचाळीस मिनिटे ते आरशात पाहात राहिले – पण एकदाही पापण्यांची उघडझाप दिसली नाही! “उपजतपणे होणारी माझी पापण्यांची उघडझाप कायमची संपली होती. ”
पाचव्या दिवशी युजींना त्यांच्या श्रवणेंद्रियात झालेला बदल जाणवला. कुत्रा भुंकत असताना त्यांना ऐकू आले तेव्हा, कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.
पाच दिवसांत पाच इंद्रिये बदलली. सहाव्या दिवशी युजी सोफ्यावर निवांत पडून होते. व्हॅलेण्टाईन किचनमध्ये होती.
“आणि अचानक माझे शरीर अदृश्य झाले. माझ्यासाठी, तिथे शरीर नव्हते. मी माझा हात पाहिला.. “हा हात माझा आहे?” असा प्रश्न नव्हता, पण ती पूर्ण स्थितीच काहीशी तशी होती. स्पर्श वगळता, संपर्काचा बिंदू सोडता इतर काही तिथे आहे असे मला जाणवेना. मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि तिला विचारले “तुला माझे शरीर सोफ्यावर दिसतेय का? ” माझ्या आतून मला काहीच जाणवत नाही की हे शरीर माझे आहे म्हणून. तिने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि म्हणाली, “हे तुझे शरीर आहे.” आणि तिच्याकडून खात्री करून घेतली तरीही मला बरे वाटेना, माझे समाधान झाले नाही. मी स्वत:ला म्हणालो, “काय गंमत चाललीय ही? माझे शरीर हरवलेय. माझे शरीर सोडून गेले होते, आणि ते कधीही परत आलेले नाही.”
आता त्यांच्या शरीराच्या बाबतीत, युजींकडे फक्त स्पर्श होणारे बिंदूच तेवढे शिल्लक आहेत, कारण, ते म्हणतात दृष्टीची संवेदना ही स्पर्शाच्या संवेदनेपासून विभक्त आहे. त्यांच्या स्वत:च्या शरीराची संपूर्ण प्रतिमा तयार करणे त्यांना शक्य नाही, कारण स्पर्शाच्या संवेदनेच्या अनुपस्थितीत, त्यांच्या अवधानात संबंधीत बिंदू हरवलेले असतात.
आणि सर्वात शेवटी सातव्या दिवशी, युजी त्याच सोफ्यावर पडून होते, आराम करीत होते, “पकडमुक्त स्थिती”ची मजा घेत होते. व्हॅलेण्टाईन आत यायची, तेव्हा ती व्हॅलेण्टाईन आहे हे ते ओळखायचे. ती खोलीबाहेर जायची. त्यानंतर, फिनीश, कोरेपणा – कसलीही व्हॅलेण्टाईन कुठेच नाही. “हे काय आहे नेमके?” व्हॅलेण्टाईन कशी दिसते ती कल्पनाही मी करू शकत नाहीय”, त्यांना वाटायचे. ते किचनमधून येणारे आवाज ऐकत आणि स्वत:ला विचारत, “माझ्या आतून हे कसले आवाज येत आहेत?” पण मला त्या आवाजांशी संबंध काही जोडता येत नसे.” त्यांना आढळून आले की त्यांची सर्व इंद्रिये त्यांच्या आतल्या समन्वय साधणार्‍या यंत्रणेशिवाय काम करीत आहेत: समन्वयक हरवला होता. आणि तेव्हाच... 
माझ्या शरीरात काहीतरी घडत असल्याचे जाणवले: शरीराच्या विविध भागांतून जीवन ऊर्जा एका दृश्य केंद्राकडे जात होती. मी स्वत:ला म्हणालो, “आता तुझे आयुष्य संपले. तु मरणार आहेस.” तेव्हा मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि म्हणालो, “मी मरतोय व्हॅलेण्टाईन आणि तुला या शरीराचे नंतर काहीतरी करावे लागणार आहे. हे डॉक्टरांना देऊन टाक, कदाचित त्यांना त्याचा वापर होईल. माझा दहन किंवा दफन क्रियेवर विश्वास नाही. तुला हवी तशी या शरीराची विल्हेवाट लावावी लागेलच. एकदिवस यातून दुर्गंध येऊ लागेल. त्यामुळे, ते देऊन टाक कुणाला तरी, व्हॅलेण्टाईन म्हणाली, “युजी, तुम्ही एक परदेशी माणूस आहात. स्वीस सरकार तुमचे शरीर स्वीकारणार नाही. विसरा त्याबद्दल.”   

त्यांचे जीवन बल भयानकपणे एका दृश्य बिंदूवर येऊन पोचले होते. व्हॅलेण्टाईनचे बेड रिकामेच होते. ते त्या बेडवर जाऊन पडले, मरायला तयार होऊन. ते जे बोलत होते त्याकडे व्हॅलेण्टाईनने, निश्चितच दुर्लक्ष केले होते. पण तिथून जाण्यापूर्वी ती म्हणाली होती, “एक दिवस तुम्ही म्हणता ही गोष्ट बदललीय,  दुसर्‍या दिवशी म्हणता आणखी दुसरंच काही बदललंय, तर तिसर्‍या दिवशी आणखी तिसरंच काहीतरी बदलतं. काय चालु आहे नेमकं? आता तर तुम्ही म्हणताय तुम्ही मरणार आहात. तुम्ही काही मरणार वगैरे नाही. तुम्ही ठिकठाक आहात, एकदम ठणठणीत” असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. युजी त्यांची आपबिती पुढे सांगतात:
नंतर एक असा बिंदू आला जसे एखाद्या कॅमेर्‍याच्या अपार्चरचा पडदा स्वत:ला बंद करून घेत असावा. ही एकच उपमा मला सुचते. मी आता जे वर्णन करीत आहे ते आणि वास्तविक जसे घडले त्यात फरक आहे कारण त्यावेळी याप्रकारे विचार करायला तिथे कुणीच नव्हते. हा सर्व माझ्या अनुभवाचा भाग असला पाहिजे, नाहीतर मला त्याबद्दल बोलता आले नसते. तर, अपार्चर स्वत:ला बंद करून घेत होते, आणि आणखी काहीतरी होते जे तो पडदा उघडा ठेऊ पाहात होते. त्यानंतर थोड्यावेळाने काहीही करण्याची इच्छा राहिली नाही, ते अपार्चर बंद होणे रोखावेही वाटत नव्हते. अचानक, जसे झाले त्याप्रमाणे, ते बंद झाले. त्यानंतर काय झाले ते मला माहित नाही.
ही प्रक्रिया – ही मरण्याची प्रक्रिया एकोणपन्नास मिनीटे चालू राहिली. तो शारीरिक मृत्यू होता. युजी म्हणतात की अजूनही त्यांना तसे होते:
माझे हात आणि पाय थंड पडतात, शरीर ताठते, हृदयाचे ठोके मंदावतात, श्वास मंद होतो आणि श्वास घ्यायची मारामार होते. एका बिंदूपर्यंत तुम्ही तिथे असता, तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेता आणि मग, फिनीश. त्यानंतर काय घडते ते कुणालाही माहीत नाही.
युजी त्या प्रक्रियेतून बाहेर आले तेव्हा व्हॅलेण्टाईनने त्यांच्यासाठी कुणाचा तरी कॉल आला असल्याचे सांगितले. गोंधळलेल्या स्थितीत ते फोन घेण्यासाठी खाली गेले. काय झाले होते त्यांना माहीत नव्हते. ते शारीरिक मृत्यूमधून बाहेर पडले होते. ते कशामुळे परत जगात आले, त्यांना माहित नाही. कितीकाळ तो मृत्यू टिकून राहिला, त्यांना माहित नाही. “मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण अनुभव घेणाराच समाप्त झाला होता: त्या मृत्यूचा अनुभव घेणाराच तिथे बिलकुल नव्हता...”
इथे, या “कॅलॅमिटी”चा एकमेव साक्षीदार डग्लस रोजस्टोन काय म्हणतो ते पाहाणे अगदी सुयोग्य होईल:
चोवीस उन्हाळे उलटले आहेत आता या गोष्टीला, जेव्हा सर्व रूपांतरणांत अत्यंत दुर्मिळ असणार्‍या, हे एकच खरे रूपांतरण आहे असे वाद ज्याबद्दल आहेत त्या रूपांतरणाचा – एका सामान्या माणसाच्या मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा मला साक्षीदार होता आले.  हा माणूस “देव माणूस”, “निवड झालेला” किंवा जगदगुरू असण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणूस होता. जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी १९६६ च्या उन्हाळ्यात मी सानेनला गेलो होतो तेव्हा या सगळ्याची सुरूवात झाली. त्या दिवशी मी गेस्टाड येथील माझ्या अपार्टमेंटमध्ये होतो. सायंकाळची वेळ होती. चंद्र नुकताच क्षितीजावर आला होता. कशामुळे तरी मला युजींना, त्यांच्या चॅलेटमध्ये कॉल करावा वाटला. मी केला. घराच्या मालकिणीने फोन घेतला. तिने मारलेली “युजीऽऽऽ तुमच्यासाठी फोना आहेऽऽऽ” अशी हाक मला फोनमधून ऐकू आली. तिच्या आवाजावरून व्हॅलेण्टाईनचे काहीतरी बिनसले आहे असे वाटत होते. ती म्हणाली, “युजींना काहीतरी होतंय, त्यांचं शरीर हलू शकत नाहीय. कदाचित ते मरत असतील.” मी म्हणालो, “जा आणि युजीला बोलवा, मी त्यांना बोलतो.” व्हॅलेण्टाईन म्हणाली, “ते येतील असे मला वाटत नाही.” पण मी अडूनच बसलो. आणि तेव्हा युजी फोनवर आले. त्यांचा आवाज फार दूरून येत आहे असे वाटत होते, “डग्लस, तुच इकडे ये आणि काय होतंय ते पाहा,” एका मेलेल्या माणसाला पाहायला येण्याचे ते आमंत्रण होते. मी पळालो. त्यावेळी रेल्वे चालू नव्हत्या. गेस्टाड आणि सानेनमधील अंतर तीन किलोमीटर आहे. मी चॅलेटमध्ये शिरलो आणि युजींच्या खोलीकडे गेलो. मला ते दृश्य अजूनही चांगलेच आठवते:व्हॅलेण्टाईन भीतीने पांढरीफटक पडली होती, आणि युजी कोचावर होते, शुध्दीवर नव्हते. त्यांचे शरीर धनुष्याकृती सारखे वाकले होते. नुकताच डोंगरावरून चंद्र वर आला होता. मी युजींना उठवू लागलो आणि खिडकीकडे घेऊन गेलो. त्यांनी चंद्राकडे ज्या पध्दतीने पाहिले ते माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्या खोलीत काहीतरी विचित्र प्रकार चालला होता. मी त्यांना विचारले, “काय होतंय?” ते म्हणाले, “हा शेवटचा मृत्यू आहे.”
महेश भट आणि मित्रांसमोर डग्लसने हे कथन केले आहे. युजींच्या मित्रांपैकीच एक, डग्लसचे आतापर्यंतचे ऐकणारे श्री. मूर्ती डग्लसला मध्येच थांबवत विचारतात, “म्हणजे ते मरणार आहेत असं ते सांगत होते असे तुला म्हणायचे आहे का?” डग्लस, “नाही, ते आधीच घडून गेले होते. युजी म्हणाले माझा फोन आल्याने ते परत येऊ शकले.” मूर्ती विचारतात, “तुझा काय प्रतिसाद होता डग्लस?” “मला खूप आनंद झाला होता; त्यांच्यामुळे मला खूपच आनंद झाला.”
त्यांच्यात काही उल्लेखनीय बदल दिसत होते काय?
“त्यांचे व्यक्तिमत्व बदलले नव्हते. ते नेहमीसारखेच हाताळायला विचित्र असणारा माणूस दिसत होते. पण त्यांच्यावर कसलाच तणाव जाणवत नव्हता. ”














(उद्याच्या भागात कॅलॅमिटी नंतर युजींचे लोकांशी झालेले बोलणे )

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २




युजींच्या संबंधाने लेखमाला पुढे न्यायची असल्याने इथं युजींची पार्श्वभूमी मांडावी लागत आहे; पुन्हापुन्हा तेच सांगतोय. मलाही ते थोडंसं कंटाळवाणं होतंय. पण हा माणूस कोणत्या पार्श्वभूमीतून आलाय याचा त्रोटक का होईना पण माग काढल्याशिवाय पुढे येणारी “युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही. म्हणून हा चरित्र-चिंतनटाईप पसारा वाढवावा लागत आहे. पण असोच.

व्याख्यानांना भरपूर प्रतिसाद मिळत असताना, चांगली कमाई होत असताना अचानक युजींची व्याख्याने देऊन पैसे कमावण्यातील रूचि निघून गेली आणि घरचा खर्च चालवण्याची जबाबदारी कुसूमकुमारी या त्यांच्या पत्नीवर पडली. कुसूमकुमारी या इंग्रजी आणि संस्कृतातील पदवीधर होत्या आणि वर्ल्ड बुक एनसायक्लोपेडिया च्या कार्यात त्यांना संशोधन सहायक म्हणून काम मिळाले. हे होत असताना श्री. व सौ. युजी या दाम्पत्याला त्यांच्या चौथ्या अपत्याचे वेध लागले होते; म्हणून कुसूमकुमारींना त्या अवस्थेत नोकरी नकोशी वाटत होती. पण पर्याय नव्हता. त्यांची कर्मठ भारतीय पार्श्वभूमी असली आणि इंग्लिशमधील पदवी असली तरी अमेरिकन जीवनशैलीबद्दलचे कुसूमकुमारींचे सुरूवातीचे कुतूहल मावळले आणि नंतर त्यांना अमेरिकन जीवनशैलीशी जुळवून घ्यायला अवघड जाऊ लागले. विचीत्र, दडपण आणणारे अमेरिकन जीवन त्यांना दुरचे वाटू लागले. पण त्या गाडे पुढे रेटू लागल्या आणि ऑफिसचे काम कधी-कधी घरीसुध्दा आणावे लागत असे. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक संकल्पनांवर टिपणे काढून प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक होते. पारंपारिक पध्दतीने युजींना  एक “जबाबदार नवरा” म्हणता येणार नसले तरी ते कुसूमकुमारींना आवश्यक असणारी पुस्तके वाचून आणि त्यांच्या शंकाची उत्तरे शोधून त्यांच्या कामात मदत करू लागले.
वसंत या अपंग मुलाची काळजी घेत युजी आता घर सांभाळू लागले. तिथले भारतीय मित्र युजींच्या घरी डोकावण्यास येत आणि भारतीय तत्वज्ञान आणि थिऑसॉफीवर तासन तास चर्चा चालत. अर्थात या चर्चा युजींना काही विशेष मिळाले होते म्हणून नसत तर आपण जशा साध्यासुध्या चर्चा करतो तशाच त्या असत. चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर कुसूमकुमारींनी पुन्हा एकदा काम सुरू केले तेव्हा घरी “बेबीसिटींग” करण्याचे काम युजी करू लागले. सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर कुसूमकुमारींनी अत्यंत निराश होऊन काम सोडले आणि अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात त्यांच्या बहिणीकडे मागे सोडून आलेल्या त्यांच्या दोन मुलींचा विचार त्यांना सतत अस्वस्थ करू लागला आणि आता त्यांचे चौथे अपत्य अमेरिकेसारख्या परक्या देशात, वडिलधारे, नातेवाईक आणि कुटूंबियांच्या देखरेखीशिवाय मोठे होणार असल्याने आणि वसंतच्याही परिस्थितीत फार मोठी सुधारणा दिसत नसल्याने या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल त्यांना चिंता सतावू लागली. यात अजूनही बिकट परिस्थिती म्हणजे युजी आता सतरा वर्षांपूर्वी लग्न होताना असलेले युजी राहिले नव्हते. त्यांच्यात बदल होत राहिला आणि हा बदल जमीन आसमानचा होत जाऊन आता युजी घरातही अनोळखी माणसासारखे राहू लागले. सन १९५९ च्या शेवटास ती अपरिहार्य गोष्ट घडलीच आणि कुसूमकुमारींनी काहीही झाले, युजी अमेरिकेत राहाणार असले तरी भारतात परतण्याचा निर्णय पक्का केला. युजींना भारतात परतण्यासाठी केलेल्या विनवण्यांचा युजींवर काही परिणाम झाला नाही. युजींनी कुसूमकुमारींसाठी भारताची तिकीटे आणली आणि जवळ होते नव्हते तेवढे पैसे कुसूमकुमारींना देऊन टाकले. कुसूमकुमारी त्यांच्या दोन अपत्यांसह मद्रासच्या दिशेने निघाल्या आणि भारतात आल्यानंतर प्रवासात पुल्ला या रेल्वेस्टेशनच्या जवळ कुठेतरी त्यांची बॅग गहाळ झाली. या बॅगेत महत्वाच्या व्यक्तींनी युजींना लिहीलेली पत्रे, महत्वाची कागदपत्रे होती. हे अगदी युजींचा भूतकाळ ठरवून पुसला जात असल्यासारखे झाले आणि त्यांचे भारतात परतणे जवळजवळ अशक्य बनले.
आता पत्नी भारतात परत गेली असताना आणि युजींना त्या देशात पुढे राहायचे असल्याने त्यांना पुन्हा एकदा आश्रयाची गरज पडली. वर्ल्ड युनिव्हर्सिटीने त्यांना नोकरीची संधी दिल्यानंतर तो प्रश्न निकालात निघाला. युजींची ओळख एक प्रज्ञावान व्याख्याता एवढीच नव्हती तर त्यांना सखोल दृष्टी असलेला वक्ता म्हणूनही त्यांनी अमेरिकेत नाव कमावले होते. युनिव्हर्सिटीला युजींच्या हुशारीची उपयोगीता वाटू लागली कारण युनिव्हर्सिटीकडे जगाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांकरिता निवासी महाविद्यालये काढायची योजना होती. युजींकडे ही योजना स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता; त्यांनी तशी ती स्वीकारली आणि युजींना त्या कामासाठी सर्वप्रथम भारतात पाठविण्यात आले. युजी त्यांचा व्याख्यानाचा “शो” आटोपण्यासाठी मद्रासला आले असताना कुसूमकुमारी त्यांना भेटल्या आणि पुन्हा एकदा कुटूंबात येण्याबद्दल विनवणी केली. ही युजींची त्यांच्या पत्नीसोबतची शेवटची भेट ठरणार होती. किमान मुलांकडे पाहून तरी युजींचे मन पालटेल असा विचार करून कुसूमकुमारींनी सगळ्या मुलांना सोबत आणले होते – पण युजी पत्थराहूनही कठोर होते. आता परतणे नव्हते. त्यांनी स्वत:च्या भूतकाळाशी कायमची फारकत घेतली होती. एका महिन्यानंतर युजी रशियात गेले आणि तिथून पुढे पूर्वी कधीही भेट न दिलेल्या युरोपातील मध्यवर्ती देशांत. असे दिसते या काळात की युजी त्यांना मिळालेल्या कामाबाबत त्रासून गेले होते, त्यांनी युरोपातील अनेक शहरांना भेटी दिल्या “कामाच्या निमित्ताने” नव्हे तर एक पर्यटक म्हणून, जगाच्या नकाशावरील प्रत्येक स्थळावर पावले टाकायची म्हणून. युजींबाबत खरे पाहाता, कोणतीही विशिष्ट योजना नसल्याने पान वार्‍यावर उडत जावे, भरकटू लागावे तसे झाले होते. शेवटी एकदाचे लंडनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते पूर्णत: खलास झाले!
लंडनमध्ये ते डोके सरकलेल्या माणसासारखे रस्त्यांवरून निरर्थक फिरू लागले. लंडनमधील या कालखंडाला काही लोक त्यांच्या “आत्म्याची काळोखी रात्र” मानतात. युजींनी त्यांना “तो काही एखाद्या नायकाचा संघर्ष नव्हता की आत्म्यासोबत माझी कुस्तीही जुंपलेली नव्हती, त्यात काव्यात्म प्रसंगही नाही – ते फक्त मन मानेल तसे भटकणे होते” अशा शब्दांत फटकारले आहे.
इंग्लंडमध्ये हिवाळा सुरू होऊ लागला तशी त्यांची ही मनमानी थंड व्हायला सुरूवात झाली. त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पैशांतून नाईट ब्रिज रोडवरील केडागीन स्क्वेअर अपार्टमेंटस मध्ये त्यांनी जागा शोधली. दिवसभरादरम्यान अंग गोठविणारी थंडी टाळण्यासाठी आणि खोलीच्या चार भिंतीकडे पाहात राहून येणारा कंटाळा घालविण्यासाठी ते ब्रिटीश म्युझियममध्ये शिरत असत आणि कार्ल मार्क्सने ज्या टेबलाशी बसून दास कॅपिटल लिहीले त्या टेबलासमोरच्या टेबलाशी बसून राहात. खरे पाहाता युजींना कोणतेही संशोधन करण्यात किंवा पुस्तक वाचण्यात काहीच रस नव्हता. त्यांनी तत्वज्ञान आणि धर्म यावरील वाचन सोडून देऊन आता खूप वर्षे उलटली होती. पण तरीही काहीतरी वाचण्यासाठी तिथे आलो आहोत असे नाटक वठविण्यासाठी काहीतरी वाचायचे म्हणून ते “अंडरग्राऊंड स्लॅंग (शिवराळ बोली)” हा शब्दकोश घेऊन बसत आणि त्यात तासन तास डोके खूपसून बसत. लंडनच्या रस्त्यांवरील साईनबोर्डसवरील जाहीराती आणि भिंती, टेलीफोन बूथ आणि झाडांच्या खोडांवर लिहीलेले कॉलगर्ल्सचे नंबर आणि नावे वाचत युजी सायंकाळ घालवीत.
हा दिनक्रम चालू असतानाच उन्हे उतरू लागली, हवा तापली आणि दिवसा झक्क सूर्यप्रकाश पडू लागला – उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा सुरू होताच मरगळलेल्या लंडनमध्ये अचानक प्राण फुंकला गेला. पण युजींमध्ये कोणताही बदल झाला नव्हता, त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. बिघडत जाणार्‍या परिस्थितीत आणखी भर म्हणजे युजींचे खिसे रिकामे होऊ लागले. काही करून कशीतरी असलेली परिस्थिती पुढे रेटायची असेल तर पुन्हा एकदा काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा-तेव्हा ते स्थलांतरीत लोकांचे (यात बहुतांशी भारतीय आणि पाकीस्तानी होते) हात पाहून भविष्य सांगू लागले आणि काहीवेळा तर त्यांनी पैशासाठी पाकशास्त्रावरील धडेही दिले. निश्चितच त्यांना “बेरोजगारी भत्त्या” वर राहाता आले असते पण त्यांनी ते केले नाही. विचित्र परिस्थिती होती. “मी लोकांच्या दातृत्वावर राहाणार्‍या उपटसुंभासारखा का जगतोय?” हा प्रश्नही त्यांच्या मनाला शिवत नसे. ती निश्चितच डोके फिरल्याची स्थिती होती. पर्याय शोधण्याचीही इच्छा ते गमावून बसले होते असे दिसते. त्यांनी स्वत:ला हवेसोबत इथे, तिथे आणि कुठेही उडत जाणार्‍या पानासारखे सोडून दिले.
याच काळात भारतात त्यांच्या पत्नीचे निधन झाले; ही बातमी जवळपास सहा महिन्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचली. मुले आई गमावून बसली होती; पण त्या कधीही भरून न निघणार्‍या हानीबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे पत्र लिहीण्याशिवाय युजी काहीच करू शकले नाहीत. पाहूनही दिसत नसल्यासारखे होत, ऐकू येत असूनही ऐकले जात नसल्याच्या स्थितीत, जवळपास पागलपणाच्याच अवस्थेत युजी भटकत होते. काहीवेळा त्यांना थकवा जाणवत असे, काहीही खाण्याची इच्छा नसे. आणि एके दिवशी त्यांच्या लक्षात आले, खिशात फक्त पाच पेन्स शिल्लक राहीलेत! युजी आटोपले. ते आता कुठेही जाऊ शकणार नव्हते आणि काहीही करता येणार नव्हते. पण दैवयोगाने म्हणा किंवा कसेही लंडन मधील रामकृष्ण मिशनचे मुख्य असलेल्या स्वामी घनानंदांच्या रूपाने त्यांना मदत मिळाली. याच काळात युजींच्या शरीरावर बदल दिसून येऊ लागले. यापूर्वी ऋषिकेशच्या गुहेत असताना आलेले गूढ अनुभव आणि अड्यारमध्ये असताना “मृत्यूशी संमुख” होण्याचा अनुभव त्यांनी सरळसोटपणे उडवून लावला होता. पण आता ते सर्व अनुभव साठत येऊन गळ्यापर्यंत आले होते आणि युजींच्या अस्तित्वातच फेरफार व्हायला सुरूवात झाली होती. पारंपारिक हिंदू दृष्टीकोनातून पाहून याला कुंडलिनी जागरण म्हणता येईल. एके दिवशी रामकृष्ण मिशनच्या ध्यानगृहात बसले असताना त्यांना हा अनुभव आला. ही फक्त सुरूवात होती. त्यांच्याच शब्दांत –
मी काहीही न करता तिथे बसून होतो, ध्यानगृहात असलेल्या लोकांची मला दया येत होती. हे लोक ध्यान करायला बसले आहेत. कशाला जायचेय त्यांना समाधीत? त्यांना काहीही मिळू शकणार नाही – मी गेलोय या सर्व गोष्टींतून – ते स्वत:चीच थट्टा करीत आहेत, हसं करून घेत आहेत. असलाच मूर्खपणा आयुष्यभर करीत राहून आयुष्य मातीत घालविणे त्यांनी टाळावे यासाठी मी काय करू शकतो? हे करून ते कुठेही पोहोचणार नाहीत. मी तिथे बसलो होतो आणि माझ्या मनात काहीही नव्हते – फक्त रिक्तता होती – तेव्हा मला कसलीतरी अनोळखी जाणीव होऊ लागली: माझ्या शरीरात कसली तरी हालचाल होऊ लागली. माझ्या जननेंद्रियातून कसली तरी ऊर्जा डोक्याच्या दिशेने सरकत होती आणि डोक्यात छिद्र असल्यासारखे वाटत होते. ती ऊर्जा घड्याळाच्या काट्यांसारखी उलट आणि सुलट दिशेने वर्तुळाकार फिरत होती. ते विमानतळावर असलेल्या विल्स सिगारेटच्या जाहीरातीत दाखवल्यासारखे होते. माझ्यासाठी ती मजेची गोष्ट होती. पण मी त्या गोष्टीसोबत संबंध जोडू शकत नव्हतो. कुणीतरी मला खाऊ घालत होते, कुणीतरी माझी काळजी घेत होते, उद्याचा विचार नव्हता. तरिही, माझ्या आत खोलवर काहीतरी घडत होते...
निश्चितच “नवा माणूस” घडविल्या जात होता, जसे काही जन्मापासूनच यासाठी त्याची घडण आकाराला आली होती, किंवा कोणतेतरी गूढ बल त्याला मंदपणे पण खात्रीने त्या गोष्टीकडे घेऊन जात होते. पण त्या माणसाला ते जसे होईल, जशी त्याने कल्पना केली होती तसे ते घडणार नव्हते. आणि युजींच्या कथेचा हाच सर्वात विदारक, समजून घ्यायला अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे.
काहीही झाले तरी लंडनमधील त्यांचा मुक्काम संपला होता. त्यांनी रामकृष्ण आश्रम सोडला, पुढचा पल्ला गाठला आणि पॅरीसमध्ये येऊन पोचले. त्यांनी स्वत:चे भारतात परत यायचे तिकीट विकले आणि ३५० डॉलर हाताशी आणले. आणखी तीन महिन्यांसाठी ते निवांत झाले आणि पॅरीसमधील एका हॉटेलात त्यांनी मुक्काम ठोकला. पूर्वी लंडनमध्ये केले होते त्याप्रमाणेच त्यांनी पॅरीसचे रस्ते पालथे घालायला सुरूवात केली आणि विविध प्रकारच्या फ्रेंच चीज वर गुजराण सुरू केली, ही सवय ते जाईपर्यंत टिकून होती, पण आहार म्हणून नंतर चीजचे प्रमाण कमी झाले होते.
लंडनमध्ये झाले होते तसेच, पुन्हा एकदा त्यांचे पैसे संपत आले. पण पॅरीसमध्ये मात्र पाकशास्त्रावर धडे देऊन पैसे कमवायला स्थलांतरीत लोक नव्हते किंवा मदत मागायला जाता येईल असे मित्रदेखील नव्हते. पण तरीही खिसे उलटेपालटे करून जे काही पैसे मिळाले त्यात त्यांना जिनेव्हापर्यंत जाता आले. पुन्हा एकदा स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाप्रमाणे त्यांनी हॉटेलातच खोली घेतली आणि रस्ते पालथे घालायला सुरूवात केली. दोन आठवडे उलटले आणि हॉटेलचे बील भागवून जेवणासाठीदेखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. सगळ्या परिस्थितीचा कडेलोट झाला आणि भारतीय दूतावासात जाऊन तिथल्या अधिकार्‍याकडे भारतात पाठविण्याची विनंती करण्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग शिल्लक राहिला नाही. 
सुदैवाने अजूनही त्यांच्याकडे स्वत:चे स्क्रॅपबुक होते. त्या स्क्रॅपबुकमुळे ते दूतावासातून बाहेर फेकले गेले नाहीत. नॉर्मन कझिन्स, त्याकाळी भारताचे रशियातील राजदूत असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी युजींबद्दल उधळलेली स्तुतीसुमने त्या स्क्रॅपबुकमध्ये वाचून निश्चितच व्हॉईस-कॉन्सुलवर छाप पडली. पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण सरकारी खर्चाने युजींना भारतात पाठवता येणार नव्हते. केवळ एक पर्याय होता, तो म्हणजे युजींनी भारतातील त्यांच्या नातेवाईकांना लिहीणे आणि पैसे मागवणे - तो व्हॉईस कॉन्सुलने युजींना सुचवला.  हे चालु होते तेव्हा नेमके जिनेव्हातील रामकृष्ण मिशनचे मुख्य स्वामी नित्यबोधानंद व्हॉईस कॉन्सुलच्या चेंबरमध्ये बसलेले होते. त्यांनी लगेच तिथल्या तिथे युजींच्या हातात त्यांची बीले भागवण्यासाठी ४०० डॉलर ठेवले आणि युजींना सामान्य व्यक्तींसारखे वागवू नये, होता होईल तोवर सढळपणे मदत करावी अशी कॉन्सुलला विनंती केली. युजींच्या सुटकेसाठी पुन्हा एकदा रामकृष्ण मिशनची अदृश्य शक्ती उभी राहिली होती असे म्हणावे वाटते.

कॉन्सुलेटच्या कर्मचार्‍यांमध्ये एक वेगळी म्हणता येईल अशी महिला होती – व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान. या बाई त्यावेळी त्रेसष्ट वर्षांच्या होत्या आणि युजी त्यांच्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान होते. युजींविषयी त्यांच्या अंत:करणात खोलवर काहीतरी स्पर्शून गेले. थोडावेळाने त्यांचे युजींशी बोलणे होत गेले तसे या अनोळखी भारतीय माणसाला मदत करण्याची त्यांची इच्छा बळावली; मी राहाण्यासाठी तुमची स्वित्झर्लण्डमध्ये व्यवस्था करू शकते – तिथे रहा, खरोखर भारतात जायचे नसेल तर जाऊच नका असे त्या युजींना म्हणाल्या. युजींकरीता हे आणखी एक जीवनदान होते आणि दुसरा कोणताही विचार न करता त्यांनी बाईंचा प्रस्ताव स्वीकारला. खरे पाहाता, युजींकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि वारा नेईल तिकडे जायचे असे तर होतच होते.
काही महिन्यांनंतर व्हॅलेण्टाईनने नोकरीचा राजीनामा दिला आणि युगानुयुगांपासून ताटातूट झालेल्या, पण नव्या युगाच्या उंबरठ्यावर पुन्हा भेट झालेल्या मित्रांसारखे ते दोघे राहू लागले. व्हॅलेण्टाईनला मिळालेली पेन्शनची रक्कम फार मोठी नव्हती पण त्यात घरखर्च आणि प्रवास होऊ शकत होता. युजींच्या सल्ल्यानुसार व्हॅलेण्टाईनने त्यांचे सगळे दागिने आणि वर्षानुवर्षांपासून गोळा केलेल्या वस्तू विकून टाकल्या आणि ते पैसे बॅंकेत ठेवले. नंतर, व्हॅलेण्टाईनने युजींच्या प्रवासासाठी एक वेगळा फंड देखील तयार केला.
व्हॅलेण्टाईन युजींची काळजी घेत होत्या पण पुढे काय वाढून ठेवले आहे त्यांना माहित नव्हते. पुढची चार वर्षे तुलनेने निवांत गेली. भरपूर मोकळा वेळ आणि करायला कोणतेही महत्वाचे काम नसल्याने व्हॅलेण्टाईन आणि युजी प्रवासासाठी जेनेव्हाबाहेर पडले. युजींच्या बाबतीत त्यांचा “शोध” जवळपास समाप्त झाला होता. युजी झोप काढत, खात आणि टाईम मॅगझीन वाचत – तुरळक प्रवास करीत आणि व्हॅलेण्टाईन सोबत किंवा एकटेच लांबवर चालायला जात. या काळाची तुलना अंड्यातून पिल्लू बाहेर पडते त्यापूर्वीच्या काळाशी करता येईल. नाट्यमय कलाटणी घेण्यासाठी शरीर स्वत:ला तयार करीत होते आणि ते शतकानुशतकांपासून उभ्या असलेल्या मानवी विचाराचा पायाच हादरवून सोडणार होते.
युजींची सत्याचा, मोक्षाचा शोध संपला होता आणि आता कसलेही वाट पाहाणे नव्हते तरी त्यांच्याबाबतीत रोमांचक, आश्चर्यकारक आणि गंमतीशीर गोष्टी घडायला सुरूवात झाली होती. त्यांनी त्यांच्या हाताचे तळवे किंवा शरीराचा कोणताही भाग एकमेकांवर घासला तर फॉस्फरसच्या चमचमाटासारखा चमचमाट होऊ लागला. असह्यपणे डोकेदुखी सुरू झाल्याने बेडवर अंग टाकले तर ठिणग्या उडू लागत. ती वीज होती. शरीर विद्युत-चुंबकीय क्षेत्र बनले होते. त्यांना सतत डोकेदुखी किंवा ते म्हणतात त्या शब्दांत “मेंदूत भयंकर वेदनां” चा त्रास होऊ लागला. पण युजी त्यांना काय होत आहे त्याबद्दल व्हॅलेण्टाईनशी चर्चा करीत नसत. शरीरात होणारे हे सर्व बदल आणि डोकेदुखीची सत्रे यांतच तीन वर्षे उलटली. युजी त्यांच्या मूळ वयापेक्षा कितीतरी लहान दिसू लागले. त्यावेळी घेतलेल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये ते खरोखर वीस-एकोणवीस वर्षाच्या मुलासारखे दिसतात. पण नंतर ते बदलणार होते आणि वयाच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानंतर पुन्हा एकदा वय वाढणार होते.  

दर उन्हाळ्यात जे. कृष्णमूर्ती स्वित्झर्लंण्डमधील सानेन इथे व्याख्याने द्यायला आणि चर्चासत्रांसाठी येत. युजींच्या मित्रांकडून काहीवेळा त्यांना या व्याख्यानात ओढून नेण्याची काही उदाहरणे सोडली, तर युजी जेके आणि त्यांच्या प्रशंसकांपासून आदरपूर्वक दूरच राहात. पण असे घडू लागले की चिकित्सक लोक दररोजच युजी राहात असलेल्या चॅलेटमध्ये येऊ लागले आणि त्यांच्याशी चर्चा करू लागले. अपरिहार्यपणे चर्चा आध्यात्मिक गोष्टींकडे वळत असे आणि युजींसमोर मांडलेला कोणताही आध्यात्मिक मुद्दा कठोरपणे तिथल्या तिथे खोडून काढीत आणि जेकेंच्या शिकवणूकीच्या चिंध्या करीत. हळूहळू जे.कृष्णमूर्तीयन्सचा युजीच्या अवतीभवतीचा वावर वाढू लागला; काही लोक हे “दुसरे कृष्णमूर्ती कोण” हे पाहायच्या कुतूहलाने येत तर काही स्वत:च्या शंका दूर (!) करायला येत तर काही लोक जे.कृष्णमूर्तींना ऐकून युजींना आव्हान द्यायला येत. प्रत्येक उन्हाळ्यातील हा शिरस्ताच बनून गेला. जे. कृष्णमूर्तींच्या सतत जवळ राहाणारे लोक जसे मादाम स्काराव्हेली आणि डेव्हीड बोह्म देखील कुतूहल खाजवले गेल्याने सहज चक्कर मारून जात. काही लोक, युजींसोबतच्या घरघुती वातावरणात चालत आहेत असे वाटणार्‍या गप्पा वाढत गेल्या तसे जेकेंकडे पाठ फिरवली आणि युजींचे मित्र बनले.
हे सगळे चालू असताना, विरोधाभास म्हणा की गूढ म्हणा, १३ ऑगस्ट १९६७ रोजी युजींना जेकेंचे उन्हाळ्यातील व्याख्यान ऐकायला ओढून नेण्यात आले. भव्य तंबू मध्ये तिथे युजी बसून होते – ऐकत होते आणि ऐकत नव्हतेही. व्याख्यानाच्या ओघात जे. कृष्णमूर्ती म्हणू लागले, “...त्या शांततेत, तिथं मन नसतं; तिथे कृती असते...”
आघात झाल्यासारखे, युजींनी ते ऐकले आणि अचानक त्यांना तो सर्वच प्रकार मजेशीर वाटू लागला. जेके वास्तविक युजी ज्या स्थितीत होते त्या स्थितीचे वर्णन करीत होते! हे कसे काय घडू शकते? पण ते खरे होते.  “मी त्या स्थितीत आहे तर!” युजींनी स्वत:शी विचार केला. असं जर असेल तर सर्व प्रकारच्या लोकांना ऐकत, संघर्ष करीत, जिसस, बुध्दांच्या स्थितीचा शोध घेत मी ही तीस वर्षे कशासाठी झक मारतो होतो??, मी तर तिथे अगोदरपासूनच आहे! “मी त्या स्थितीत आहे तर!” स्वत:शीच काढलेला तो उदगार, खूपच आश्चर्याच्या भावनेसह थोडावेळ टिकून राहीला. आणि अचानक स्वत:च्या स्थितीचे जेकेंकडून वर्णन ऐकत तिथे बसून राहाणे स्वत:चीच टवाळी ऐकून घेण्यासारखे वाटू लागले. युजी उठले आणि तंबूबाहेर चालते झाले. पण ते तिथंच संपले नव्हते. युजी निश्चितच त्या स्थितीत होते – बुध्दाची स्थिती आणि सर्व एन्लायटन्ड मास्टर्सची स्थिती. पण ती स्थिती नेमकी आहे तरी कशी? पुढच्या क्षणीच या प्रश्नाने दुसर्‍या प्रश्नाला जन्म दिला “मी त्या स्थितीत आहे हे मला कसे काय कळणार?” हा प्रश्न रोमरोमात भिनलेल्या वेडासारखा त्यांच्यात पेटून उठला. “अत्यंत तीव्रतम आकांक्षेसह मला बुध्दाची जी स्थिती हवी होती, जी मी सगळ्यांकडून मागत सुटलो होतो त्या स्थितीत मी आहे हे मला कळणार कसे? मला कसे कळणार?”


पुढच्या दिवशी तोच प्रश्न रोमरोमात पेटून उठला असताना युजी चेस्टनट वृक्षाखाली विसावलेल्या एका बाकड्यावर बसून होते, समोर सानेनच्या भूमीतील नीलपर्वताची सात शिखरे आणि सात दर्‍या निळ्या प्रकाशात न्हात असल्याचे न्याहाळत होते. प्रश्न तसाच धडधडत होता, त्यांचे पूर्ण अस्तित्वच त्या एका प्रश्नाने झपाटले गेले होते “मला ते कळणार कसे?” दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर ते स्वत:च प्रश्न बनले होते. तो प्रश्न तसाच टिकून होता, “मी त्या स्थितीत आहे हे मला कळणार कसे?”  माझ्या आत कसलीतरी विचित्र दुभागणी आहे: आत कुणीतरी असा आहे जो जाणतो की तो त्या स्थितीत आहे. त्या स्थितीचे ज्ञान – जे मी वाचलेय, जे मी अनुभवलेय, ज्याबद्दल त्यांनी बडबड करून ठेवलीय – हेच ते ज्ञान जे त्या स्थितीकडे पाहातेय – त्यामुळे त्या स्थितीचे प्रक्षेपण करणारे हेच ते ज्ञान आहे. मी स्वत:लाच म्हणालो: “इकडे पाहा जरा म्हातार्‍या कार्ट्या, चाळीस वर्षांनंतरही तु एक पायरीदेखील वर चढला नाहीस; तो चौक क्रमांक एक मध्येच आहेस. तु हा प्रश्न विचारास तेव्हा ही स्थिती प्रक्षेपीत करणारे हेच ते ज्ञान आहे. तु त्याच स्थितीत राहून तोच प्रश्न विचारतो आहेस, “मला कसे कळणार?”  या ज्ञानामुळे, त्या लोकांच्या स्थितीच्या वर्णनामुळे, तुझी ही स्थिती निर्माण झाली आहे. तु स्वत:चीच थट्टा करतो आहेस. तु एक पार वाट लागलेला मूर्ख आहेस.” तरीही एक विचित्र भावना होती की ती स्थिती हीच आहे. आणि तरीही प्रश्न उठत होता, “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” – या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते – तो प्रश्न एखाद्या भोवर्‍यात सापडलेल्या प्रश्नासारखा होता – तो गरगर राहिला – गरगरत राहिला...
आणि अचानक तो प्रश्नच गायब झाला. युजी खरोखर आणि संपूर्णत: संपून गेले. ती रिक्तता नव्हती, रे रिकामे होणे नव्हते, ते बौध्द तत्वज्ञानात सांगितलेले निर्वाण नव्हते, आणि सर्व जागृत पुरूष ज्या स्थितीत आहेत असे मानले जाते ती ही स्थिती नव्हती. फक्त प्रश्न मावळला होता.
प्रश्न मावळून गेला तसे विचारातील प्राण निघून गेला – संस्कृती आणि धर्म यांनी स्फटीकरूप दिलेला आणि मजबूत केलेला विचार खलास झाला. विचारांना सांधणारा “मी”, सर्व इंद्रियजन्य अनुभवांचे तुकडे गोळा करणारा, त्यांची तुलना करणारा आणि एकमेकांशी जुळवून पाहाणारा मानसिक समन्वयक” अचानक निघून गेला. आता दुवा निखळला, दुरूस्ती करणारी, सफाई करणारी, शरीराला ऊर्जस्वल करणारी, रेचन करणारी प्रचंड ऊर्जा मोकळी करीत विचाराचे सातत्य खंडीत झाले, विचाराचा स्फोट झाला.
युजी या स्थितीला मुद्दाम कॅलॅमिटी: चक्रीवादळ म्हणतात जेणेकरून लोकांनी, विशेषत: धार्मिक पठडीतील लोकांनी त्या स्थितीचे कसलीतरी प्रसादपूर्ण, सौंदर्यसंपन्न, प्रेमसंपन्न, परमानंदपूर्ण स्थिती म्हणून विश्लेषण करू नये, तिला “एन्लायटन्मेंट” म्हटले जाऊ नये. तसे बिलकुल होता कामा नये. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या ती स्थिती एक यातना आहे. या दृष्टीकोनातून ती एक चक्रीवादळ आहे. पुढच्या सात दिवसांपर्यंत, सात विचित्र बदल होत गेले आणि त्या बदलांनी त्यांना ते म्हणतात त्या “नॅचरल स्टेट” – निसर्गदत्त स्थितीत फेकले. ती सगळी वेदनादायी प्रक्रिया संपूर्णत: गायब होण्यासाठी आणखी सहा महिने लागले.
ती पेशीय उत्क्रांती होती, ते एक सर्वव्यापी जैविक उत्परिवर्तन होते. तो नैसर्गिक स्थितीतील एका “नव्या” व्यक्तीचा जन्म होता.

१९६७ हे वर्ष संपत असताना युजींना कर्नाटकातील श्रृंगेरी येथे जावे लागले आणि तिथे श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांची कशी कोण जाणे पण गाठभेट झाली. युजींमध्ये झालेल्या विचित्र शारीरिक बदलांबद्दल ऐकल्यानंतर श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामी या शंकराचार्यांना युजी हे जीवन्मुक्त असल्याबद्दल संशय उरला नाही आणि असे मानले जाते की ते यावेळी म्हणाले होते, “माझ्या व्यक्तीगत अनुभवात मला असल्या गोष्टी माहित नाहीत...अशा निर्विचार स्थितीचा धक्का शरीर पचवून पुन्हा अभंग राहू शकते हे अत्यंत दुर्मिळ आहे. धर्मग्रंथांत सांगितल्यानुसार, असल्या घटनेनंतर तीन दिवसांच्या किंवा बहात्तर तासांच्या आत शरीर मरण पावते. शरीराने त्याचे जैविक बल टिकवून ठेवले असेल आणि ते नष्ट झाले नसेल तर निश्चितच ते मानवतेला वाचवण्यासाठी घडेल असेल...”
शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे युजी स्वत:ला कसल्याही प्रकारचा मसिहा मानत नसत. त्यांना जे घडले होते ते ज्या स्थितीच्या शोधात होते ती स्थिती नव्हती. सर्व प्रकारचा शोध आणि साधनांच्याउपरही ते घडून आले होते. आता त्यांना कुठल्यातरी शांत ठिकाणी राहून आयुष्य कंठायचे होते. युजींना निवृत्त होण्यासाठी तुंगा नदीच्या तीरावरील शांततापूर्ण परिसर सुयोग्य वाटत होता. त्यांनी काही काळ शांतपणे शंकराचार्यांना ऐकले आणि स्वत:च्या एकांतवासाच्या विषयाला हात घातला. इथे शंकराचार्यांनी “तुमची इच्छा असेल तर आजूबाजूची कुठलीही जागा तुम्हाला देण्याची जबाबदारी माझी, पण एकांतात राहाण्याची तुमची कल्पना टिकू शकणार नाही, तुम्ही जंगलात रहा की पर्वतावरी गुहेत राहा, लोक तुमच्याकडे गर्दी करणे थांबवणार नाहीत... ” असे म्हटल्याची नोंद आहे.

(उद्या “त्या” स्थितीत नेमके काय घडले त्याबद्दल)