१० जून, २०१०

शब्द शब्द मुका



शब्द तयार आहेत हीच एक मोठी अडचण आहे. कारण शब्दांचे आपले आपले स्वभाव आहेत, ज्याचे-त्याचे अर्थ आहेत. ते फार तोकडे पडतात.
काही लिहायचं असेल, मन भरून आलं असेल तरीदेखील शब्द दगा देऊन जातात. आता पहा मला या पोस्ट मधून काहीच सांगायचं नाही - अगदी काहीही नाही. मग काही सांगायचं नाही तर ही झकमारी कशासाठी? ही झकमारी अशासाठी की "काही सांगायचं नाही" एवढं म्हणूनही मला जे सांगायचं नाही ते ठिक-ठिक व्यक्त होत नाही.

इथे उमटलेल्या शब्दांचा आणि जे मला लिहायचं आहे त्याचं कुठेच एकमेकांशी ताळतंत्र नाहीय. पण मी शब्दांचे अर्थ रद्द करू शकत नाही आणि त्यांना मला हवा असलेला अर्थही देऊ शकत नाही. ते नाठाळ घोड्यासारखे त्यांच्याच मनाप्रमाणे उधळत जाणार - आणि मी मात्र शब्दांवर बसून आपण काय मजल मारली यार? या विचारात खूश !! त्यामुळे मेंढपाळ त्याच्या शेळ्यामेंढ्यांना हिरव्या माळरानावर सोडून स्वत: बाभळीखाली निवांत ताणून देतो किंवा कासरे वळीत बसतो तसे मी करणार आहे.

काहीही सांगांयचं नसताना, फक्त शब्दांना पूर्वीच अर्थ चिकटले असल्यामुळे कुठलातरी आकृतीबंध ते तयार करणारच - मग तो तुम्हाला हवा तसा असेल - नसेल. हे माझ्या बाबतीत बर्‍याच वेळा घडलं असल्यामुळे मला जे कधीकाळी लिहावं वाटत होतं ते शब्दार्थात पकडण्याची खटपट निरर्थक होती हेच कळलं, कारण शब्दांना पूर्वीचेच अर्थ असतानादेखील "मी हे लिहिलं" असं म्हणनं म्हणजे मूर्खपणाचा कळस !! उलट जे सांगायचं आहे आणि जे सांगायचं नाही हे दोन्हीही तयारच आहे - माझा आणि त्याचा काही संबंध नाही असं म्हणंणच जरा अचूक ठरेल. उदा. रस्ते जगभर पसरून तयार आहेत, आणि जगही तयार झाले आहे. तुम्ही चाला, न चाला - रस्ते जिथे जायचे तिथे जाणार, आणि जिथे जायचे नाहीत तिथे नाही जाणार/ जग पण जसे आहे तसे राहाणार, किंवा नाही राहाणार.

मग एवढे सगळे असताना मी काही करण्याचा किंवा मी जे करील त्यावर "ह्याने केले" असा शिक्का मारण्याची गरजच राहात नाही - किंवा "मी" हा पदार्थच शिल्लक राहात नाही. "मी" किंवा "आपण सगळे" जर शिल्लक नाहीत मग हे आजूबाजूला एवढे कोण लोक आहेत? तर ते "काहीही नाही" आहे. कारण आपण जेव्हा नव्हतो तेव्हा आपण कुठे होतो? तर आपण तेव्हा नव्हतोच असे उत्तर मिळेल. मग आपण जर नव्हतोच, तर आपण असू कसे शकतो? किंवा आपण आत्ता आहोत हे तरी शक्य आहे का? आपण म्हणजे आपली शरीरं? नाही. ती फारच तोकडी पडतील. मग? आपली मनं? नाही. ते तर फक्त एक जैविक यंत्र आहे. आपण यंत्र कसे असू शकतो? मग शरीर नाही, मन नाही, शब्द नाही क्काही, क्काही नाही! काहीच नाही!!! म्हणूनच म्हणतो "मला काही सांगायचं नाही", कारण काही नाहीच्चे !!!

शब्द शब्द मुका
अर्थ सदा वांझोटा
वादाच्या हाती सदा
संवादाचा खराटा
मेंदूत भरली
विचारांची जळमटे
त्यात फडफडती
कल्पनांचे किडे
शोधती सदा
तत्वांचे आधार
हा सगळा
उधारीचा बाजार
प्रज्ञा कुपोषणाने मेली
बुध्दी पोटामागे गेली
मन बसले गाणी गात
फिडलवाल्या निरोची त्याची जात

९ जून, २०१०

अलीफ लैला...अलीफ लैला....अलीफ लैला...




अर्शब नयी कहानी...
दिलचस्प है बयानी...
सदीयां गुजर गयी है
लेकीन न हो पुरानी
परीयों को जीत लाये
जिन्दो को भी हराये
इन्सान में वो ताकत
सब पे करे हुकूमत...
लहानपणी (हे नक्की कधी संपते?) या मालिकेने मला फार आनंद दिला, घाबरून सोडले आणि एका वेगळ्याच जगात गुंगवून सोडले. लहानपणी टि.व्ही.वरच्या मालिका आमचे खरे आयुष्य रंगवून सोडीत. रॉबीनहूड पाहिली की केलेच वेळू आणि चिपाड वापरून धनुष्यबाण. नुसत्या बाणाने चिमण्या मरेनात म्हणुन त्यांच्या टोकावर वेड्या बाभळीचे काटे. मग काय, चिमण्या मारता मारता आम्ही एकमेकांचे डोळेही फोडू लागलो.
टीपू सुलतान पाहात असताना सैनिक ****** की असे ओरडले की मालिकेत रंगून गेलेला मी मारवाड्याच्या घरात तल्लीन झालेल्या अख्ख्या पब्लिकमध्ये मोठ्याने "जय!!!!!" असे ओरडलो. आणि नंतर कुठेही मी दिसलो की पोट्टे "की जय!!!" म्हणून ओरडू लागली.
अलीफ लैला या मालिकेतील सिंदबाद, जिन्न, पर्‍या आणि अल्लाह ने केलेले चमत्कार पाहून अल्लाह या माणसाबद्दल (!!) आपला आदर फारच वाढला होता. इतका की मी उर्दू ही भाषा शिकण्यासाठी आमच्या गाय वाड्याशेजारच्या मशीदीत चालणार्‍या मदरशात जाऊन बसू लागलो. आमच्या गड्यांनी मला तिथे पाहिले आणि घरी आल्यावर आमची यथेच्छ कणीक तिंबण्यात आली !
"मुसलमान होतोस काय बेट्या, आधी संस्कृत शिक...मग कर वाटेल ते धंदे.....उर्दू शिकणार आहे म्हणे" इति भाऊ आणि काका..
पण आमचे दादा मात्र याबाबतीत माझ्या लेखी संत माणूस. या माणसाकडून ते जाई पर्यंत मी लाख रूपये तरी वसूल केले असतील - हवे असतील तेव्हा...द्या एक रूपया...द्या आठाणे (हजार वर्षे झाली हा शब्द उच्चारून)..असो तो एक वेगळा विषय आहे.
तर मी उर्दू शिकायला मशीदीत जाऊन बसलो हे कळल्यावर दादांनी स्वत: मला उर्दू शिकवायला सुरूवात केली (अलिफ, बे, पे, ते आणि उलट्या बाजूने लिहावे लागते हे कळल्यावर सोडून दिले). आमचे दादा उस्मानिया युनिव्हर्सिटीचे त्याकाळचे उर्दुतील पदवीधर होते. एकदा कुणाच्यातरी लग्नाला (नेमका सोमवार, अलिफ-लैलाचा वार) ते मला दुसर्‍या गावाला घेऊन गेले. आम्ही लग्न आटोपून रस्त्याने जात असताना "अलीफ लैला...अलीफ लैला....अलीफ लैला..." हे टायटल सॉंग कानी पडले. मग काय मी तिथेच भोकाड पसरले "मला अलिफ-लैला पाहायचीय..!" काही केल्या ऎकेचना.
बिचार्‍या दादांनी त्या अनोळखी घराचा दरवाजा वाजवून आतल्या माणसाला काहीतरी सांगितले आणि त्याने आम्हाला आत घेतले. त्या घरातली पोरे अलिफ-लैला बघायची सोडून माझ्याकडेच विचित्र नजरेने पाहात होती.
उर्दू डायलॉग्जची फोडणी दिलेल्या हिंदी चित्रपटांनी आमची (म्हणजे किमान मराठवाड्यातल्या पोरांची तरी) मातृभाषा खराब केली. आज देखील पोरे प्रेमा ऎवजी मोहब्बत, वाट पाहातो ऐवजी इंतजार करतो असे डायलॉग मारतात. कसे कुठुन जाणे अचानक "अलीफ लैला...अलीफ लैला...अलीफ लैला" हे टायटल सॉंग मनाच्या रेडिओत वाजले आणि हजारो आठवणींना जीवंत करणारी एवढी मोठी पोस्ट तयार झाली.